पत्र लेखन
गेले कित्येक दिवस मी लिहित्येय. रोजच्या घडामोडींबद्दल जे मनात यायचं ते लिहिते. दरवेळी लिहायला बसले की वाटतं, आपण पत्रच लिहितोय !
चांगलं पत्र लिहिणं ही एक कला आहे. सगळ्यांना जमतेच असं ही नाही, आणि आवडतेच असंही नाही. खूप मोठे लोक , साहित्यिक , नेते , पत्रलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. शाळेत ११वी पर्यंत मराठीच्या पुस्तकात दरवर्षी एक पत्ररूपी धडा असायचाच. तो वाचला की, 'दुसऱ्यांची पत्रं वाचू नयेत' हे एकदम पटायचं ! किती तो उपदेश ! ... सारखं हे करू नका , ते करू नका .... कॉलेजमधेही इंग्लिशच्या पुस्तकात पत्र ठेवलेलंच. त्याही पुढे जाऊन , इतिहास - भूगोल ही पत्रांतून वाचायचा म्हणजे काय ? छळ - पीळ काहीही म्हणा.
खरंतर कॉलेजचे दिवस म्हणजे 'लिखे जो खत तुझे' असे रम्य दिवस !!! एखादं रटाळ लेक्चर असलं की अर्धा वर्ग पेंगत असायचा आणि बाकीची मंडळी आपापले खास निरोप - आरोप वगैरे कामं उरकून घ्यायचे. वर्गाच्या ह्या टोका पासून ते पार त्या टोकापर्यंत चिठ्ठ्यांची जा - ये चालू असायची. त्यांचे 'सेफ - रूट्स' ही ठरलेले असायचे. एकदा खूप युक्त्या करून आम्ही ३-४ मैत्रिणींनी असंच एक प्रेमपत्र intercept केलं ! दोन्ही टोकांना खूपच धांदल उडाली !! पुढच्या लेक्चरला दांडी मारून लायब्ररी गाठली आणि धडधडत्या अंतःकरणाने चिठ्ठी उघडली ! खरं तर , आम्हाला कशाला धडधडायला हवं होतं ? पण तरीही !!!....तर त्यात लिहिलं होतं , "please तुझं Chem record book देशील का ? ..." eeekkks ! ह्या करता चिठ्ठी कशाला लिहायची ? नुसतं नाही का मागता येत? सगळी मेहनत वाया गेली .... शिवाय absent mark लागला तो वेगळाच !!!
लग्नानंतर नवऱ्याची सततच 'टूर - टूर ' चालू , त्यामुळे पत्रांना खूप 'स्कोप' होता. सुरुवातीला बरं होतं , पण मग हळूहळू ' विजेचं बिल भरलं का ? बँकेत चेक टाकला का? 'असल्या 'रम्य आठवणी' तो काढायला लागल्यावर मी माझा सोस आवरता घेतला .
आजकाल e -mail, sms ला लोकं नावं ठेवतात,WA तर फारच बदनाम होतंय . पण माझ्यामते ती miniature पत्रच आहेत, आणि ती नीट लिहिता येणं हे मी एक आव्हान समजते. अगदी कशालाही ढीगभर कौतुक नको , किंवा अगदीच रोखठोक सरकारी खाक्याचं कोरडं उत्तर नको . जरा अधेमधे smile वगैरे emoji , थोडी फुलं पानं , पुष्पगुच्छ ... बरं वाटतं !मेसेज कसा , वाचावासा वाटला पाहीजे !!
मुलाने अगदी पहिला 'मोबाईल' घेतल्यावर मी लगेच नवऱ्याला फोन केला त्याच्यावरून आणि सांगितलं, "हे नवीन technique शिकायचा विडा उचललाच बघ, आता १० मिनिटात तुला मेसेज टाकते, आपले खूप पैसे वाचतील फोन चे , !... "
बसल्या जागी सगळं शिकून घेतलं.फारसं शिकायला नव्हतं ही ! फक्त sms ! मी बटणं दाबत होते आणि बघता - बघता स्क्रीनवर a b c d दिसायला लागलं ! उत्साहाच्या भरात मी ते सगळं send पण करून टाकलं !! स्क्रीन वर abcd पाहून भांबावून गेला असेल !
दोन मिनिटात त्याचा फोन. 'तुला काय सांगायचंय? तू फोन करून बोल, पैशांची चिंता करू नकोस, जाऊदे गेले तर .. , पण हे abcd आवर.. !." Background मधे मुलं खिदळत होती, "आईनी विडा नाही उचललाय, सुपारी घेतलीय sms ची ... !" जाऊदे, होतं असं कधी कधी. पण आता इतकी पंचाईत होत नाही !
असो. हे 'पत्र-लेखन' बरंच लांबलं. कळावे लोभ असावा ही विनंती !
Comments
Post a Comment