भाषा
आजकाल , एक फोटो सोशल मीडिया वर सारखा दिसतो . एक माणूस , सुमारे 50 असावा , अमेझॉन च्या खोऱ्यात रहाणारा . तो काय बोलतो , म्हणजे कोणती भाषा बोलतो ,ते कोणालाच कळत नाही . त्याच्या आदिवासी जमातीतील तो एकटाच राहीला आहे ...किती भयानक आहे .. जुबाँ मिली है , मगर हमजुबाँ नहीं मिलता ....!!अशीच एक बातमी काही वर्षांपूर्वी पेपरात वाचली होती ... इंडोनेशियाच्या एका बेटावर एक भाषा बोलली जाते. पण ती भाषा बोलणारे फक्त तीनच लोक उरले होते . त्यापैकी एक माणूस ७५ वर्षाचा, तेव्हा आणि दुसऱ्या दोघी बायका ४५ आणि ३५ अशा वयाच्या. ही भाषा नामशेष होऊ नये म्हणून युरोपातील शात्रज्ञ तिथे जाऊन त्या लोकांकडून जमेल तेवढी भाषा रेकॉर्ड करून ठेवणार होते . माझ्या मनात आपला उगीचच एक किडा आला. समजा, त्या दोघीच राहिल्या आणि त्यांचं भांडण झालं, आणि त्या एकमेकींशी बोलल्या नाहीत तर काय होईल ? ...
त्याच लेखात पुढे लिहिलं होतं की उत्तर भारतातल्या सगळ्या भाषा आणि युरोपातल्या भाषा ह्या तुर्कस्तानात उदयाला आल्या असाव्यात. उर्दू आणि संस्कृत एका घराण्यातल्या ... ? बहुधा सावत्र बहिणी असाव्यात, आणि लॅटिन त्यांची चुलत बहीण ? हे असं ऐकलं की भाऊबंदकी काय असेल, ते कळतं ! पण , युरोपातलीच एक भाषा बास्क नावाची ...तिचं जगातल्या कोणत्याच भाषेशी साम्य नाही ....!!!
तशीच हिमाचल प्रदेशात 'हो' नावाची एक भाषा नामशेष होऊ घातली आहे. ही भाषा, तिचं नाव, वगैरे एक वेगळाच संशोधनाचा विषय होऊ शकेल.... जसं नवऱ्याचं 'हो', म्हणजे हं ...च्या पुढे काहीच नाही ..., बायकांचं वेगवेगळ्या टोन्स मधलं, प्रसंगानुरूप 'हो' किंवा ' हो ssss', तरुण मंडळींचं एकमेकांना 'हो', आणि आईवडिलांचं त्यांना नाखूष 'हो' ! त्याच बातमीत पुढे लिहिलं होतं की जगात ६००० भाषा आहेत, पण माझ्या मते बऱ्याच जास्त असाव्यात. कैक भाषांची नोंद तरी आहे का नाही कोणास ठाऊक ?....
अशीच एक भाषा लहानपणी शिकलेली. तिसरी-चौथीत शिकायची, तेव्हाच बोलायची ! नंतर कधीच नाही, पण विसरतही नाही. 'च' ची भाषा, 'प्म' ची भाषा ! गंमत म्हणजे ह्या भाषा मुलींनाच यायच्या. कधीच मुलांना बोलतांना ऐकलेलं नाही. पण मुली मात्र पटाईत ! 'चोप्मोरून गुप्मुळ खाप्माल्ला म्हप्मणून माप्मार दिप्मीला तिप्मीला, साप्मावत्र आप्माई नाप्माही तप्मर काप्माय ?' ... अशा कितीतरी गोष्टी मैत्रिणींना, बहिणींना कम्युनिकेट करायच्या असायच्या, आजूबाजूला इतर लोक असतांना, आणि ह्या कानाचं त्या कानाला कळू न देता. प्रॉब्लेम एकच असायचा की , आईला पण ह्या भाषा कळायच्या, आणि अधूनमधून कान पिळला जायचा, एखादा धपाटा मिळायचा.
आपल्या वेळी शाळेत ५वीत इंग्लिश सुरु व्हायचं आणि आपणही धिस-दॅट बोलू शकतो, असं वाटून धन्य वाटायचं, ते स्पेलिंग टेस्ट पर्यंत टिकायचं. मग आपली मातृभाषा उत्तम आहे, हे सिद्ध करायला इतर भाषांची टवाळी करणं सुरु व्हायचं. कॉलेजमधे गेल्यावर इंग्लिश भाषाच आपल्याला तारून नेणार आहे हे कळलं की डोळे उघडायचे. आमचे संस्कृतचे सर म्हणायचे, "फणस चिरतांना काटे टोचतात, हाताला चीक लागतो, पण गरे खाल्ले की ते सगळं विसरता ना ? तसंच आहे ह्या भाषेचं, व्याकरण शिका ,की मग तिची गोडी कळेल, समृद्धी कळेल." त्याच सुमारास आपल्या इतर भारतीय भाषांची ओळख होऊ लागली. त्यातल्या साहित्याची भाषांतरं वाचनात आली. बंगाली गोष्टी वाचतांना फारच रडारड, मी पानंच्या पानं गाळून, सरळ शेवट वाचून पुस्तक उरकून टाकत असे. इंग्लिश सोडून बाकी युरोपातली भाषांतरं वाचणं , म्हणजे , सगळ्या गोष्टींवर दुसऱ्या महायुद्धाचा झाकोळ ...
त्यानंतर जग बरंच पुढे गेलं. आपल्या भाषा मागे पडल्या. फ्रेंच, जर्मन, जपानी, स्पॅनिश बरोबर रशियन आणि चायनीज भाषेचं युग चालू आहे. पण खरंच का ? एखाद्या ६वी - ७वीतल्या मुलीला विचारा, कोणती लँग्वेज शिकवतात ? ती तुमच्याकडे पहाण्याचे कष्टही न घेता म्हणेल, java नाहीतर python. ह्या कसल्या भाषा ज्या कोणाशी बोलता येत नाहीत, त्यांना आपण लिपीही म्हणू शकत नाही, व्याकरण म्हणा हवंतर - यंत्राचं ! काही दिवसांनी , हे कॉम्पुटर पण एकमेकांना , जुनाट , आदिवासी, third world मागासलेले , म्हणतील....c++ वगैरे वरून ? .... लिपीवरून आठवलं, आपल्याला फक्त देवनागरी माहिती, फारतर 'मोडी' जी आता मोडीतच गेली आहे. पण जुन्यातलं जुनं, आज जे उपलब्ध आहे, ते महाभारत 'शारदा' , मैथिली , नेपाळी ...अशा लिपीत लिहिलं आहे !! आणि, त्या लिप्या येणारे शास्त्रज्ञ आहेत ...!
लिपी वरून आठवली अशीच एक मजा...! म्हणजे आमचं लग्न ठरल्यावर एकदा मला नवऱ्याने एका चौकोन-त्रिकोणाच्या भाषेत पत्र लिहिलं, पण त्याची 'key' लिहायला विसरला. मग ते अगम्य पत्र एकेक अक्षर लावून वाचण्यापेक्षा मोडी नाहीतर मोहेंजोदारोतल्या मुद्रा वाचणं सोपं असं वाटलं आणि मी तो नाद सोडला. म्हटलं लिहून लिहून काय लिहिणार आहे ? ... असो. जाऊ द्या !!!
चीनमधे एक भाषा बोलली जाते आणि ती फक्त बायकांनाच येते, अर्थात बोली भाषा. शतकानुशतकं फक्त बायकाच बोलतात. इतक्या वर्षात एकही बाई कोणत्याही प्रलोभनांना बळी पडली नाही, कसल्याही भूल-थापांना बधली नाही, कोणाला नको तेव्हा प्रेमाचा पुळका आला नाही, की कोणी भावनांच्या पुरात वाहून गेली नाही आणि कोणीही ती भाषा पुरुषांना शिकवली नाही..... मजेत आपलं नूडल्स वळता वळता, चार चौघी मिळून, एकमेकींची उणी-दुणी काढावीत, उखाळ्या-पाखाळ्या कराव्यात, गाऱ्हाणी सांगावीत, अगदी निवांत. कुणाला कळायला नको आणि पुरुषांची मधे पडायची भीती ही नाही....
माझ्या लहानपणी आईचं एक पेटंट वाक्य असायचं, "... कळत नाहीये का ? मी काय कानडीत बोलतेय का ?" की मग हातातलं पुस्तक बाजूला ठेवून आपल्याला तिचं बोलणं कळतंय, हे सिद्ध करावं लागायचं. आई फारच चिडली , तर , 'कानडी 'च्या ऐवजी ' स्वाहिली ' म्हणायची ! पण, बंगलोरला आल्यापासून हे वाक्य मी माझ्या मुलांना म्हणू शकत नाही, कारण त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं कानडी येतं, आणि र, ट, फ, करत का होईना, ते मराठीही वाचतात, शुद्ध बोलतात. लहानपणी काही उच्चार जरा हिंदी धाटणीचे ...मग , जरा ठाकून ठोकून ते दुरुस्त करायचे ....
आता नातवंडांशी घरात सगळे मराठीतच बोलतात , म्हणजे, त्यांच्या आईला म्हणायला लागत नाही की "... अरे कळत नाही का ? मी काय मराठीत बोलते आहे का ?"...
....'अमृताते ही पैजा जिंके 'अशी माझी भाषा ...!! माझ्यापुरतं तरी तिचं मरण तेवढंच एका पिढीने पुढे ढकललं गेलंय ... !!
- अलका कुंटे, बेंगळुरू
( +९१ ८७६२३ १६३८५ )
छान नेहमीप्रमाणे. मी कानडीत बोलते का म्हणू नको. मला कानडी कळत.
ReplyDeleteप्रमोद
नक्की नाही म्हणणार , आता स्वाहिली च शिकणार आहे !!! 👌👌👌☺️
Deleteनक्की नाही म्हणणार ! आता मी स्वाहिली च शिकणार आहे ....!!!! 👌👌👌☺️
ReplyDelete