जत्रा

 

    जत्रा म्हटलं , की डोळ्यांसमोर किती गोष्टी येतात ना ?   आपल्या सिनेमांच्या दुनियेत जत्रा म्हणजे कोणाचीतरी विशेष भेट किंवा ताटातूट वगैरे.  पण ते जाऊ द्या.  जत्रा म्हटलं की मला खूप छान छान गोष्टीच आठवतात ... 

    सांगली छोटंसं गांव,  ५० वर्षांपूर्वी शेवटचं पाहिलं.  तेव्हा ते छोटंसंच होतं आणि गावंच होतं.  तिथली शाळा पण गावासारखी, अगदी friendly .   मनमुराद मजा करावी, खेळावं, हसावं !  आणि सगळ्या सणांना सुट्टी तर ठरलेलीच, पण सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे दर श्रावणी सोमवारी छोट्या सुट्टीत शाळेतून सोडून द्यायचे.   कारण ?  तिथून जवळच एक छोटंसं गाववजा खेडं - हरीपुर !  तिथे कृष्णा आणि वारणेचा संगम.  संगमाजवळ शंकराचं सुंदर देऊळ, आणि दर श्रावणी सोमवारी जत्रा.  आणि तिथे जाता यावं म्हणून शाळेला सुट्टी ! ... 

   ...त्या दिवशी आमचं सगळं ठरलेलं असायचं.  शाळेतून घरी आल्यावर लगेच हळूहळू गुपचुप जत्रेला जायची तयारी !  दप्तर - डबा  जागच्या जागी, एरवी नाही , तरी त्या दिवशी कपडे बदलून, खालमानेनी अभ्यास - असलाच तर उरकायला बसायचं !  १० मिनिटांनी मैत्रिणी यायच्या, "अलकाच्या आई, तिला जत्रेला पाठवा ना आमच्या बरोबर ...!"...तेव्हा असंच म्हणत .    एकदम कुणाला काकू -मावशी करत नसत ....   मग त्या,  आईच्या सगळ्या अटी मान्य करायच्या,  मुख्य म्हणजे धाकट्या बहिणीला बरोबर न्यायचं ( नसतं झेंगट वाटायचं .. तेव्हा ... ).  तोपर्यंत मी पटापटा पुस्तकं उचलून , आवरून तयार ! ...  मग आम्ही ७ - ८ जणी निघायचो. सोबत पाण्याची बाटली ( बहिणीकरता ),  थोडीफार बिस्किटं उगीचच ... आणि जत्रेत काहीतरी घ्यायला २ रुपये ... !

    वाटेत बागेतल्या गणपतीचं देऊळ!  तितकं शांत देऊळ मी अजून पाहीलं नाही !  तिथे दर्शन घेऊन पुढे हरीपूरला पोहोचलो की नदीच्या पाण्यात जाऊनच पाय धुवायचे ! सगळ्याजणींनी घट्ट हात धरून साखळी करून पाण्यात चालायचं ... कोणीतरी पडायचंच ... पण तरीही !  मग देवळात ... इतकी प्रचंड गर्दी, की जायचं कसं ?  मग वेळ घालवायला पेरू घ्यायचा, १० पैशाला !   मग ती पेरूवाली आजीबाई रागवायची, "ए पोरींनो, गर्दीत जाऊ नकासा ,  कुठं हरवलात , चेंगरलात तर मायबापांच्या जीवाला घोर लागंल.  त्या थकडं हुबं ऱ्हावा आन करा नमस्कार - पोचंल देवाला ... !"  आम्ही पडत्या फळाची आज्ञा मानून पसार ! 

    मग खरी मजा सुरु !  आकाशपाळणा, चक्र !  चिक्की , आईसफ्रूट, मग चिंचा - बोरं - आवळे... असा फलाहार !  मग खेळणी, बहिणीला फुगा नाहीतर एखादं भिरभिरं, अन स्वतःला पाणफ़ुगा ... तो नेमका परतीच्या वाटेत निवडुंगावर पडणार ... मग घरी रिकाम्या हातानी !  कधी पिपाणी नाहीतर टिक टिक वाजणारं खेळणं (पिटपिटी ) आणलं की आई खूप रागवायची .." आली कटकट घरात ... आता डोकं उठवणार माझं ... ! "   चौकोनी काचेला चारी बाजूनी कागद चिकटवून केलेलं एक खेळणं .. त्यावर चित्रं  !  त्याला आम्ही 'जादू' म्हणायचो !  घरी येतांना पायात गोळे यायचे .   इतकं चालून, हुंदडून आल्यावर दुसरं काय ?  ... मग पुढच्या सोमवारची वाट पहात झोपून जायचं !....

  ....  अशीच जत्रा, जरा मोठेपणी कॉलेजमध्ये असतांना ! नवरात्रात देवीच्या देवळाजवळ ,   अमरावतीला !     देवीचं दर्शन गर्दीतही  जाऊन घ्यायचंच !  तिथेही आधी ठरवल्याप्रमाणे मैत्रिणी भेटायच्या !  मग निघायचं - रस्त्याच्या दोन्हीकडे छोटी छोटी दुकानं - stalls .  मग तिथे कानातली, वेणीला लावायची रबरबँडस, त्यांच्या किती तऱ्हा !  तेव्हा त्यांना 'love in Tokyo' काय,  'दो बदन'  काय,  काय वाट्टेल ती नावं असायची !  शिवाय कपड्यांना - साडीला matching अशी कानातली, बांगड्या, गोंडे ... आणि जाता जाता  आठवण ठेऊन, शेवटल्या दुकानातून साखर फुटाणे, लाह्या वगैरे .... आजीकरता !  

   ... पण कॉलेजात  interests जरा वेगळे असायचे . देवळात गेलं तरी , कोण आलं, कुणाशी बोललं, कुणाला भेटलं वगैरे.  कॉलेजमधली बरीच मुलं भक्तिभावाचा आव आणून दर्शनाच्या रांगेत उभी असायची, तेवढीच चार पावलं बरोबर ! फारच थोड्या जोड्यांची मजल सात पावलांपर्यंत गेली ! चौका चौकात मुलांची टोळकी उभी.  'देवीच्या' दर्शनाला आलोय , असं एकमेकांना मोठ्यांदा सांगत !  खरं म्हणजे नवरात्रच आहे , म्हंटल्यावर ह्यात सांगण्यासारखं काय'  हा मुलींचा गालातल्या गालात हसत, न विचारलेला प्रश्न ! तेव्हा नवरात्रात रोजचा वेगळा रंग वगैरे गोष्टी नव्हत्या, पण प्रत्येकाच्या 'देवीचा' रंग, तो त्या दिवशीचा त्याचा 'रंग' !

   ... आणि कालची जत्रा !  आता कोणी जत्रेला जात नाही, वेळच नसतो ... खरंच ... ! ना सणांना देवळात जायची सोय !   पण म्हणून ह्या गोष्टी सोडून थोड्याच द्यायच्या ?  काल असाच एक सण होता छानसा ! ७५ वर्ष झाली स्वातंत्र मिळवल्याला !  हा नक्कीच आधुनिक सण आहे आणि यथार्थही आहे !  आता आधुनिक तीर्थक्षेत्रं  पण आहेत.  विवेकानंद स्मारक,  अक्षरधाम,  statue of unity !    मला वाटतं ह्या बरोबरच जे ही काही भव्य दिव्य आहे, ते अगदी अणुभट्टी ( atomic reactor ), कोंकण रेल्वे, चिनाब वरचा पूल ही का नसावीत नवी तीर्थक्षेत्रं?

    असो,  तर हा कालचा सण !   इथे प्रत्येक  'housing society' मधे तो साजरा झाला !  झेंडावंदन गुढी उभारण्यासारखं !  मग सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, खेळ, गाणी ...!  आणि मग fun-fair, flea market ... !  "आजी, आपण फनफेअर ला जाऊया?  तिथे खूप मजा असते.  bouncing castle, छोटी ट्रेन, खेळणी ..  " मग आजी घुसली फन फेअर मध्ये नातवंडांबरोबर !    थोडा फरक होता.  चिंचा - आवळे - बोरांना जरा बगल देऊन, फ्रुटी वगैरे 'ज्यूस' !    भज्या - वड्यां ऐवजी  मोमोज, पास्ता, potato-twisters, french-fries, दोसा वगैरे ! चोकोबार !  आकाशपाळण्याऐवजी Noah's Ark, merry-go-round, Bouncing-castle  वगैरे.  बाकी  same!!  hair-bands अन clips !  आवाज करणारी खेळणी तशीच, दिसायला जरा वेगळी पण आवाज तेच.  मजा पण तेव्हाच्या जत्रेइतकीच !  सगळं वातावरण तेच ! ...नेहेमीचा  'तोच तो पणा'  घालवून काहीतरी वेगळं !   मनातला सगळा उत्साह, आनंद, उल्हास बाहेर येत...चेहेऱ्यांवर टवटवी आणत....बाळगोपाळांबरोबरच... प्रत्येकाच्या मनातलं मूल हसतं, खेळतं ! ....



Comments

  1. जुन्या आठवणी जाग्या केल्यास.अलका.छान आहे जत्रा

    ReplyDelete
  2. जादू तर मला पण आठवते.....कागदी घड्या

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland