आठवणीतला श्रावण
श्रावण महीना म्हटलं की, 'ऋतु हिरवा, ऋतु बरवा' ! पण मला श्रावण महीना नेहमी रंगीबेरंगीच दिसतो ... फक्त हिरवाच नाही, तर खूप साऱ्या रंगांनी नटलेला, सजलेला ... ! पाऊस-पाण्याने सगळं जग हिरवंगार आणि त्यात रंगांचे ठिपके दिल्यासारखी फुलं ... ! आणि जवळजवळ रोजच कोणता ना कोणतातरी स्पेशल दिवस ! श्रावण म्हंटलं , की माझं time-machine सुरु ! मी पोहोचते माझ्या गावात ...
श्रावणी सोमवार , की हरीपूरची जत्रा ! तेव्हा होती तितकीच आत्ताही माझ्या मनात ताजीतवानी. ... आणि बरंच काही... ! मंगळवार म्हटलं की, मी पोहोचते कोणा ना कोणाच्या मंगळागौरीला . बुधवार-गुरुवार जरा शांत , की लगेच शुक्रवार ..... की निघाले मी माहेरवाशीणींबरोबर ! गूळ -फुटाणे आणि दूध ! तशीच नागपंचमी ! नागपंचमीची एक आठवण म्हणजे, मी तेव्हा तिसरीत होते. नुकतीच मराठी शाळेत दाखल झालेले. बाईंनी सांगितलं की, उद्या नागपंचंमीवर निबंध लिहून आणायचा ... दहा वाक्य हवीत . पहीला प्रश्न , निबंध म्हणजे काय ? दुसरा ... नागपंचमी म्हणजे काय ? घरी आल्यावर मावशीने सांगायला सुरुवात केली, " लिही, नागपंचमी म्हणजे नागाची पूजा करण्याचा दिवस "..... करत करत गाडी पुरणाच्या दिंडांपर्यंत आली. 'नको बाई, आम्हाला नाही आवडत ... नुसतं पुरण खातो ... ' असं करत निबंध तर पूर्ण झाला . पानभर काय, दुसऱ्या पानावर ओसंडून वहात गेला ... पण नाग पंचमीची मजा यायची , ती जरा मोठेपणी. शाळेला नागपंचमीची सुट्टी मिळाली की रात्री मेंदी लावायचा कार्यक्रम. शेजारच्या दोन तीन मैत्रीणीना गोळा करायचं आणि मेंदीची पूड आणून, त्यात काथ, लिंबू घालून, ती भिजवायची आणि आगपेटीच्या काडीने एकमेकींच्या हातावर डिझाईन काढायचं ! झाडाची पानं वाटून केलेल्या मेंदीने डिझाईन नाही काढता यायचं आणि मेंदीच्या कोनांचा शोध लागायचा होता . त्या डिझाईन काढण्यात बराच वेळ जायचा. मग ते हात वाळवत बसायचं !... "आई, पाणी देतेस का ? ... आई, नाकाला इथे खाजतंय ... आई, हाताला रग लागली ... " थोडा वेळ आई सगळं करायची, मग फर्मान सुटायचं ... "आता पुरे ... आता झोपा ... " मग हाताला जुना टॉवेल, फडकं गुंडाळून झोपायचं ... "चादरीचं कल्याण होणार आहे ह्यांच्या मेंदीपायी ..." एवढं सगळं करून, केवळ मेंदी कालवून देतांना आईच्या हाताला जी मेंदी लागली असेल ती, आणि तिच्या तळहातावरचा ठिपका इतका सुंदर रंगायचा, आणि आमचे हात ... जेमतेम रंगलेले ... पुन्हा कद्धी कद्धी मेंदी लावणार नाही, असं म्हणत मी ते भांडं नेऊन बागेतल्या टाक्यांत बुडवायची, इति नागपंचमी ... मग दिंड खा, नाहीतर न खा ... !
पण शेजारी-पाजारी-नव्हे , पूर्ण आसमंतात कोणाची मंगळागौर म्हटलं की आम्हा बहिणींना मात्र उत्साहाचं उधाण यायचं ! त्या वशेळ्यांपेक्षाही जास्त !आधल्या दिवशीच आम्ही तिथे हजर, पत्री तोडायला ! फुलांना नको हात लावायला, उगीच मुक्या कळ्या चुकून तुटल्या तर बोलणी. त्यापेक्षा पत्री हवी तितकी तोडा, घरीही कोणी रागवणार नाही आणि झाडं.. तर मुळीच नाही ! पूजेच्या वेळी वगैरे विशेष interest नसायचा, कारण शाळा. पण संध्याकाळी घरी आल्यावर आई बरोबर हळदीकुंकवाला जे जायचं , ते जागरण करून पहाटेच घरी परत ! हळदकुंकू वगैरे मोठ्या बायका बघणार, आपण आपलं मैत्रीणींबरोबर खेळांचं planning ... "ए, हा उखाणा घालायचा गं ताईला , आणि असं बघ ... ह्या वहिनीला कोणी गोलाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही हं ... " .. "बरं, गोफ विणू येतं का तुला ... आपण खेळू ... झिम्मा, फुगड्या, खुर्ची का मिर्ची, खण खण कुदळी, मण मण माती ... सडू बाई सडू, आगोटा पागोटा ... साळुंकी साळकी ... पाणलोट ... किती किती खेळ ! Actual खेळ खेळतांना येणारी मजा तर वर्णनातीत ! " सासू मारीते" ..." बरं करीते " ...म्हंटलं , की खुदु खुदु हसणं ...मस्तीच मस्ती ... उखाण्यांची मजा ... मुक्तपणे दंगा ! कारण ... मुलांना मज्जाव ! त्यांना तडीपार केलेलं ... त्या संध्याकाळपुरतं...! स्त्री राज्य !
मध्यरात्रीनंतर, मुली बायका जरा पेंगुळल्या, डुलक्या घ्यायला लागल्या , की अजून मजा ! झोपलेल्या कुणाचा पाय पलंगाला बांधून ठेव, कुणा दोघींच्या वेण्या बांधून ठेव , कुणाला हळूच काजळाने मिश्या काढ...असे उद्योग !! कुणाला कधी माझा संशय नाही यायचा .. 'खूप शांत आहे '..असं सगळ्यांचं मत . हे करतांना मलाही एकदा प्रसाद मिळाला होता ... माझ्या वेणीला कोणीतरी लाटणं बांधून ठेवलं ... ! उठल्यावर चांगलं पाठीत बसलं ... अर्थात मी खूप रडारड केलीच ... आता हसू येतं ! ...
श्रावणाच्या मध्यावर राखी पौर्णिमा. पण मला त्याचं विशेष कौतुक नसायचं. सख्खा भाऊ नसल्यामुळे राखी बांधण्याचा सोहळा असा काहीच नसायचा. आई धाकट्या बहिणीला बांधून द्यायची, पण मी नाही कधी बांधून घेतली ... नाही ना बांधायची मुलींनी ... तर मग नकोच ... काही अडलं नाहीये ... मी दोन चार खेळगडी मित्रांना विचारलं , " तुला बांधू का राखी ?" की , "हॅ , तुझ्याकडून कोण बांधून घेणार ?.. तू फार धडपडत असतेस, तुझं रक्षण करणं, म्हणजे सतत काम ... वर , तुला ओवाळणी ... तू जा " ... "तू पण जा उडत ... मी आपलं आपलं रक्षण करीन ... " ... म्हणजे काय कुणास ठाऊक ... !
श्रावण सरता सरता येणारी गोकुळाष्टमी मात्र खूप आवडायची ! एका गोकुळाष्टमीला मी मावशी आणि मावस भावंडांबरोबर त्यांच्या मूळ गावी शेंदुर्णीला गेले होते. तिथे मावशीच्या सासूबाई एका मोठ्या रांजणात, एक प्रचंड रवी घालून यशोदा माईसारख्या दही घुसळत होत्या. भिंतीतल्या कड्यांमध्ये बांधलेले दोन्हीकडचे दोर हातात घेऊन, एक ओढत, एक सोडत ! आम्ही अक्षरशः mesmerise होऊन ते बघत बसलो होतो ... कंटाळा येतच नव्हता, त्याचा rhythmic आवाज, आणि त्यातलं लालित्य पहात ... ! लोणी कधी आलं, कळलंच नाही . त्यातलं लोणी हातात घेऊन आजी म्हणाल्या, "या रे , माझ्या बाळगोपाळांनो " आणि प्रत्येकाच्या तोंडात लोण्याचा एक एक गोळा !! त्या लोण्याची चव आणि त्यातला भाव अजून मनात कोरलेला आहे ...
... जेव्हापासून माझ्या घरी माझ्या हातात हे काम आलं, तेव्हापासून मी ही तेच करते ... लोणी आलं की आधी एक एक गोळा डायरेक्ट मुलांच्या तोंडात ... कधी कधी त्यांच्या बाबाला ...आणि , सुना आल्यापासून त्यांनाही ! आता नातवंडं यायच्या दिवशी मुद्दाम साय घुसळायची ठेवते ... त्यांच्या चिमुकल्या तोंडांत लोण्याचा गोळा घालतांना सर्व मिळाल्याचा आनंद होतो ... कृष्णाच्या तोंडात यशोदेला सगळं विश्व दिसलं ... मला दिसतो , तो फक्त आनंद आणि निखळ आनंदच...
.....सुख सुख म्हणजे आणखीन काय असतं ... !
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
श्रावण महिन्यातील सप्तरंगी इंद्रधनुष्य जणू विविध भावनांच्या स्वरूपात तू लेखणीतून साकारले आहेस . त्याला जीवन रुपी विशाल आसमंताची (बालपण ते ज्येष्ठ पण) व्याप्ती लाभली आहे हे महत्त्वाचं
ReplyDeleteए कितीमस्त लिहिलयस गं?खूपच छान.अगदी लहानपणच भांडण ही राखीच्यावेळच.खरच सुंदरते बालपण आठवल.पण हरीपूरच जत्रेतल वर्णन नाहीये.
Deleteधन्यवाद , चंदू !
Deleteधन्यवाद , शांता !😊
DeleteNostalgia is your strong point. It shows in your every chane and kurmure. I wish you should publish all of this either in NEWS PAPER or independent BOOK. Bravo and buck up.
ReplyDeleteThanks a lot , Yashodhar !! I am not sure , people will buy the book and read ... These are nemories of a small town girl , who is by no means famous or even well known person in her town ! Neverthe less , your positive response gives me lot of encouragement and will to write !!! I always look forward to your comment !!!😊
ReplyDelete