मीठ अळणी ... ?
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा आजी आली असतांना आईने आजीच्या बहीणी, भावजया, मैत्रिणी यांचं get-together केलं होतं. सगळ्याजणी अगदी ठेवणीतली महेश्वरी लुगडी, केवड्याचं अत्तर वगैरे लावून आल्या होत्या, आणि लहान मुलींसारख्या चिवचिवत होत्या. आईनेही भला भरभक्कम मेन्यू केला होता. इडली-चटणी पासून ते गाजर हलवा - आईस क्रीम पर्यंत. सगळ्या enjoy करत गप्पा करत होत्या. विषय अर्थातच तब्येती, शुगर, गोळ्या, दात, सांधेदुखी वगैरे. तेव्हढ्यात एक जण म्हणाली, " ...सगळं बदललंय हो, आता हेच बघ, ह्या उपम्याला कढीपत्त्याचा वास तरी लागलाय का ? ह्या हायब्रिड मुळे म्हणावं का , कशामुळे म्हणावं ...?" मी आईला म्हंटलं, "बघ, तू एवढं केलंस, एवढी पानगळ आहे कढीपत्त्याची उपम्यात, तरी म्हणताहेत की वास नाही लागला ..."
"अगं, वयामुळे वास, चवी सगळं कमी होतं बाई" , आई म्हणाली ."तू त्यांचीच कड घे" असं म्हणत मी तेवढ्यावरच तो विषय सोडला.
पण जसं माझं वय वाढत गेलं, तशी त्याची प्रचीती यायला लागली. सासूबाईंच्या तमिळ मैत्रिणी आल्या की त्यांचं कॉफीबद्दल हेच मत असायचं ! आजकाल फ्लेवर कमी झालाय, बहुतेक कॉफीच्या बियांचं तेल काढून घेत असावेत ... वगैरे. मग कपात extra कॉफी घालून मी ते compensate करायचे !
एकदा उन्हाळ्यात धाकट्या मुलाकडे गेले असतांना त्याने कोला दिला प्यायला. मी २-४ घोटांत ओळखलं की हे काहीतरी वेगळं वाटतंय. माझ्या मनात अनेक शंका - कुशंका !! "अरे, असा साबणासारखा का लागतोय हा कोला ?" "आई, तुला वाटतंय तसलं हे 'दुसरं -तिसरं' काही नाहीये. तू बहुतेक डाएट कोला पिते आहेस आणि तो पुरेसा गार झाला नाहीये." " असं होय ", मनात म्हंटलं, "हुश्श, आजचं म्हातारपण उद्यावर ..."
पण नाही. ते येतंच आहे त्याच्या स्पीडने. कधी हळू तर कधी वेगाने. तसे speed - breakers आहेत म्हणा! भिश्या, मैत्रिणी, mall मध्ये 'सिनेमा आणि लंच' ची date ( नवऱ्याबरोबरच हं ! ). अधून मधून हळदीकुंकवं, मंगळागौरी, डोहाळजेवणं वगैरे .
पण ह्या lockdown वगैरेमुळे मात्र फार उत्पात झाले, सगळ्यांच्याच आयुष्यात. कितीही नाही म्हटलं तरी काळज्या, अनामिक भित्या, दुःख - आघात , सगळ्याचीच अनिश्चितता , यांनी म्हातारपण आलं. गाडी घसरणीला लागावी तसं . मन खचलं , शरीर खंगलं .
ना. सी. फडक्यांना ( का काणेकरांना .?.आठवत नाही,... वय झालं ?) डोक्यावरचा एक पांढरा केस - कृतान्तकटकामलध्वज - म्हणजे यमाच्या रथावरचा पांढरा झेंडा वाटला. इथे आरशात पाहीलं की मला तर यमाची सेना किंवा कसलातरी मोर्चाच दिसतो. विचार करकरून डोकं अक्षरशः पिकलंय. पण मोर्चाला पांढरी निशाणं कशाला? निषेध मोर्चांसारखी काळी निशाणं चालली असती ! ....असो .
गेल्या आठवड्यातच मोठ्या मुलाकडे जाऊन आले. सुनबाईने सर्व व्यवस्थित केलं, अगदी साग्रसंगीत ! पण मला चव लागेना ...चव लागत नाही? म्हटलं , झाला वाटतं कोविड आपल्याला ! ... भीतीने गाळण उडाली. मग एकच चाळा लागला. साखरेचा डबा उघड .. एक चिमूट साखर खा ... हां, गोड लागतेय. Good . गुळाचा डबा उघड ... एक खडा तोंडात .. हां, गोड लागतोय. कॉफीची बाटली उघड ... वास घे ... हां, वास येतोय ! चांगलीच strong वाटतेय. मिठाची बरणी उघड ... एक चिमूट ... आणि एकदम धस्स झालं ! हे असं कमी खारट का लागतंय? फार नाही , पण किंचित कमीच आहे खारट ! कोणाला विचारावं ? नवऱ्याला विचारायची सोया नाही . तो वेड्यात काढेल . मग भीत - भीत, चाचरतच मुलाला विचारलं, "का रे, तुम्हाला पोह्यांत मीठ कमी नाही लागलं ? "
".......??"
"थांब, खरं सांगू का तुला? मी आत्ता चिमूटभर मीठ खाऊन बघितलं रे, तर ते मला कमी खारट लागतंय, खूप भीती वाटतेय ..."
"अगं आई , त्यात काय एवढं ? ते low sodium salt आहे. कदाचित वेगळी कंपनी असेल ... जरा कमी खारट वाटतं सुरुवातीला, मग सवय होते" .... म्हटलं "थॅंक यू रे बाबा, मला वाटलं कोविड झाला की काय ?..."
"अगं, असं काय करतेस ? आणि तसंही जरा वय झालं की flavours, वास, चवी सगळ्यांचं perception कमी होत नाही का ?"....
म्हणजे आलं म्हातारपण ...? आलं असेल किंवा नसेलही ... ते येवो का न येवो, एक मात्र खरं ... मीठ अळणी असू शकतं , बरं का !
Comments
Post a Comment