पुनरागमनाय च
गणपती उत्सव - आनंदाला उधाण, सगळीकडे उल्हास-उत्साहाचं वातावरण, दहा दिवस कसे जातात ते कळतही नाही. आणि मग विसर्जनाची वेळ आली की हळूहळू सगळ्यांचे चेहरे आणि - त्याबरोबर उत्साहही - पडायला लागतात ... आमच्या मुलाकडे दीड दिवसांचा गणपती . दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उत्तरपूजा झाल्यावर, आता विसर्जन असं म्हंटल्यावर, नातीची reaction, "ए नाही नं ... आपला बाप्पा किती छान आहे ... " अशी होती. चेहरा रडवेला, डोळ्यांत आसवं दाटलेली ... "ए, please, नुसता वर उचलून ठेवा नं ... !" मला आपलं लहानपण आठवलं ...
असंच व्हायचं नं ! " आपले सण असे इतके short का ? ... " मी .... "का ? हा चांगला दहा दिवस असतो की ... " कोणीतरी म्हणालं . "पण आपल्याकडे घरातला दीडच दिवस का ?" ... ह्याला प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं ...! पण , आपण थोड्याच वेळात, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी 'लौक्कर' या " असं म्हणायचो ... त्या 'लौक्कर' मधे आपले सगळे भाव स्पष्ट दिसायचे ... "गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला ..." हे तेच भाव !
... मी नातीला म्हटलं, "अगं, असं नाही, पुढच्या वर्षी येईल ना बाप्पा, आपण त्याच्या उत्तरपूजेत म्हटलं ना ..."पुन्हा या परत ... यान्तु देवगणाः सर्वे ...".... आणि मग म्हंटलं .....'पुनरागमनाय च' ! ... ते तेच होतं ... " तिला पुढचं वर्ष फारच लांब वाटत होतं ...
मला मग विचार करतांना वाटलं की ,.... आपली संस्कृती, आपल्या प्रथा, आणि आपलं बोलणं, मग ते संस्कृत असो का मराठी का हिंदी ... किती छान concept आहे ... 'पुन्हा या'... असंच म्हणायचं ! मग ते देवाला, का पाहुण्यांना, का कोणाला ... आपण स्वतः निघतांना ही 'येते-येतो' असंच म्हणतो ... कोणी 'जाते-जातो ' असं म्हटलं, की मोठी माणसं लगेच म्हणतात ... "जाते नाही, येते म्हणावं !" कधी कधी वैतागाने आपण म्हणतो ... 'येरे माझ्या मागल्या' किंवा कधी कधी 'neutral gear' मधे असलो तर 'नेमेचि येतो मग पावसाळा ' असं ... पण परत यायचंच आहे ! विरह-वियोग हा तात्पुरताच आहे ही भावना ! पुन्हा परत कधीही येणं होणार नाही.... जाणारे परत भेटणार नाहीत.... असे प्रसंग ही आले...., तरी तेव्हाही मनाला दिलासा द्यायला पुनर्जन्माची कल्पना होतीच - आहेच !
आपली हिंदी गाणी तर विचारूच नका, 'अभी ना जाओ छोडकर '... असं कोणी म्हंटलं , तर त्याला उत्तर ... अर्थात वेगळ्याच संदर्भात, पण 'आजकी मुलाकात बस इतनी , कर लेना बाते कल चाहे जितनी '... असंच ... किंवा ... 'ले वचन कल शामका '... असं म्हणत ... 'अच्छा तो हम चलते है' ...!
'चलो' , 'अच्छा' हे शब्द, लोकं कुठे जायला बाहेर निघाली, की हमखास तोंडात येणारच ... त्याचा हिंदीतला अर्थ आणि आपण वापरतो तसा अर्थ ... ह्यांचा तसा अर्था- अर्थी संबंध काय असावा ? आम्ही भावंडं लहान होतो, तेव्हा रोज संध्याकाळी मित्र-मैत्रिणी खेळणं आटपून घरी जायला निघाल्या, की नुसतं 'अच्छा' वर भागायचं नाही ... त्याच्या पुढे 'अच्छा, टाटा, बाय-बाय' झालंच पाहिजे. काही जण त्याच्याही पुढे जाऊन 'please, thank you, sorry' सुद्धा म्हणायचे !!! त्याचीही खूप मजा वाटायची ! आमचं हे ऐकून मोठी माणसं 'कसली वेडपट मुलं' असा चेहेरा करायचे ... ! पण , आम्हाला आवडायचं !
शाळेच्या शेवटच्या दिवशी - send-off ला हे 'टाटा,बाय बाय' खूप रडवून गेलं ... एकमेकींच्या गळ्यात पडून, पत्ते घेऊन, पुन्हा परत भेटायचं ठरवून सगळ्याजणी घरी निघाल्या होत्या. नवीन साड्यांचा बोंगा संभाळत, नाक-डोळे पुसत, "ए, गुड बाय नाही गं म्हणायचं ... " असं करत ... ! कॉलेज सोडतांना मैत्रिणी सुटल्याचं एवढं वाईट नाही वाटलं बहुतेक ... जितकं काही 'लोकं' पुन्हा दिसतील का नाही ... भेटतील का नाही ... ह्याचं वाईट वाटत होतं ... पण ते थोडावेळच ... ! "चलो, फिर मिलेंगे ... bye ... करत निघाले होते ... त्या bye मधे थोडी चुटपुट होती ...
लग्न झाल्यावर, सासरी जातांना डोळ्यातून एकही थेंब बाहेर पडू दिला नाही ... आजीनी आधीच दम भरून ठेवला होता ... "त्यांना रडक्या लक्ष्मीचं स्वागत नाही करायला लागलं पाहिजे "... आणि honestly मला खरंच रडू आलं नाही !
मुलं झाली... मोठी होऊन कधी शाळेत जातात ... अशी स्टेज आली ! आणि मग सुरुवातीचं त्यांचं रडणं ओसरल्यावर, शाळेत जातांना ते आणि मी ही अगदी मनापासून हसत 'टाटा' करायचो ... त्या 'टाटा' चा अर्थ तेव्हा 'हुश्श ... आता चार-पाच तास मोकळीक... निवांत .... ' असा असायचा ! पुढे मुलं हॉस्टेलला गेली, नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडली ... तेव्हा जीव कासावीस होत होता, पण निघतांना त्यांना हसतमुखाने bye म्हटलं . खरं म्हणजे त्यांच्यापेक्षा मलाच स्वतःला assure करायचं होतं की ते सगळं छान manage करतील, सगळं छान होईल म्हणून ! ... नंतर सवय झाली...पण अजूनही पोटात कालवा कालव होते ....
अगदी आता आता , म्हणजे कोविड संपल्यावर शाळा सुरु झाल्या, तेव्हा एक कार्टून पाहीलं होतं ... मुलं शाळेत निघाली आहेत, आईवडील रडक्या चेहऱ्यानी त्यांना बाय करताहेत ... दुसऱ्या चित्रात मुलांची स्कुल बस निघाली आहे आणि आईवडील आनंदानी नाचताहेत ... !...
हा 'टाटा' शब्द, निरोप घ्यायच्या वेळचा शब्द कसा झाला माहीत नाही, पण झाला खरा ! आपण लहान असतांना , जवळपास सगळेच ट्रक Tata कंपनी चेच असत . त्यांच्या मागे , एक ओळीत , OK.. मग TATA... असा त्यांचा logo आणि मग Bye bye असे लिहिलेले असायचे . ते सारखं वाचून , डोक्यात बसलं असावं ...!
आता , बाबा ऑफिसला चालले किंवा कोणीही बाहेर गावाला निघालं की घरात छोटं बाळ-मूल असेल तर आईच्या कडेवर बसून दारापर्यंत येणार, हात हलवून 'टाटा' म्हणणार ! ... हे आता आपल्या शिष्टाचारांपैकी एक झालं आहे !
... पण नुकतीच घडलेली गोष्ट ! 'टाटा' कंपनीने नावारूपाला आणलेली Air India सरकारने स्वातंत्र्या नंतर त्यांच्याकडून काढून घेतली होती.... ती नुकतीच टाटांनी सरकारकडून विकत घेतली ... तेव्हा एक फार मस्त जाहीरात वाचली होती ...
.....TaTa does not always mean Bye Bye !!! ... पुनरागमन च !
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
LEKH THODA BHARAKATLAY. SANDHIGDHA ZALAY. TATA AND BYBY MADHIL ANTAR.
ReplyDeleteव्वा! छान लिहिला आहेस लेख.थोड टाटा बाय बायबद्दल लिखाण जास्त वाटतंय!पण ठीक आहे.बाकी छान आहे.
ReplyDeleteMast
ReplyDeleteधन्यवाद , यशोधर , टाटा आणि बाय बाय ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत .. बाय बाय हे good bye चा short form आहे , जे परत न भेटण्याची कल्पना दाखवते ... आणि , टाटा फक्त आत्ता या क्षणापुरते च असते ...तो फरक दाखवायचा होता ..
ReplyDeletenaraz hou nakos. tu lihit raha, amhi wachat rahu, jamat aslyas teeka karat rahu.
ReplyDeleteहो , नक्की !! ☺️
Delete