डॅडी
काही दिवसांपूर्वी मॉलमधे गेलो होतो. तिथे window shopping करत हिंडत होतो. आमच्यासारखेच अनेक जण. अचानक मागून कुठूनतरी आवाज आला, 'वेगम् कुट्टी, वेगम् ( पटकन् चल, बाळा पटकन् )' असं मल्याळी भाषेतलं बोलणं ! मी चमकून मागे वळून बघितलं. मी त्या लोकांकडे बघत नव्हते, तर माझ्या भूतकाळात बघत होते. तिथे माझे वडील होते ! आणि ते मला आणि माझ्या बहिणीला सांगत होते ! माझे डॅडी बोलतांना वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या भाषा वापरणारे ! काही ठरलेल्या गोष्टी, ठरलेल्या वेळीच आणि तेंव्हा त्या कोणत्या भाषेत बोलायचं हे ही ठरलेलं ! ... नकळतच मी हसले ... काहीतरी हरवलेलं सापडल्याच्या आनंदात ... क्षणभरच !
८ जून हा त्यांचा वाढदिवस ! ते असतांना कधी आठवला नसेल इतका आता आठवतो. ते असतांना कधी साजरा केल्याचा आठवत नाही. अर्थात तेंव्हा cake वगैरे कशाचीच पद्धत नव्हती. आज त्यांच्याबद्दल जे काही वाटतं ते लिहिणं हाच उद्देश !
मी जन्मल्यापासून ५ वर्षांची होईपर्यंत दिल्लीत राहिल्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या मुलांसारखी मी ही माझ्या वडिलांना डॅडीच म्हणायला लागले. 'ए डॅडी' चं 'अहो डॅडी' पुण्यात आल्यानंतर झालं. Drawing, painting, vocal music, violin, पेटी, मल्लखांब, cricket ह्या सगळ्यांत ते तरबेज. आणि हे सगळं करून झाल्यावर मग अभ्यास ! आणि तो ही कसा, तर B. Sc. ला Chemistry मधे Silver medal ! मी म्हणायचे, "डॅडी, तुम्हाला silver medal का मिळालं ? Gold का नाही ? थोडासा आणखीन अभ्यास करायला हवा होता का ? " ते हसले आणि म्हणाले, "अरे बेटा , तेंव्हा chemistry first rank ला silver च होतं ! त्यानंतर मग university ने gold medal देणं सुरु केलं !" दुसरी मजा म्हणजे B. Sc. करून मग B. E. ला गेले. मी म्हणायची, "हे काय असं केलं ? तुमच्या बरोबरचेच नव्हे तर juniors सुध्दा तुमचे seniors झाले असतील ना ?" त्यावर ते हसायचे अन् म्हणायचे, "एवढंच कशाला ? तिथेही बऱ्याच जणांना वाटायचं की मी मधे मधे नापास झालो !" "अहो डॅडी, हा किती अन्याय आहे ..." त्यावर ते फक्त हसायचे, म्हणायचे, " जगात सगळ्यांना न्याय मिळतोच असं नाही ! आणि किती जणांना आपण सांगत बसणार आहोत ? लोक त्यांना हवं तेच खरं मानतात ! त्याचा विचार करायचा नाही, आपण आपलं काम करत राहायचं !" त्यांचं बोलणं जसं कोरलं गेलंय मनावर ! त्यांचं मेडल माझ्याजवळ आहे !!!
श्रीनगर, दिल्ली, सिमला ,जयपूर, कालिकत, मुंबई, अहमदाबाद,कलकत्ता, दिब्रुगढ, सांगली, पुणे, जबलपूर,इंदोर, भोपाळ ,... असा पूर्ण भारताचा फेरफटका नोकरीच्या निमित्ताने झालेला ! त्यामुळे सगळ्या भाषांबद्दल आपुलकी, आणि त्यातलं ज्ञानही ! कधीही 'किती वाजले' असं विचारतांना 'मणी यत्रे' च ! आम्ही बहिणी चेंगटपणा करत बसलो की 'वेगम् कुट्टी' आलंच पाहिजे ! ऑफिसला निघाले की, 'सरी, ना पॉटे' ! कोणीही मित्र आले की , " आशून, बोशून, केमून आचेन !" All India Radio मधे नोकरीसाठी interview देतांना त्यांना विचारलं की जर तू इंजिनियर झाला नसतास तर काय झाला असतास ? त्यावर त्यांनी उत्तर दिले, "I would be on the other side of the mike". त्यांना गाण्याची अतिशय आवड ! ते त्यांच्या कॉलेजच्या प्रोग्रॅमचे music director असायचे. ते इंजिनियर नसते तर त्यांनी नक्कीच music मधे करियर केलं असतं ! त्यांनी निवडलेलं करिअर ही इतकं छान केलं !! पुण्याचा high power transmeter उत्तम तऱ्हेने आणि वेळेच्या आधीच पूर्ण केल्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या टीमला त्या वर्षीचं award दिल्लीत देण्यात आलं !! पण एकाही शब्दाने त्याची वाच्यता नाही ! म्हणाले ," माझं काम मी केलं , त्यात काय विशेष ?"..
अतिशय हळवे ! आम्हाला काही झालं की त्यांना इतकं वाईट वाटायचं, काळजी वाटायची, की ते काळजीपोटी रागवायला लागायचे ! आणि त्यांचं रागावणं पाहिलं की आम्हाला खूप रडायला - आणि खरं म्हणजे हसायलाही यायचं, मग आणखी बोलणी ! आम्हाला कधीही कशाचंही बंधन नव्हतं, आवडेल ते करा, पण नीट करा ! हेच तत्व ! ते असेपर्यंत त्यांचा आधार हे life jacket च होतं आमचं !
त्यांच्या बद्दल लिहायचं तर मला कागद, पेन, शाई, सगळं अपुरं पडेल ! कारण ,केवळ ते माझे वडील म्हणून नाही, तर एक अत्यंत सरळ , साधा , सज्जन माणूस ! प्रत्येक आठवण special, काहीतरी शिकवणारी, त्यांच्याबद्दल सांगणारी ! सगळ्यात मोलाची कोणती ,असं विचारलं, तर मात्र मी ही सांगेन !
माझ्या दोन चुलत भावांच्या मुंजी होत्या. त्यापैकी एकाची मुंज डॅडींच्या मांडीवर लावावी असं आजीला वाटत होतं. मुलाची मुंज केल्याचं पुण्य त्यांना मिळावं म्हणून. कारण आम्हाला सख्खा भाऊ नाही . तसं ठरलं होतं खरं, पण ऐनवेळी 'सुट्टी मिळत नाही' म्हणून डॅडी आले नाहीत. आजी जरा चिडली. आई आणि आम्ही दोघी होतो, पण डॅडी नव्हते. असो , मुंजी झाल्या.
त्यानंतर अगदी शेवटी , आई गेल्यावर जेंव्हा ते इथे माझ्याजवळ होते, तेंव्हा आम्ही बरेचदा गप्पा मारत बसायचो. एकदा मी त्यांना विचारलं की, "डॅडी, मुंजीच्या वेळी का नाही आलात तुम्ही ? आजी-आजोबा रागावले. तुम्ही असं केलं नाही कधी, तेंव्हा काय झालं ?" दोन मिनिटं काही बोलले नाहीत. मग म्हणाले, "सांगतो तुला.... मला यायचंच नव्हतं. विचार कर तू ... मी आलो असतो, तर त्याचा अर्थ असा झाला असता , की मी मुलासाठी - मुंजीच्या पुण्यासाठी झुरतोय .... म्हणजेच तुम्ही दोघी मुली झालात म्हणून मी नाखूष आहे. मुलींपेक्षा मुलगा श्रेष्ठ आहे ,असं मला कधीही वाटलं नाही, मग मी असा समज का करून द्यायचा तुमचा आणि सगळ्यांचा ? ... माझ्या न येण्यामुळे आजीला राग आला असेल, पण ममी आली नं तुमची !.... तिने येऊन आजीचा मान राखला .... आणि ...मी न येऊन तुमचा अपमान होऊ दिला नाही ..."
... Hats off to you, Daddy ! .... तुम्ही केलात , तेवढा आमचा सन्मान अजून तरी कोणी केला नाहीये ! ...
Hi,reliving the memories and enjoying the same!Very well said!
ReplyDelete