तवा - तवारी

     कोणतीही सुट्टी - मग ती उन्हाळ्याची असो का ख्रिसमसची - मला प्रवासाची आठवण होते. लहानपणी सुट्टी लागली की गावाला जायचं. उन्हाळ्यात आजोळी आणि थंडीत निरनिराळी ठिकाणं - गावं पहायला.  तेंव्हा फिरकीचे तांबे आणि वळकट्या  इतिहास जमा झाले होते - वॉटरबॅग्स आणि   होल्डॉल वगैरे होते आणि  प्रवासात तेवढीच मजा असायची

    पुढे, मुलं शाळेत जायला लागल्यानंतरही सुट्ट्यांनुसार प्रवास असायचा आणि असं जाणवलं की दर वर्षी प्रवास जरा जास्तच 'चित्तथरारक' होत गेला !  २४ तासांचा प्रवास, पाण्याच्या बाटल्या, सुरया, २ - ३ वेळचं खाणं, ३ - ४ पुडाच्या टिफिन कॅरियर मधे जेवण, च्याऊम्याऊ, कंटाळा आला तर खेळायला पत्ते, चित्र काढायला रंगीत खडू ,  वह्या,  फारच कंटाळा आला की पानं फाडून बोटी - विमानं आणि जेवणं झाली की सांड - लवंड  अन् ड्राय - क्लिनिंगला तेच कागद ! थंडीत स्वेटर्सचा ढीग. किती डाग झाले , असा प्रश्न नवऱ्याने विचारला ,की दर वेळी नवा आकडा !! 

    मी परतीच्या प्रवासाला निघाले की आई म्हणायची, '            तवा - तवारी, दो मण जवारी ,

           उसपे बैठी बीवीकी सवारी । 

           आगे हसन, पीछे हुसेन

            अन् जागा असेल तर मी बी बसेन ।

तसं आमचं असायचं. परिस्थिती इतकी 'बिकट' असायची की प्रवासातला मुलांचा उत्साह नकोसा वाटायचा, आणि गाडी सुटली , की थोड्याच वेळात त्यांना कंटाळा ही यायचा !! 

 "आई, क्रोसीन आणलं का ?  मागच्या वेळी मला ताप आला आणि तुझं डोकं दुखलं ... "   

  " आई गं , यावेळी आपली गाडी लेट झाली नं की आपण फळ - फूल - नाव - गाव खेळायचं, स्क्रॅबल नको प्लीज, ..."    शुभ बोल रे नाऱ्या ... मला रडूच यायचं , पण ते सासरी परत चालले म्हणून नसायचं .... 

    पण जमाना बदलला ! आता प्रवासात पाण्यासाठी धावाधाव होत नाही, सगळीकडे 'बिसलेरी' मिळतं. लेबल असलं की झालं, मग भरेनात का ते स्टेशनवरच्या नळावर ! आपल्याला तर धावायला लागत नाही, आणि नवरा  पाणी भरून आणेपर्यंत गाडी सुटते का काय ही भीती पण नाही.     'स्टेशनवरचं  सगळंच घाण' हा विचार बदलतोय (?), आजकाल a.c. मुळे धूळ - धूर काहीच नसतं. आणि खरं म्हणजे 'आपण काही रोज - रोज जात नाही' असं म्हणत लोक विमानानी जातात.  मग travel light ओघानेच येतं.  शिवाय सगळीकडे सगळं मिळतं, त्यामुळे आता गावाला जायचं म्हटलं की एक - दोनच डाग होतात, आणि पूर्ण प्रवासात मी 'काहीतरी विसरलं असलंच पाहिजे' अशी चिंता करत बसते !!

    पण तसंही नाही.  जमाना पुन्हा बदलतोय.  नुकताच मैत्रिणीचा मुलगा अमेरिकेला शिकायला गेला. त्याचं कौतुक करायला,  मी ही गेले एअरपोर्टवर आणि त्याचं सामान पाहून ..... मला रडू यायला लागलं !   इतकं सामान ... एका मुलाचं  एक बॅग वह्या-पुस्तकांची( का तर तिथे खूप महाग म्हणून ), दुसऱ्या बॅगेत कपड्यांचे २० सेट्स ( हे त्याच्या आईने सांगितलं ), शिवाय एका बॅगेत कुकर, भांडी,मसाले,डाळ - तांदूळ ( तिथे अभ्यास करणार का स्वैपाक ?). दोघा  - दोघांनी हात लावल्याशिवाय तसूभरही सरकणार नाहीत अशा वजनी बॅगा !  शिवाय एक जरा मोठीच हॅण्डबॅग होती .... कागदपत्रं, तिकीट, पासपोर्ट, पैसे, गाण्याच्या सीड्या, थोडा खाऊ, लाडू वगैरे आणि थोडे कपडे ही ... म्हटलं हे कशाला?   तर म्हणे, समजा कुठे फ्लाईट लेट झाली, कनेक्शन मिस झालं, बॉम्ब - स्केअर वगैरे काही झालं आणि मधल्याच  एअरपोर्टवर १ - २ दिवस अडकून पडावं लागलं,   तर असावेत बरोबर ... तहानलाडू - भूकलाडू .. !!! मनांत म्हटलं, एकूण काय, पुन्हा तेच 

        ... तवा - तवारी ... 

Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland