वसंत ऋतु

     लहानपणी मी तिसरी-चौथी मधे असतानाचा काळ.  तेव्हा छान छान पौराणिक सिनेमे यायचे. तेव्हा 'picture' म्हणत नसत. सिनेमाच म्हणत. त्यात एक 'सुभद्राहरण' नावाचा सिनेमा पाहीला होता.  त्यातलं बाकीचं काही आठवत नाही.  अर्थात ,गोष्ट आधी माहीत होतीच, ती बरोबर दाखवली आहे का नाही , हेच पहात होतो ! पण त्यातलं एक गाणं लक्षात राहीलं.  "आला , वसंत ऋतु आला ..."   Black and white चा जमाना असूनही गाणं इतकं छान होतं की बागेतल्या फुलांचे वेगवेगळे रंग ( म्हणजे  grey च्या shades ) ,  आकार वगैरे सगळं खूप आवडत होतं !

      तर तेव्हापासून तो ऋतु मनात बसला !  कधीही कुठेही फुलं फुलली, कशाला पालवी फुटली की वसंत ऋतु आला !!  थंडी संपली की , हा येणार किंवा हा आला की , थंडीला जायलाच पाहिजे असं ठरवून टाकलं.  मोठी होत गेले तरी ते गाणं आणि तो मौसम मनात ठाम राहीलाच. 

      हळू हळू शाळेत शिकतांना दर वर्षी वसंत ऋतुवर एखादी तरी कविता असायचीच .  आंब्याचा सीझन, कोकिळेच गाणं, फारच 'happy' वाटायचं.  परीक्षा संपता संपत नसत आणि वसंत ऋतु मात्र अगदी जोषात असायचा.  परीक्षा संपल्या की जरा बागेत उनाडावं म्हटलं तर ऊन्ह इतकं वाढलेलं असायचं की हा 'वसंत' गेला वाटतं असं वाटायचं.  मग वरच्या वर्गात, कॉलेजमध्ये शिकतांना वसंत ऋतुवरचा 'कल्पनाविलास' खूपच वाढला !  'मालविकाग्निमित्रम्'  शिकतांना' वसंतोत्सव साजरा करायला बागेत विहरणाऱ्या तरुणींच्या लत्ताप्रहाराने फुलणारा अशोक वृक्ष' म्हणजे तर romantic पणाचा कळसच ! पण तोपर्यंत जगाच्या वाईटपणाची इतकी भीती बसली होती की विचारू नका !  तसंही कुठेही picnic-सहल म्हंटलं की घरच्यांचा कडाडून विरोध असायचा. तुम्ही मैत्रिणी-मैत्रिणी सहलीला जायला अजून लहान आहात.  तेव्हा 'मित्र' नसायचे.  कधी चुकून-माकून दिवसभराच्या सहलीला जायला मिळालेच,  तर  'अज्ञात पोलीस' आजूबाजूला असायचे बहुतेक.  ते कधी दिसले नाहीत, पण बागेतल्या picnic मधे कोणी काय केलं, कोण धडपडलं, अगदी कोणी तलावाच्या पाण्यात पाय बुडवायचा प्रयत्न केला, ह्या सगळ्याची बित्तंबातमी आम्ही घरी पोहोचायच्या आधी वडील मंडळींना कळलेली  असायची.  एकूण काय , तर आपला 'वसंत ऋतू' यायला अजून वेळ आहे असं वाटायचं !

     त्यानंतर मुलं लहान असतांना,  वसंत ऋतु वगैरेवर विचार करायला वेळच नसायचा.  सूर्य उगवण्यापेक्षा मुलं उठली की सकाळ, आणि झोपतील तेव्हा रात्र !  आजचा आणि उद्याचा दिवस ह्यांमधली सीमा रेषा धूसर नव्हे, अस्तित्वातच नव्हती !  तेव्हा ठरवलं की मुलं एकदा मोठी करूया, ती मार्गी लागली की मग सगळं life enjoy करायला वेळच वेळ !  असं म्हणून बरीच वर्ष कॅलेंडरची पानं उलटावी तशी उलटवून टाकली.
    आणि ...आता खरा वेळ मिळतोय ! सकाळी थोडा वेळ घरच्या चिमुकल्या बागेत एक फेरी मारली तर दिवस छान जातो.   "अरे,  इथे बघ ह्याला कळी आली, ह्याला एक कोंब येतोय ... thank god ... हे झाड जगलं! मला वाटलं की गेलं का काय, "असं करत दिवसाची सुरुवात होते.  आणि मग बागेत काहीतरी special  येणं हा एक highpoint होतो. Mayflower ला दांडा येणं, ब्रह्मकमळाला कळ्या, हे अगदी खास दिवस. आणि मग त्या लवंगी एवढ्या कळ्या नारळाएवढ्या मोठ्या होत ,एका रात्री त्या फुलणं, हा सोहळा होऊन जातो !  मग दर तासाने त्यांना पहायला जायचं !  फोटो काढायचे, सर्वांना पाठवायचे ... झोपायला रात्रीचे बारा वाजतात ! एखाद्या सणात किंवा कार्यात व्हावं तसं ! वर्षानुवर्ष न फुललेल्या एखाद्या रुसक्या orchid ला फुलं येणं ,हा त्यांचा खरंच वसंत ऋतुच, आणि आपलाही !

  .... आपल्याही का नसावी second innings ?  आनंदात रहाणं, आपल्याला हवं ते, हवं तेंव्हा, हवं तितकं करता येणं, हा आपला मनाचा वसंतच नाही का ?  एखाद्या मोठ्या आजारपणानंतर किंवा तब्येतीच्या calamity मधून ,  आपण पुन्हा उमलून येणं हा दुसरा 'वसंतोत्सवच' नाही का ?

    आता म्हणाल , तर मी आणखी एका वसंत ऋतूची वाट पहात असते.  आजकाल मुलं-मुली परगावी - परदेशात किंवा अगदी आपल्याच गावात वेगळी रहातात. ते योग्यच आहे ! ती कुठेही असली तरी त्यांचं आपल्या घरी येणं फक्त शाळांच्या सुट्टीतच !  अगदी थोडा काळ !   चंद्रशेखर गोखले त्यांच्या चारोळीत म्हणतात, तसंच 'वसंत येतो, तो मी जाणार आहे लवकरच', हे सांगतच !  नातवंडांचं येणं, हा तो वसंत थोडा वेळ बडबड, चिवचिवाट, दंगा-मस्ती, हसणं, रडणं, रुसणं, बागडणं .. आणि मग थोड्या वेळाने निघाले की  पुन्हा घर शांत शांत ! ..... मग बसायचं, पुन्हा हा वसंत ऋतू कधी येतो, त्याची वाट बघत ! ....
    
    

Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland