सहजीवन

 

    Peaceful Co-existance  ... माझ्या नवऱ्याचं एक छोटंसं, साधं - सुधं स्वप्न ! ..... पण ते त्याला पहाटे पहाटे पडलं नसावं ... नाहीतर , खरं झालं असतं ... !     बिचारा !     कोणत्या जगात ... कोणत्या काळात रहातोय, रमतोय माहीत नाही ... !!!

    मी असं म्हणायला , कारण ही तसंच आहे.   आमच्या लग्नानंतर, एक दिवस असंच walk ला गेलो असतांना, गप्पा मारत असतांना,  त्याने लग्न म्हणजे , हीच त्याची कल्पना असल्याचं सांगितलं ... आणि खरं म्हणजे , मला काहीच कळेना ... हा खरंच innocent, स्वप्नाळू  आहे, का त्याच्या स्वतःच्या expectations सांगतोय  ... !

    Co-existance  म्हटलं की आठवतो तो शब्द म्हणजे 'सहजीवन' !     जिथे दोन व्यक्ती, प्राणी, even वस्तू,  एखादी जागा, वातावरण share करत आहेत , ते सहजीवन किंवा co - habitation !   तिथे कोणी एकमेकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणायची नाही , की एकमेकांवर अवलंबून रहायचं नाही ...अनेक अर्थ  ! जंगलात , रानावनात , एखाद्या तलावातलं पाणी share करतांना, प्राणी वगैरे , गुण्यागोविंदाने आपापल्या वेळा ठरवून येतात आणि पाणी पिऊन जातात.   कारण तिथे कोणाचा मान पहिला..., कोण राजा, कोण प्रजा , हे ठरलेलं असतं ... पण जिथे दोघांचाही वाटा अर्धा अर्धा असेल, तिथे कोण आधी, कोण मागून ... कुणाला 'मोठा अर्धा' मिळावा वगैरे मतभेद असणारच ... असं माझं मत !     जिथे boss कोण,  असा सवाल असेल, तिथे शांती नांदणं, म्हणजे  तिच्यासाठी जरा तारेवरची कसरतच ... !

    "Peaceful co-existance असं काही नसतं रे ..." असं म्हणायचं होतं मला, पण इतक्यातच वाद नकोत, म्हणून सूज्ञपणे मी म्हटलं, "हां, overall peaceful  असलं की झालं ... "   ते discussion तेवढ्यावरच थांबलं ... पण ही idea मनात राहिली !

    आजकाल विचार करते , तेव्हा, खरं तर मला मजा येते ... काय सुंदर स्वप्न !  तेव्हा लग्न अगदी नवीन असल्यामुळे उदात्त स्वप्नं वगैरे डोळ्यांत !  लग्न हे एका व्यक्तीशी नाही,  तर ते त्या कुटुंबाशी ... वगैरे आदर्शवादी तत्वं आणि त्यांचा भडीमार ... सगळी adjustment पावलोपावली करायची म्हणजे खरंच तारेवरची कसरत ... एका दिवसात आपण आपला २२ वर्षांचा इतिहास पुसून नाही टाकू शकत  ... !                      लग्नाच्या दिवशी,  संध्याकाळी शुक्रतारा, ध्रुवतारा, सप्तर्षींमधील वसिष्ठ ऋषी आणि अरुंधतीचा तारा दाखवला होता !   त्यांचं अजरामर , चिरंतन असं सहजीवन ! ...तर... घर-दार, माणसं, घरातल्या वस्तू, सगळ्यांशी जमवून घ्यायचं ... आपण नवीन, आपणच सगळ्यांच्यात एकजीव व्हायचं ... लोपामुद्रेची आठवण झाली !    लोपामुद्रा ... अगस्त्य ऋषींची बायको ... त्यांनी तिला शिकवलं, लिहिण्या-वाचण्यापासून ते तत्वज्ञान, वेद वगैरे सर्व ! आणि ती त्यात इतकी रमली की तिला तिचं स्वतःचं वेगळं असं अस्तित्व राहीलं नाही, जी नवऱ्याशी इतकी एकरूप झाली, जिची स्वतःची ओळख , चेहरा - मोहोरा,  मुद्राही लोप पावली  ती केवळ धूसर अशी राहिली... ती लोपामुद्रा ! सहजीवनाची ultimate stage...!  हे तिच्या बुद्धी बद्दल , ज्ञानाबद्दल किंवा अध्यात्मिक उन्नती बद्दल असेल ... पण माझ्या मते, ते स्वतःचं वेगळेपण, स्वत्व विसरणं तर नसेल ?? पण हे झालं विषयांतर ... !

   ... आत्ता माझ्यासमोर वेगळाच प्रश्न आहे, आणि ... त्यात सहजीवन हा शब्द अगदी वेगळ्याच पातळीवरचा आहे !  लोपामुद्रेच्या, अरुंधतीच्या पायाला लागलेल्या मातीची ही सर आपल्याला नाही, पण अगदी किडा-मुंगी  या स्तरावर तरी मला हे सहजीवन फार त्रास देतंय ! अक्षरशः....! ३५ वर्षांपूर्वी घर बांधतांना भूमीपूजन केलं होतं, तेव्हा गुरुजी सांगत होते, की तुमच्या आधी इथे रहात असणारे किडे-मुंग्या इ. इ. इ. प्राणी यांची आपण क्षमा मागतोय, आणि आपलं घर बांधून झाल्यावर आपण सर्व छान राहू ,  असं वचन - assurance देतोय !   ते सगळं पूजेत ठीक आहे ... पण म्हणून  ,त्यांनी म्हणजे किडेमुंग्यांनी ते इतकं seriously का घ्यायचं ?     इथे रहायला आल्यावर,  तळ मजल्यावर घर असल्यामुळे, बरेचदा सकाळी उठून दार उघडलं की कोणीतरी वाट पहात असायचंच ... एखादा चमत्कारीक किडा, मुंग्या-मुंगळे . कुत्रे नसायचे, पण पाऊस-बिऊस पडला की एखादं गोजिरवाणं - भिजलं माऊ केविलवाणं होऊन पायपोसावर बसलं असायचं ... अन् त्याला हुसकल्याशिवाय पुढे जाता यायचं नाही.     एकदा दार उघडल्याचा आवाज ऐकल्यावर घाईघाईने कोणीतरी सरपटत सरपटत भिंती जवळच्या भोकात निघून गेलं ... त्यादिवशी पहीलं काम ... सिमेंट ओतलं आणि सगळी भोकं बुजवली ... !

    अजूनही जसजशी संध्याकाळ होईल, तशी गुणगुण सुरु  होते !  जरा दार उघडं राहीलं की डासांचा थवा गुणगुणतच पण झपकन आत  शिरतो .   अश्याच एखाद्या बेसावध क्षणी घरात   शिरलेले 'शिशुपाल'  कितीतरी मोठे होऊन चांगले धष्टपुष्ट झाले, तरी घर सोडायचं नाव नाही !  .... triassic का jurassic era पासून अस्तित्वात असलेला तो एक प्राणी - झुरळ - तो इथे माझ्या Tic -२० नाहीतर Hit ला कशाला दाद देतोय ?     तात्पुरता जातो आणि काही आठवड्यानंतर पुन्हा परत येतो ... त्याला म्हणे , वरच मिळालाय की nuclear holocaust मधे आणि nuclear winter  नंतरही तोच अस्तित्वात असेल ... बाकी आपण कोणी असणार नाही !     असू दे बापडा, पण आता इथे मला त्याच्याशी अजिबात जमवून घ्यायचं नाहीये, मी दोन हात करणारच !     एका हातात Hit आणि दुसऱ्या हातात swatter ! आणि माझा थयथयाट ! ... असो .           नवीन घराभोवतीच्या इवल्याश्या जमिनीच्या पट्ट्यात खूप छान छान झाडं लावली.  ऊन फारसं येत नसल्यामुळे बाग हिरवीगार दिसली तरी फुलं बेपत्ता !     आणि काही दिवसांनंतर पानांवर काहीतरी रंगीबेरंगी पण भयानक ! ... फुलपाखरं व्हायच्या आधीची अवस्था !   ते रंगीबेरंगी सुरवंट !  ते इथे मुक्कामाला, ...त्यांची फुलपाखरं झाली की जाणार उडून !  हे काय पाळणाघर का काय त्यांचं ? ...नुसता वात आला !     ... उंदीर-घुशी बागेत धुमाकूळ घालतात, पण जोपर्यंत घरात येत नाहीत तोपर्यंत ठीक आहे ... 

    झाडं जशी मोठी झाली, तशी आता पक्षी येतील, म्हणून मी आकाशाकडे डोळे लावून ... काही महिने चिमण्या आल्या, मग त्याही गायब !     आता झाडांमध्ये नाही, तर वळचणीला, पाइपवर,  जिथे जागा मिळेल, तिथे कबुतरं ... त्यांची घरं बांधायची हौस आणि माझ्या अंगणात काड्या आणि xx... बहुतेक ही कबुतरं झुरळांना competition असणार ... तेव्हा ! ... हे काय आपलं , 'आओ जाओ, घर तुम्हारा !' 

    तसं खूप वेगवेगळ्या तऱ्हेचं सहजीवन मी अनुभवते, अनुभवलं ! सहजीवन in absentia ... नवरा सारखा tour वर, त्यामुळे co-existance खरंच peaceful  ... भांडायलाच कोणी नाही, ना वाद घालायला... पण कंटाळवाणं ..... का त्याने शोधलेली ही पळवाट होती ... पण मला त्याचीही सवय झाली.   मग वेळ घालवायला, काहीतरी करायला हवं, म्हणून  idea   केली.  आठवड्यातून एकदा दुपारी मैत्रिणी यायच्या !   गप्पा, अंगत-पंगत, नंतर आपापल्या आवडीच्या गोष्टी करणे ... विणकाम, भरतकाम, कधी कधी पदार्थ, कधी कुणी काळजीत असेल , तर नुसत्या गप्पा !   ... फार सुंदर सहजीवन ! माझा Tuesday Club -  अनेक वर्षं चालला  !!! मैत्रिणींचं bonding...अडी-अडचणीला त्याच धावून यायच्या ! 

    नवरा retire झाल्यावर, आता भांडायच्या ऐवजी आम्ही घराची - म्हणजे त्यातल्या  जागेची रीतसर वाटणी करून घेतली !  मला एक खोली, माझ्या आवडीच्या गोष्टींसाठी !  त्याला त्याचे खिळे - मोळे   आणि कॉम्पुटर ठेवायला वरच्या मजल्यावरची खोली ! dining space, bedroom हे common area.     राहता राहीलं स्वैयंपाकघर आणि हॉल ... आम्ही चिठ्ठ्या टाकल्या ... त्याला स्वैयंपाकघर आलं,  म्हणजे मला हॉल!! ... मी काय करणार  !   पण मी अगदी honest आहे ! लगेच दुसरी चिठ्ठी फाडून टाकली नाही !!!   तर आता peaceful co-existance ... एकमेकांच्या area त आणि affairs मधे no ढवळाढवळ !    तेव्हापासून सौख्यभरे नांदतो आहोत !  आणि हो , affairs हा शब्द 'रोजची कामं' या अर्थीच...!

    काही - नव्हे- बऱ्याच वर्षांपूर्वी , २५व्या wedding anniversary ला एक card आलं होतं.    त्यात एक वाक्य होतं ... खरं तर paragraph च होता ...  सहजीवनाबद्दल !   सगळं खूप छान लिहिलं होतं ...      अन् शेवटचं वाक्य होतं ..."कितीही भांडू-रागावू, पण एक वचन दे ..माझ्या आधी तू नाही जायचं ....एवढं एक लक्षांत ठेवायचं ...  "  तेव्हा ते आवडलंही खूप ... 

  नंतर,  एक दिवस नवरा म्हणाला,असं वाटतं ,म्हणावं   " तूच माझ्या आधी जा, म्हणजे आपलं माणूस सोडून गेल्याचं दुःख तुला नाही सोसावं लागणार ! ... "          ......सहजीवनाची ही शेवटची पायरी ... इतक्यात नको यायला ..... 

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     






Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland