गणपती - २


    हा आपला बाप्पा !   ह्याचा जन्म माघ महिन्यातल्या चतुर्थीला झाला.   त्या दिवसाला गणेश-जयंती असं आपण म्हणतो.   पण त्याचा उत्सव मात्र भाद्रपद चतुर्थीला !   ह्याचं कारण काय असावं ?    त्याचीही एक आख्यायिका आहे, महाभारताशी  संबंधित .  कौरव-पांडवांच्या निधनानंतर महर्षी व्यासांना हे सर्व लिहून ठेवावंसं वाटलं.  पण त्या काळात लेखनिक कोण मिळणार, जो श्री व्यासांच्या प्रतिभेला न्याय देईल, त्यांच्या विचारांच्या वेगाला तितकीच उत्तम साथ देईल ?    म्हणून त्यांनी गणपतीला विचारलं.    आणि भाद्रपद चतुर्थीला लिखाण सुरु झालं !  ते एका तळ्याकाठच्या गुहेत लिहू लागले.   लिहितांना गणपतीच्या शरीराचं तापमान खूप वाढू लागलं ... म्हणून श्री व्यासांनी त्याला थंड ओल्या मातीचा लेप लावला.  दहा दिवसांनी लिखाण संपलं, आणि ते पहातात तो गणपतीच्या अंगावरच्या मातीचे लेप वाळून कडक कवच झाले होते. ते काढायला म्हणून त्यांनी गणपतीला तळ्यात  नेऊन ती माती काढली ... ही कथा आपण दहा दिवस गणपती उत्सव करून relive करतो, आणि म्हणून तळ्यात-विहिरीत विसर्जन ! पण , ही एक दंतकथा आहे , असं संशोधकांचं मत आहे . महाभारत लिहिलं गेलं इ. स .पू. ३०० च्या जवळपास . तेव्हा , गणपती ही देवता नव्हती . महाभारतात ही त्याचा कुठेही उल्लेख नाही . गणपती ने लेखनिकाचे काम केले , असा ही उल्लेख नाही . ही नंतर , कोणीतरी त्यात घातलेली गोष्ट असावी . काहीही असो , आपल्याला हा उत्सव अतिशय प्रिय आहे , हे निर्विवादच !!!! ....

     तर , गणपती उत्सव म्हटलं की उत्साहाला उधाण !    हे करू, ते करू, असंच सगळ्यांचं होत असतं !     बहुतेक सगळ्यांकडेच गणपती असायचा माझ्या लहानपणी, पण आमच्याकडे नसायचा.  कारण हे की वडिलांची बदली भारतात कुठेही होत असे.    दिल्लीला माझ्या लहानपणी तर गणपतीची मूर्ती मिळणं ही अतिशय 'मुश्किल' !    कारण तो तिथला सण नाही.   त्यामुळे कोणीतरी महाराष्ट्रात जाऊन ते आणायचे, अर्थातच आगगाडीचा दोन दिवसांचा प्रवास.  मूर्ती सुखरूप आणणेही जिकीरीचं.  दोन - तीन महिने आधी नाव नोंदवायचं, आणि जितक्या मूर्ती आणायला जमतील त्यात आपला नंबर लागला तर मिळणार.   शाडूची माती आणून मूर्ती करणं पण कठीण, कारण ती पण महाराष्ट्रातून-कोकणातूनच मागवायची, म्हणजे प्रश्नच.  ( खरंच तेव्हा amazon असतं तर ... )      म्हणून आमच्या घरी गणपती बसवतच नसत, पण मोदक वगैरे होत असत, घरच्या देवांना नैवेद्य ! 

    मी आईशी वाद घालायचे.    आपल्याकडे काहीच का नाही डेकोरेशन ?     कारण पुण्यात-सांगलीत सर्वांकडे गणपती आणि आरास !     मला त्यात लुडबुडही  करता यायची नाही, कारण तो त्यांचा गणपती ! ते ठरवणार तशी आरास !     मग आम्ही दोघी बहिणी रांगोळी काढण्यातच आमची आरास वगैरे सर्व हौस भागवून घ्यायचो !

    आपल्या आजोळी असो का मोठ्या घरी ... सणांच्या सर्व प्रथा त्याच.  आधल्या दिवशीच्या हरितालिकेच्या पूजेपासून सुरुवात !   तो मला मुलींचा सण वाटायचा.     राखी-भाऊबीज मुलांचे, मंगळागौर लग्न झालेल्या बायका-मुलींची.     मुलींचा असा सण म्हणजे नवरात्रांत एखाद-दुसरं बोलावणं , कुमारिका पूजन म्हणून, पण कमीच.  मुख्य सण म्हणजे हादगा-भोंडला-भुलाबाई, आणि ह्या हरितालिका.   पण हे सणापेक्षा व्रत जास्त !     त्याची लगबग आदल्या दिवशीच सुरु.     शेजारच्या मुली , मैत्रिणी-cum बहिणीच, त्या परड्या घेऊन यायच्या.  "आजी, पत्री तोडू आम्ही ?"   मग आजी मलाही छोटी परडी द्यायची.    पत्री तोडण्याच्या निमित्ताने, दुपार-संध्याकाळ बागेत धुडगूस मुलींचा ... हसणं - खिदळणं, एकमेकींची पत्री पहाणं, तुझं-माझं करणं, कुणाची पत्री सांडली की चिडवणं-हसणं, तर कधी कधी हमरी-तुमरी वर  येऊन एकमेकींच्या वेण्या ओढणं, केस (झिंज्या?)ओढणं - almost मारामारीच - पण सभ्यपणे.    

    दुसऱ्या दिवशी सकाळी चौरंग मांडून, हरितालिकेच्या सखी-पार्वतीच्या छोट्या मूर्ती आणून पूजा आणि पूर्ण दिवस उपास !  सकाळी उठल्यापासूनच, कसा कोण जाणे - पोटात मोठा खड्डा पडल्याचं feeling असायचं ... उपास म्हणून !     दूध-लाह्या, केळं, शिंगाड्याच्या पिठाचा लाडू, उपासाचं थालीपीठ, जेवायच्या वेळी साबुदाण्याची खिचडी ,  दाण्याची आमटी, रताळ्याचे काप, खमंग काकडी, आणि श्रीखंड वगैरे खाऊनही तो खड्डा आपला तिथेच !   परकर-पोलकं घालून नटून-थटून, पूजा झाल्यावर आपण फारच special आहोत, आज आपला दिवस आहे असं वाटायचं !     एकदा नववी-दहावीत असतांना कोणीतरी विचारलं, "मग काय, कसा नवरा मागितला ?" ... म्हटल्यावर कळलं की  'अरे, हे तर आपण त्या न पाहिलेल्या कोणासाठी तरी करतोय ..?.... का? ... तो कोण लागून गेला मोठा एवढा ? ... छे ... ह्यात काही तथ्य नाही ... पण OK, मजा येतेय ना ?   रात्री जागरण , खेळ !... झोपायच्या आधी, निखाऱ्यांवर भाजलेली रताळी ... तरी सकाळी उठल्यावर अगदी weak वाटत असायचं.... कशीबशी अंघोळ  आणि उत्तरपूजा उरकून, मऊ भात खाल्ला की मगच तो पोटातला खड्डा नाहीसा व्हायचा !     काही मैत्रिणी तर कडक उपास करायच्या, त्यांचं काय होत असेल ?

     सांगलीत रहायला आल्यावर वेगळी मजा.   गणपती आणायला शेजारची पुरुष मंडळी निघायची, त्यात लहान मुलं उड्या मारत पुढे !  गणपती घेऊन येतांनाही ती पुढेच, पण मधूनच उलटं उलटं चालत ... गणपतीकडे बघत ... झाकलेला असला तरी, इकडून दिसतोय का तिकडून दिसतोय का ... !     मग दारात पायांवर पाणी घालून, ओवाळून वगैरे आत येणार आणि गणपतीची बाप्पाची स्वारी सुंदर मखरात विराजमान होणार !   अजूनही कुणी कुणाला "आईये, विराजिये " असं म्हटलं की मला गणपतीचं मखरच आठवतं !

    मग वडिलांच्या मित्राकडे म्हणजे जोशीकाकांकडे आमची हजेरी.   पूजेलाच नाही तर दिवसभर !   विश्रामबागला त्यांच्या घरी !    काका सोवळं नेसून पूजा करायचे, साग्रसंगीत. पूजा झाली की  पंचखाद्य !     तिकडे आई आणि काकू मोदक करायला लागलेल्या असत !   जेवतांना  मोदकाची पारी खायचं जीवावर यायचं, पण 'सारं काही सारणास्तव '  ... खाल्लं जायचं !     तेव्हा दुसरे काय पदार्थ असायचे ते काहीही आठवत नाही !    पण भाजी, कोशिंबीर आणि दहीभात, हे   compulsory असणार ... परीक्षेत पेपरात compulsory question असतो तसं !

    माझ्या एक मावशी म्हणायच्या, "अगं, लहानपणी आपण फक्त सारण खातो नी पारी आईला देतो.   मग एका वयात मोदकाची पारी आणि सारण दोन्ही खातो, आणि नंतर मग आपण आपल्या मोदकातलं सारण मुलांना देऊन त्यांच्या आणि आपल्याही मोदकांची फक्त पारीच खातो ... !"   आता ते आठवलं की वाटतं, आपण आपल्या आई-वडिलांना किती पिडत असू  ... 

    दुपारी दमून-भागून, मोदक खाऊन मोठ्या मंडळींची निजानीज झाली, की आम्ही मुलं पुन्हा बाप्पाजवळ !     ही  माळ खाली नाही ना येतेय, इथं फुलं लावूया का अजून ? ... हे बघ, इथे जागा दिसतेय, एखादा गोंडा चिकटवू या का ... ती आरास कधी पूर्ण झालीये असं वाटायचंच नाही.     बाप्पासाठी काय करू अन काय नको असं व्हायचं ... ! 

     लग्नानंतर , सासरी गेल्यावर, आपण हे सर्व करू असं वाटलं .  पण तिथेही गणपती बसवत नसत, कारण त्यांच्याही अशाच भारतभर बदल्या व्हायच्या आणि ते ही बरीच वर्ष दिल्लीत.    त्यामुळे माझी ती हौस राहिलीच !   पण मद्रासच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणपतीची पूजा मात्र आम्हा दोघांना करायला मिळाली !  तिथे दरवर्षी नवदांपत्याने गणेशोत्सवात गणपतीच्या प्रतिष्ठापनेची पूजा करायची, अशी प्रथा होती, त्यामुळे आमचे लग्न झाल्यावर,  आमचा नंबर लावून ठेवला होता !   ती पूजा अगदी साग्रसंगीत करायला मिळाली ! अगदी शालू-बिलू नेसून ... ! ...

    मला खूप आठवतात त्या आजोळच्या , गणपती पाठोपाठ येणाऱ्या गौरी . मी शाळेत जायला लागायच्या पूर्वीच्या !   आमच्या गौरी खड्यांच्या !   पाणवठ्याच्या जागी जाऊन तिथून ५ - ७ खडे आणायचे, न बोलता.    मी आईच्या मागेमागे !    तिथे खडे शोधायला मधेमधे.    आईनी सांगितलं "बोलायचं नाहीये ... अगदी गप्प बसायचं ... "     मला त्याचीही गंमत वाटत होती !     ते खडे ताम्हनात घेऊन,  घरात येतांना "मागे वळून पहायचं नाही हं.   गौरीला आवडत नाही."   म्हटल्यावर तर मला अजूनच प्रश्न, "का ?" ... मग मनात विचार, की खरंच  गौरी येत असतील का आपल्या मागून ?      मग मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून हळूच आजूबाजूला पहायची, ऐकायची ... !    पण आईच्या बोलण्यावर अविश्वास दाखवून कधीच मी मागे वळून पाहीलं नाही ... सरळ पुढे बघत चालत राहिले ... अगदी आयुष्यभर ... आता कधी कधी खंत वाटते पण ... ! 

    मग गौरींना सगळं घर दाखवायचं ... इथे काय आहे ? ... सुख, समाधान, शांती आहे, आनंद, उत्साह आहे, आरोग्य आहे ... positive thinking ... जे तेव्हाच मनात पक्क बिंबवलं गेलं ! ... 

    माझ्या काही मैत्रिणींकडे उभ्या गौरी असायच्या !    किती सुंदर दिसतात त्या !    छान छान नवीन काठापदराच्या साड्या, दागिने, फुलं लेऊन बसायचं !   कोण शान त्यांची !   समोर इतका सगळा फराळाचा फुलोरा, आजूबाजूला फुलझाडं, जरीच्या कापडांचे पडदे सोडलेले,  तरतऱ्हेच्या  रांगोळ्या, खाली गालीचे, रंगीत पाट !    कौतुक करावं तेव्हढं थोडंच !     गौरींच्या जेवणाचा ही केवढा घाट !   किती पदार्थ ... किती पक्वान्नं ... एक एक घास खाल्ला तरी पोट भरूनच जायचं ...!     त्यापेक्षा गौरींना म्हणावं, "जरा आल्यासारख्या रहा, आणि मग रोज छान छान पदार्थ करू, म्हणजे enjoy करता येईल ... त्यांना पण ...!"   असं वाटायचं !

    त्या गौरी का  लक्ष्मी ?   असा प्रश्न कधी पडला नाही.   ज्यांना जे वाटेल ते त्यांनी म्हणावं, समजावं ... प्रत्येकाचं मत जसं असेल तसं !    कोणतंही नांव दिलं तरी, त्यांच्याबद्दलचा उत्साह, प्रेम, आदर, काहीही बदलणार नाही असं !     कधी कधी वाटायचं की आपल्या खड्यांच्या गौरींना असं नटवता, सजवता येत नाही, म्हणजे पुन्हा तेच.  फक्त काम आणि कामच.    No dressing up , किंवा आरास, सजणं , नटणं , नटवणं .... काहीच नाही ... ! 

    नंतर खूप वर्षांनी खड्याच्या गौरी  का असतील , ते कळलं ... कोकणात कायमची गरिबी, इतका नट्टा-पट्टा, साजशृंगार कुणाला परवडणार ? मिळेल ते, असेल त्यात भागवायचं, मनात श्रद्धा असली की पुरे ... मग गौरी खड्याच्या असोत का चेहरे आणि शरीर असलेल्या असोत !

    काही मैत्रिणींकडे पाहीलं तर तेरड्याच्या झाडाची गौर !    कुणाकडे फक्त मुखवटे, कुणाकडे लोटीवर हळद, कुंकू किंवा गंधाने नाक,डोळे, चेहेरा काढून ती गौर !!

    पुढे एक सुंदर पुस्तक वाचलं.   त्यातलं एक explanation खूपच आवडलं.   आपण देवाची भक्ती करतो, तेव्हा एकाग्र चित्त व्हायला डोळ्यांसमोर एखादी मूर्ती लागते.   मग तिचं ध्यान करणं सोपं होतं .   एकदा ध्यानाची सवय झाली, एकाग्रता आली, खरा भक्तीची अनुभूती जाणवली की  , ही  सगुण साकार मूर्ती नसली तरी चालतं  ... मग एखादा शाळीग्राम, किंवा तत्सम काही विवक्षित आकार नसलेली गोष्ट ही चालते ... तेव्हा खड्यातही गौर दिसू लागते ... आणि त्याच्याही पुढची पायरी म्हणजे एकाग्र व्हायला काहीही लागत नाही... नुसते डोळे मिटले की  ... निर्गुण, निराकार परमेश्वर ... आणि आपली त्याच्यावरची भक्ती, विश्वास आणि पूर्ण समर्पण ... !



-  सौ अलका कुंटे, बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. EKDAM BHANNAT LEKH LIHILA AHES....JAAM AWADALA.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland