नवरात्र - घटस्थापना
नवरात्र - देवीचा उत्सव ! नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांचा उत्सव ! पूजा, नैवेद्य, प्रसाद, नटणे, हळदीकुंकवं ! दिवाळीच्या खालोखाल महत्वाचा सण ! पण देवी म्हटलं , की कडकपणा, थोडी शिस्त , सर्व नीट झालंच पाहिजे, असा दंडक ! बाकी सणांना थोडं इकडे तिकडे चालतं . हा सण मुख्यपणे घरातला, पण छोटेखानी म्हणू शकत नाही. कारण हा फार महत्वाचा ! आपलं अस्तित्वच एका प्रकारे ह्यावर अवलंबून ! ...
असं म्हणतात, की जे ज्ञान आपण मिळवतो, शिकतो, त्यातला १/४ भाग आपण गुरुजनांकडून शिकतो, १/४ सहपाठी, मित्र, बरोबरीचे ह्यांच्याबरोबर चर्चा वगैरे करून मिळवतो, १/४ आपला आपला विचार करून मिळवतो आणि उरलेला १/४ समजायला, उमगायला मात्र काही काळच जावा लागतो ! नवरात्राबद्दल मला फक्त दृष्य स्वरूपच माहीत होतं. मग एकदा आजी आजोबांनी त्यांच्या लहानपणच्या गोष्टी सांगितल्या तेव्हा थोडं कळलं, आणि आता एवढा काळ गेल्यावर, विचार केल्यावर खरं स्वरूप कळलं !
घटस्थापना ! घट बसले म्हणजे काय ? ते का करायचं ? त्याचं प्रयोजन काय ?
मी आजीला हे सर्व करतांना पाहिलं होतं. खूप लहानपणी आजीजवळ राहिल्यामुळे ! गणपती झाले की काही दिवसांनी आजीची नवरात्राची तयारी सुरु व्हायची. एक दिवस कोणीतरी कुंभारवाड्यातून मातीची मोठी परळं ( गोल बुडाची परात ) आणि घट (गडू)घेऊन यायचं , आणि बुरुडगल्लीतुन वेताच्या टोपल्या! न सांगता, न बोलता ! मग चांभार, लोहार, सुतार, कोण कोण यायचे. आजी आजोबांना नमस्कार करून बरोबर आणलेली पसा - दोन पसा माती बागेत ठेऊन जायचे. आजी त्या सर्वांना कधी पैसे कधी धान्य देऊनच पाठवायची. मग एक दिवस कामवाली दुपारच्याला यायची आणि ती सगळी माती एकत्र करून मळून ठेवायची. त्या आधी आजी त्यात काय काय घालायची. आधी नमस्कार, मग हळद, कुंकू, बुक्का, गंध, थोडं पीठ, पिठी, बेसन, मोहोरी मेथ्यांच पाणी, तेल तूप, चुना आणि काय काय. शेवटी एका डबीतून केशर आणि मग कस्तुरी ! ? कामवाली बाई ते सगळं एकत्र कालवून ठेवायची. मग त्या परळांना आतून व्यवस्थित लिंपून ,कोरडं करून ठेवलेलं असायचं . तसंच वेताच्या टोपल्यांना पण ! घटस्थापनेच्या आदल्या दिवशी हे सर्व त्या मातीने भरून ठेवायचे.
घटस्थापनेला देवीची साग्रसंगीत पूजा ! मग त्या परळांत आजी गहू, जोंधळा,एकात हरभरा, कुठे मोहोरी, कुठे तेलबिया असं पेरायची. एकात मात्र सर्व थोडं थोडं ! ते पूजेतील मुख्य ! बाजूला निरांजन उदबत्ती, एक मोठ्ठी समई लावलेली, फुलंच फुलं ! अगदी प्रसन्न वातावरण ! ते झालं की मग आजी घट घेऊन यायची. तिने ते गेरूने रंगवून घेतलेले असायचे. त्यावर चुनखडी आणि पिठीने नक्षी काढलेली ! मग पाण्याने भरून, त्यात पैसा, सुपारी, गंध, फुल ! ते घट बिया पेरलेल्या प्रत्येक परळाच्या, टोपलीच्या मध्य भागी बसवायचे ! त्यांची हळद कुंकू, फुलं वाहून पूजा ! आणि शेवटी फुलांची माळ ! हे सर्व झालं म्हणजेच 'घट यथासांग बसले' ! घटस्थापना ती अशी ! हे सर्व झालं की आजी हुश्श करायची. मग नेहेमीचं, स्वैपाक, पक्वान्नं. रोज हळद, कुंकू, फुलांची माळ आणि घटांत झिरपून कमी झालेलं पाणी भरून ठेवायचं, की झालं ! शिवाय समई अखंड तेवत असायची !
नंतर केव्हातरी मी आईला विचारलं की हे सगळं exactly काय होतं ? घट बसले म्हणजे काय ? कशाकरता ? आपण आपल्याघरी कसं काय नाही केलं ? आणि मुख्य म्हणजे ह्याचा significance काय ?
आईने जे सांगितलं ते ऐकून मी अक्षरशः अचंबित ! आई म्हणाली, " अगं , आजोबा खांडव्याचे जहागीरदार ! तिथे अमाप शेती ! आणि हे नवरात्र त्या शेतीप्रधान आयुष्याला जोडलेलं आहे ! पूर्वी गावात बलुतेदार पद्धत होती ! गावातली कामं - व्यवस्था पहाणारे हे लोक. त्या काळी पगार असे नसायचे. मग त्या सगळ्यांना चरितार्थ चालवायला गावातले लोक मदत करायचे ! आणि नवरात्रात इतर सणांप्रमाणेच - त्यांचा मोठा सहभाग ! नवरात्रात ते आपापल्या घरची पसाभर माती आणून द्यायचे. एरवीही त्यांच्या expertize प्रमाणे घरात , शेतात कामं करायचे. पण ही माती महत्वाची, की काहीही काम नसलं, घरात देण्यासारखं नसलं तरी यायचं आणि थोडी माती आणायची. रिकाम्या हाताने येऊ नये म्हणून. सगळ्यांचं inclusion सणात ! पण ते फक्त एकच कारण नव्हतं. प्रत्येक घरात वेगळं रहाणीमान, वेगळं अन्न, त्यामुळे तिथल्या मातीत वेगवेगळ्या गोष्टी पडणार - असणार ! सर्व ठिकाणची माती आणून, mix करून त्यात धान्य पेरायचं ! कोणत्या धान्याला - बीजाला काय लागू पडेल माहीत नाही ! पण सर्व घटक - तत्व मिळून त्या बिया छान तरारून यायच्या ! आणि त्या बियांना पाणी मिळावं म्हणून ते घट ! जीवन देणारे, म्हणून त्यांचं महत्व ! त्यात रोज पाणी कमी झालं की आजी वरून घालायची ! "आणि तो अखंड दिवा ?" मी विचारलं. "अगं बया, तू शिकतेस नं ! बियांना रुजायला उब लागते ! तिथे समई लावून ठेवली की त्यांना पुरेसं उबदार वातावरण . ते temp बदलू नये म्हणून तो अखंड दिवा !" "Oh ho, so much science !" "मग science चा ठेका फक्त तुम्ही घेतलाय का ?" "तसं नाही, पण कधी लक्षांत नाही आलं !" "आणि मग नवरात्रानंतर ते सगळं निर्माल्य ?" "बाई माझे, देवापुढचं सगळं निर्माल्य नसतं ! तुला आठवतं का, दसऱ्याला किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी शेतावरची माणसं यायची, आणि ती सगळी परळं, वेताच्या टोपल्या घेऊन जायची. ती नेऊन, वेगळी करून, थोडी वाढवून, मग रब्बीच्या पेरणीला ती रोपटी लावून सुरुवात !" "ए, इथे खरीप, रब्बी नको. " माझा protest ! " का नको ? भूगोल फक्त अभ्यास नाहीये, ते शेतकऱ्याचं आयुष्य आहे. खांडव्याहून आजोबा शिकायला नागपूरला आले, नंतर प्रोफेसर झाले, पण ते करत राहिले. बंगल्याच्या भोवतीच्या प्रशस्त जागेत बगीचा केला, फळबाग केली, सगळं केलं. पण नवरात्र लहान प्रमाणात व्हायला लागलं. हळू हळू त्याचा significance गेला, कारण लोकं शहरात येतात, मागचं सुटतं, पण आठवण येते. मग घरात छोट्याश्या परळांत नाहीतर ताम्हनात लावतात, चांदीचे - तांब्याचे लोटे ठेवतात , विजेची समई लावून ठेवतात. हे सगळं फक्त symbolic राहिलं आता. " "मग देवीची पूजा वगैरे ?" "त्यालाही कारण आहे. आपल्यात कोणत्याही गोष्टीला देवाचं, पूजेचं अधिष्ठान दिलं की मगच ते पाळलं जातं. म्हणून त्याच्या आधी देवीची पूजा करून, तिचा आशीर्वाद घेऊन, मगच पेरणीची सुरुवात ! देवी ही सगळ्या प्राणिमात्रांची आई समजली जाते नां ! आणि बिया पेरल्या की एका दिवसात उगवत नाहीत, त्याला थोडा वेळ हवा म्हणून ९ दिवस उत्सव ! तोपर्यंत त्या बिया रुजतातच ! तो पर्यंत तिच्या सर्व रुपांचा विचार !"...
"पण मग आपण कसं नाही केलं ? तू का नाही केलं, का नाही सांगितलं ? " आई म्हणाली, " बाबांच्या नोकरीमुळे आपण देशभर फिरलो. भाड्याच्या घरात कुठे बाग करणार? झाडं लावणार, का पीक घेणार ? आणि त्या नवीन रोपांचं काय करणार ?.....आणि सर्वात मुख्य कारण म्हणजे .........माझ्यासाठी घटस्थापनेला उगवलेली ही नवीन रोपं कधी ' निर्माल्य 'होऊ शकत नाहीत ! " ......
Comments
Post a Comment