ओळख
'आपली स्वतःची ओळख करून द्या,' असं जर कोणी आपल्याला म्हटलं , तर आपण काय बरं सांगू ? एक दिवस , असा एक विचार , अगदी सहज मनात आला. आपलं नाव ? आडनाव ? का कोणी अमक्याची तमकी?... .. काहीजण त्यांच्या नावापुढे डिग्र्या लावतात, पण ती त्यांच्या शिक्षणाची ओळख. त्या डिग्र्या अनेकांनी मिळवल्या असतील .आपलं असं वेगळं काय ? अर्थात, मी विशेष असं काहीच न केल्यामुळे 'मान्यवरांची ओळख' वगैरे प्रश्न येणार नाही, तरी पण आपलं आपल्याला एक विश्व असतंच, मग ते कितीही छोटं असे नां का ! त्या छोट्या विश्वात आपली काय ओळख ?... आणि , मोर नाचला म्हणून कावळ्याने नाचू नये, का राजहंस पोहतोय म्हणून बदकाने काठावरच बसून रहायचं ? मोठ्या लोकांसारखी आपल्यालाही आपली काहीतरी ओळख असलीच पाहिजे, आपण एक व्यक्ती म्हणून ...! ती काय असावी बरं ?
शाळेत आपल्याला एक नाव होतं, आडनाव होतं आणि एक टोपण नाव ही असणारच ! नंतर, म्हणजे लग्नानंतर त्यात एक भर पडली, एक नवीन आडनाव आलं. पहिलं आडनाव भलेही कागदपत्रांवरून नाहीसं झालं, पण मनात ते कोरलेलं होतंच आणि अजून आहेच की ! बहुतेक जणींचं तर नावही बदलतं. बाकी कोणत्याही प्रदेशात मुलींची नावं बदलत नाहीत - नसावेत, मग आपल्याकडेच कां ? आधीचं नाव इतकं वाईट असतं, नावडतं असतं, की ते बदलावंसं वाटतं ? मग , मुळात लग्नाला 'हो' कशाला म्हटलं ? शतकानुशतकं ही प्रथा आहे, पण ती प्रथा कोणालाच बदलावीशी नाही वाटली ? तेव्हाच्या समाज-सुधारकांना सुध्दा हे चाललं, त्यात काहीच गैर वाटलं नाही ? अर्थात ,आता हे सगळं बदलतंय. आता काहीजणी आडनावांचं double engine लावतात. मग त्यांच्या मुलींनी त्यांच्या लग्नानंतर ३-३, ४-४ आडनावं लावायची ? हे तरी कितपत बरोबर आहे ? पटत नाही का वळत नाही?
सुदैवाने माझं नाव बदललं नाही, त्यामुळे अर्धी identity शाबूत आहे. नाव ही असं की मैत्रिणींनी शाळेत त्यात काट-छाट करून ते बदललं नाही. घरी सगळ्या भावंडांत मी top2 मधे, त्यामुळे नावापुढे 'ताई' लागायचं, त्याचीच सवय झाली ! लग्नानंतर वहिनी, काकू, मामी वगैरे additions झाल्या. आत्या, मावशी ही बिरुदंही मिळाली. पण , ती ओळख 'अमक्याची तमकी ' अशा प्रकारची !मुलं झाल्यावर, 'आई' हे नामाभिधान मिळालं, पण मुलांची अशी हाक ऐकू आली, की ती पुढे येऊ घातलेल्या गोंधळ-गडबड-संकटाची नांदीच वाटायची ( "आता काय झालं ?") ! त्यांची हाक अजिबात मंजुळ, वात्सल्याला हात घालणारी वगैरे वाटली नाही ! आणि ही ओळख ही 'अ...ची त...' च !
मधली वर्षं सरत होती आणि मग एक दिवस, एक छोटंसं पिल्लू अचानक 'आजी' म्हणायला शिकलं ! ते मात्र खूप आवडलं ! इतकं गोड की कानालाही चव कळायला हवी होती असं वाटलं ! आणि नावांत भर पडली ! ओळख वाढली ! पण काहीतरी 'missing' आहे , असं वाटत होतं ...
असं करता करता , किती काळ उलटला, हिशोबच राहिला नाही. शाळा-कॉलेज, मित्र-मैत्रिणी मागच्या कोणत्यातरी जन्मातल्या गोष्टी असाव्यात असं वाटत होतं. काहीतरी सुटलं, मागे राहिलं, ही भावना नुसती रुजली नव्हती, तर चांगली घट्ट बसली होती. त्या मागच्या जन्मातल्या लोकांची नावं, चेहेरे सगळं हळूहळू धूसर होत होतं, स्वतःचं तिथे असणंही धुक्यातून चालल्यासारखं वाटत होतं... ... आणि अचानक ५० वर्षांच्या reunion चे वारे वाहू लागले. सगळ्यांनी कुठून कुठून नावं, पत्ते, फोन नंबर शोधले. जगातली सगळी माणसं एकमेकांपासून average 7 कड्या लांब असतात म्हणे, इथे तर २ - ३ कड्यांत सगळे सापडले. हळू हळू फोनवर बोलू लागले, पण जरा बेताबेतानेच ! कोण काय म्हणेल, कोणाला कसली शंका येईल, वगैरे त्या जुन्या जगाचे नियम, भित्या , अजून मनात ठेवून ! प्रत्येक शब्द तोलून- मापून, चुकीचा अर्थ निघायला नको म्हणून जपून - जपून ... टोपण नावं न वापरता, पूर्ण नावाने सभ्यपणे संबोधून ! तरीही मधूनच डोकावणारं लहानपण...! ...पण काही केल्या हवा तसा मोकळेपणा वाटत नव्हता...हे सगळे आपली ती ,तेव्हाची ओळख विसरलेत का ?
.….आणि तिचा फोन आला ! "हॅलो, मी ×× बोलत्येय ... अगं, तुझा DP पाहीला, ग्रुपवर ... आणि म्हटलं, ही आपली अलकीच, आता हिच्याशी बोललंच पाहिजे ... "...
... पुढचं मला काहीच ऐकू येत नव्हतं की काही कळतंच नव्हतं ! एक अनामिक आनंद !! ... ....५० वर्षांनी , माझं शाळेतलं नांव मी पुन्हा ऐकलं, जे शाळा सोडल्यापासून कोणीच वापरलं नव्हतं ... आणि मी कधीच ऐकलं नव्हतं .....!
...आता माझी ओळख पूर्ण झालीये ...माझ्यासाठी !
मस्त, छानच लिहलय की
ReplyDelete