गोतावळा

    दरवर्षी मी एकदाच सुट्टी घेते आणि 'चुकला फकीर मशिदीत' तशी पुण्याला जाऊन येते. सगळ्या मराठी लोकांसारखेच माझे पण जवळ जवळ सगळे नातेवाईक पुण्यातच आहेत आणि त्यांच्याकडची लग्नं पण पुण्यातच होत असतात. त्याच निमित्ताने मीही पुण्याला जाऊन हातासरशी काही कामं पण उरकते. तर अशीच एक तयारी सुरु असते .... 

" हॅलो, पुण्याला चाललीयेस म्हणे ... "

" हो, भाचीचं लग्न आहे, सुट्टीही आहे. सगळेजण भेटतील ... आमचा गोतावळा खूप आहे नं ...."

" ते खरंच, ए , पण येतांना माझ्याकरता आंबा बर्फी आणि बाखर वड्या आणच. दोन किलो जड नाही तुला ... कोंब इथे तिथे एवढ्या सामानात ..." आत्तापर्यंतचा हा तिसरा फोन. 

" ए मावशी, येतांना किनई काजुकंद आणि लाट्या आण , प्लीज. "    

" नक्कीच आणीन तुझ्यासाठी " ....     असं सुरु असतं . 

उन्हाळ्याचे दिवस. आंब्याशिवाय कोणाचं पान हलत नाही. शब्दशः    

 " ए चांगले हापूस आंबे आण गं ,  नाहीतरी घरच्या गाडीनेच तर  येणार आहेस, तुला काही उचलायला लागणार नाही . विमानात वजनाचं फार बघायला लागतं बाई !" 

फोन आणि निरोप घेता घेता मी आठवेल तशी एकीकडे कामाची यादी करत असते, नि दुसरीकडे बॅग भरत असते. माझा गोतावळा म्हणजे चितळे बंधू, देसाई बंधू, खाऊवाले पाटणकर, पु. ना. गाडगीळ  , सम्राट , गजानन होजीअरी... नावंच नावं .  बरी आठवण झाली, त्या मैत्रिणीचं 'कानातलं' आणायचंय .      तिला म्हटलं,  "अगं तुला आवडेल का मी आणलेलं डिझाइन ?"     तर म्हणाली, "आण गं  कुठलंही ... त्यांची सगळीच डिझाईन्स सुंदर असतात."     म्हणजे माझ्या निवडीपेक्षा त्यांच्या डिझाईनचं कौतुक!

    मला सख्खे - चुलत, मामे - मावस, मानलेले - जोडलेले, सगळे भाऊ आहेत.  मी काही कुणाला राखी पाठवत नाही.  केवळ आळशीपणा.  पण कधी मी आळस झटकून राखी पाठवायचं ठरवलंच तर पहिली राखी चितळे बंधूंना पाठवीन ! सण - वार, लग्न - कार्य असो , नाहीतर अवचित पै - पाहुणा असो, समस्त मराठी बहिणींच्या मागे हे 'बंधू' समर्थपणे उभे असतात. कसलंही 'क्रेडिट' न घेता. अशा माणसांना न भेटता परत कसं येणार     तसंच गाडगीळांशिवाय कोणत्याही कार्याला शोभा नाही, चमक नाही. तिथे गेल्याशिवाय पुण्याची फेरी पूर्णच होत नाही. 

    ह्या लिस्ट बरोबर मी कोणा कोणाला भेटायचंय तेही ठरवत असते.     ह्या मामीला, त्या काकूला भेटायचंय ... शाळेतली मैत्रीण -  रागावली असेल ... तिला पत्र पण नाही लिहिलं, मुलीच्या लग्नाचं निमंत्रण आलं तरी ... रणजितला फोन करायचाय ... मागच्या वेळी आत्याला चाट दिली होती ... सगळ्यांना भेटीन ... तरीही  कोणीतरी राहीलच,  कोणीतरी रुसेलच अन् मग फोनवर बोलणी खावी लागतीलच.  असो ,पण चला, तयारी तरी होत आलीये. 

    तेव्हढ्यात फोन वाजतो,     "हॅलो, वहिनी , पुण्याला जाताय ना ?"                                                               "अहो, सगळेच जातात. असं म्हणताय, जसं कोणी अमेरिकेला जातंय                                                        "अहो, अमेरिकेला आजकाल सगळेच जातात. माझ्याच कंपनीत दर महिन्याला १० जणांना पाठवतात. पुण्याला जाणारेच कमी.     दिल्ली, सिंगापूरला जातील ... पुण्याला कामं कशी काय नसतात कोण जाणे ?"                            " काय आणायचंय ?"        " वा , म्हणजे बऱ्याच गोष्टी आणायला सांगितल्या आहेत तर .....हे लोक म्हणजे , स्वतः निघाले की सांगायचं नाही , पण दुसरा निघाला , की धरला वेठीला !!! 

   " पुढे बोला ..."     "हो, हो, फार काही नाही, जरा नाट्य-संगीताच्या CD - कॅसेट्स बघा ना मिळाल्या तर,  तुमची खूप माणसं आहेत ना पुण्यात ?"    " हो, नक्की बघीन ".....    तेवढंच राहिलं होतं . 

खरं आहे , सगळेच जातात पुण्याला , पण तेव्हा आणतात का लोकांचं सामान ?मनात विचार चाललेत, बरी आठवण झाली ... मालिनी आजीचं नाव विसरले होते मी ... मनातल्या मनात धुसफुस करत , चिडचिड करत .... चालू असतं माझं ! 

   अजून एक  गोष्ट विसरलेच होते !! ही आणायची लिस्ट आहे ! पुढच्या दोन दिवसांत घेऊन जायच्या सामानाची भर पडेल . अगदी झाडू पासून ते पाळण्यापर्यंत !! .... मग नवरा अबोला धरेल ....शेवटी कशीबशी तडजोड करून आम्ही जाऊ ......

  पण , खरंच , अहो, एवढा गोतावळा आहे माझा पुण्यात, सगळ्यांना भेटल्याशिवाय मी परत येऊच शकत नाही ...!!! आणि .....जमलंच तर वेळात वेळ काढून भाचीच्या लग्नाला जाईन, चार अक्षता उडवून, पहिली पंगत गाठली की मी  'माझ्या माणसांना' भेटायला मोकळीच आहे .......!!! 



Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland