गणपती - ३
चौदा विद्या आणि चौसष्ठ कला यांचा अधिष्ठाता - आपला बाप्पा ! वक्रतुंड , महाकाय हे त्याचं एक रूप . आणखी ही किती तरी त्याची विविध रूपं, काही दृश्य, तर काही आपण कल्पीलेली ! त्याच्याबद्दल उगीच नाही पुराणं च्या पुराणं लिहिली गेली !
कधी दोन हातांचा, मग चार, सहा, आठ इतकंच नव्हे तर १८ हातांचा गणपती ! कधी साधासा, मुगुटही नसलेला तर कधी आत्ताचा ,असा की त्याचं पीतांबरही सोन्याचं ! त्याच्या दिसण्यातला - रुपातला पहिला फरक दिसतो , तो म्हणजे उजव्या सोंडेचा का डाव्या सोंडेचा ! डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे कसा happy-go-lucky ! न रागावणारा, तर उजव्या सोंडेचा म्हणजे त्याचं सगळं कडक ! सोवळ्याने पूजा-अर्चा नीट झालीच पाहिजे, नाहीतर मोठी शिक्षा ?... अशी भीती बसलेली ..की कोणी पूजा करायलाही घाबरतील. खरं तर तसं नाही. उजव्या सोंडेचा म्हणजे तो 'सिद्धी विनायक' . त्याची पूजा, उपासना करायची ती काही तरी सिद्धी मिळवण्यासाठी ! जर सिद्धी सारखी मोठी कृपा हवी असेल, तर उपासना ही तपस्याच असणार नं !
प्राचीन शिल्पांमधे तो उभा आहे, तर कोठे त्याला ३ सोंडा आहेत तर कुठे तो चौमुखी , पंचमुखी आहे. तसंच परदेशांमधेही, जुन्या काळची शिल्पं आणि खूप पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा आणि कथांप्रमाणे ही त्याचं रूप बदलतं. इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार ई. पूर्व आशियातील देशांमध्ये इ.स. ५०० - ७०० च्या सुमारास बांधलेली देवळं आणि मूर्ती. इंडोनेशियात शिवाच्या मूर्तीबरोबर गणपती दिसतो, तर कंबोडियातल्या गणपतीला दोनच हात आहेत. म्यानमारमध्ये त्याला महा-पीएन्ने म्हणतात. चीन मध्ये बौद्ध संरक्षक देवता म्हणून गणपती दिसतो, त्याला हसियांग शेन-वॅन्ग म्हणतात. जपानमध्ये कांगि-तेन म्हणून प्रसिद्धी पावलेल्या गणपतीची जुळी प्रतिमा असते, एक स्त्रीरूप आणि एक पुरुषरूप. तिथे , ही देवता तांत्रिक संप्रदायाची असते. खोतान ह्या चिनी तुर्कस्तान भागातल्या ठिकाणाहून जवळच सापडलेल्या एका मूर्तीला ६ हात आहेत. श्रीलंकेतही ही देवता प्रसिद्ध आहे, नि बरीच देवळं ही आहेत !
परदेशातलं सोडा, भारतात सर्व दूर गणपतीची मंदीरे आहेत . रणथंबोर , इंदौर , सिक्कीम , कोलकाता , उडिशा या आणि बऱ्याच राज्यांत. उत्तराखंडात डोडीताल इथे अन्नपूर्णेचं देऊळ आहे , ते पुराणातल्या गोष्टीतलं गणेशाचं जन्मस्थान मानतात ...! आपल्या महाराष्ट्रातही गणपतीची इतकी वेगळी रूपं आहेत म्हणून सांगू. गणपतीपुळ्याचा गणपती. त्याचं रूप कसं , तर समुद्राकडून पाहिलं तर जिथे देऊळ आहे ती पूर्ण टेकडीच गणपतीसारखी दिसते, आणि त्या श्री गणपतीला प्रदक्षिणा म्हणजे पूर्ण डोंगराची परिक्रमा !
पुण्यातच त्रिशुंड गणपतीचं देऊळ - गोसाव्याचे देऊळ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. त्याला तीन सोंडा आणि सहा हात आहेत. वाईचा मोठा गणपती ! त्याचं 'ढोल्या' गणपती हे नाव. आता ते बदलून त्याला महागणपती म्हणतात. पण 'खुन्या' मुरलीधर, 'बायल्या' विष्णू, 'जिलब्या' मारुती अशी नावं देवाला देणाऱ्या लोकांनी देवाला ढोल्या' म्हणावं, हे अगदीच नॉर्मल वाटतं. देवाबद्दल आपलेपणा असावा, पण तो किती ?... मुंबई जवळ टिटवाळ्याचा गणपती. कण्व ऋषींच्या सांगण्यावरून शकुंतलेनी त्या गणपतीची पूजा-आराधना केली आणि मग तिला दुष्यंत राजाने परत स्वीकारले, अशी आख्यायिका ! मुंबईच्या प्रभादेवीचा 'सिद्धी-विनायक' तर सिने-तारेतारकांचाच नव्हे तर सामान्य जनांचाही अतिशय लाडका !
कोल्हापूर, सांगली, तासगांव, नाशिक , रामटेक , कळंब ... किती नावं सांगू आणि किती नको ? अष्टविनायक तर आपल्याला पाठच आहेत. रोजच्या संध्याकाळच्या परवचा आणि लग्नातल्या मंगलाष्टकांच्या सुरुवातीला त्यांचा श्लोक आपण म्हणतोच.
काही वर्षांपूर्वी दिवे आगारला एका शेतात सोन्याचा गणपती सापडला. त्याची पूजा-अर्चा सर्व नीट होत असे. पण कुणा नतद्रष्ट लोकांना, बाप्पाच्या कृपेपेक्षा सोन्याची महती जास्त वाटली, आणि त्यांनी तो पळवला. आता तो कुठे असेल कोण जाणे !
पुणे-सोलापूर रस्त्यावर सह्याद्रीच्या भुलेश्वर ह्या पर्वतरांगेत एक देऊळ आहे. तिथला गणपती स्त्री रूपात आहे. गणेशी, विनायकी अश्या नावांनी संबोधलेली ही स्त्री-मूर्ती म्हणजे गणपतीच्या शक्तीची प्रतिमा मानतात ! अंधकासूराला मारतांना शिवाला मदत करण्यासाठी ह्या शक्ती प्रगटल्या , असं म्हणतात. तर नगर जिल्ह्यातील तिसगांवजवळ एक निद्रिस्त गणपतीचं देऊळ आहे. तिथली मूर्ती आडवीच आहे. किती रूपं ... किती गोष्टी !
अजून एक खूपच वेगळी माहिती सापडली मला ! 'नरमुख गणपती' ! आपण गणपती म्हणजे गजमुख असंच धरून चालतो - नव्हे - दुसऱ्या कुठल्याच रूपात आपण गणपतीची कल्पना करू शकत नाही. पण दक्षिणेत अशी तीन मंदिरे आहेत, तिथे आणि फक्त तिथेच 'नरमुख' गणपतीची मूर्ती आहे. एक तमिळनाडूमध्ये कुथनूर गावाजवळ तिलतर्पणपुरी नावाच्या गावात हे देऊळ आहे ! तर दुसरे चिदंबरम इथे आहे. इथल्या गणपतीला बाल गणपती असेही म्हणतात . तिसरा नरमुख गणपती नंदृदयन इथे , त्रिची शहरात ! ह्याची गोष्ट शोधायला पाहिजे !
आपण 'गणराज रंगी नाचतो' हे गाणं तर नेहमीच ऐकतो ! सर्व कलांचा देव आहेच तो. नटराज गणपतीच्या उभ्या मूर्ती, चित्रं आपण नेहमी पहातो. पण पूजेत मात्र तो बसलेलाच हवा. त्याचं अधिष्ठान पक्कंच असावं. उभा गणपती पूजेत नसतो. मात्र एका उभ्या तांडव नृत्य करणाऱ्या गणपतीची माहिती मिळाली. तांडव गणपतीची मूर्ती पेशव्यांच्या काळात, राघोबा दादांनी कर्नाटकातून मिळवली. थोरल्या माधवरावांच्या विरुद्ध तंत्र-मंत्र - काळी विद्या यासाठी. आणि तिथून पेशवाईचा ऱ्हास सुरु झाला असं म्हणतात. त्यानंतर जिथेही कुठे ही मूर्ती गेली, तिथे सर्व वाईटच होत गेलं. आता ती मूर्ती एका मठात आहे असं म्हणतात.
इतकं लिहून झाल्यावरही अजून बरंच शिल्लक आहे लिहायचं. गणपतीबद्दल लिहिणं हे आपल्या सार्वजनिक गणपतींबद्दल लिहिल्याशिवाय पूर्ण कसं होणार ! सार्वजनिक गणपती मंडळं आणि त्यांच्यातली चढाओढ प्रसिद्ध आहेच . दरवर्षी एक theme घेऊन सुंदर देखावे, मोठमोठे sets करायचे. त्यातल्या एखाद्या व्यक्तिरेखेच्या रूपात गणपती ! जसं दशरथ राजाला 'पायस' देणारा यज्ञपुरुष गणपती, तर द्रौपदीच्या वस्रहरणाच्या वेळी तिची लाज राखणारा कृष्ण-गणपती ! हे ४०-५० वर्षांपूर्वी पाहिलेले, अजून लक्षांत राहिलेले sets ! आता हलती चित्रं आणि पुतळे ... नवनवीन technology !...
पण त्यातही आता सर्वसंमतीने काही क्रम ठरले आहेत. मुंबईतला लालबागचा राजा ! त्याला मुंबईत अग्रपूजेचा मान ! जनमानसांत ती प्रतिमा घट्ट ! तसेच पुण्यातले पाच मानाचे गणपती ... त्यांचाही क्रम जगन्मान्य, त्यांचं विसर्जनही त्याच क्रमाने होणार ! जसे अष्टविनायकांव्यतिरिक्त विदर्भातही अष्टविनायक आहेत, तसेच ह्या पाच मानांच्या इतकेच महत्वाचे गणपती आहेतच ! रंगारी गणपती, श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती, मंडईचा गणपती ! आणि पेशव्यांच्या वेळी तळ्यातला गणपती, जो आता सारसबागेतला गणपती म्हणून प्रसिद्ध आहे !
आणि मला सर्वात आवडणारा सांगलीजवळ हरीपूरचा - बागेतला गणपती आणि संस्थानाचा गणपती ! तिथे मिळते, तितकी शांती मनाला फारच क्वचित ठिकाणी मिळते आजकाल !
आजकाल पर्यावरणाबद्दल आपण सगळेच जास्त सजग झालो आहोत. प्लास्टर ऑफ पॅरिस चा गणपती नकोच, पण शाडूच्या ही गणपतीचं विसर्जन नदीत, समुद्रात करून, प्रदूषण का वाढवायचं ? त्या पेक्षा आता एक छान पद्धत, की घरच्या घरीच, बादलीत किंवा नगर पालिकेने विसर्जनासाठीच केलेल्या टाक्यांमध्ये विसर्जन का करू नाही ? ह्याहूनही एक खूप छान कल्पना सापडली !! आता काही मोठ्या शहरांत, गावांत बीज - गणपती केले आहेत . गणपती करतांना त्या मातीत आता काही फुलझाडांच्या, फळ झाडांच्या बिया घालून ठेवतात . त्यांचे विसर्जन एखाद्या कुंडीत ठेवून, वर पाणी घालून करायचे . हळू हळू, त्या बिया तिथेच रुजतात, वाढतात. मग, हवं तिथे ती झाडं लावावीत !!! विसर्जन आणि पुनरुज्जीवन ...विश्वाचा नियम किती सुंदर तऱ्हेने सिद्ध होतो !!! अथर्वशीर्षात लिहिल्याप्रमाणे
'...सर्वम् जगदिदं त्वत्तो जायते , सर्वम् जगदिदं त्वत्तस्तिष्ठती , सर्वम् जगदिदं त्वयि लयमेष्यति , सर्वम् जगदिदं त्वयि प्रत्येति ..' !!!!
किती लिहू, काय काय लिहू ... पूरं पडणारच नाहीये ... संकष्टी, अंगारकीचा उपास, समर्थांनी लिहिलेली सुंदर आरती, जास्वंदीची लाल फुलं, सुंदर हिरव्यागार २१ दुर्वांची जुडी, अथर्वशीर्षाचं पठण ...! ..आणि ...यातलं काहीच न जमल्यास, आपले दोन हात आणि एक मस्तक , अशी त्रिदल दुर्वा समजून, ती गजाननाला मनोभावे अर्पण ... ! आणखी काय हवं ? ...
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
अलका खरच माहिती पूर्ण लेख! खरच खुप छान माहिती लिहिलीयस तू. तुला जमतपण लिहायला. तुझ्या लिखाणा मुळं काही नवीन माहिती मिळाली.मस्तच! तुझ लिखाण वाचले की एक वेगळंच समाधान मिळत.एवढ नक्की.
ReplyDeleteधन्यवाद , यशोधर ! तुझी कंमेंट वाचून खूप छान वाटलं ! उत्साह वाटतो लिहायला !! 😊
Delete