यक्षप्रश्न
वेद व्यासांनी महाभारत लिहिलं आणि जग म्हणालं, जगात आहे ते सर्व ह्यात आहे, आणि ह्यात नाही ते कुठेच नाही ! आपण ते पदोपदी पहातो, अनुभवतो. महाभारताला ३,००० ते ५,००० किंवा जास्तच वर्ष झाली असतील. तरी आपल्या बोलण्यात त्याचे उल्लेख आहेत, जसे काही त्या वेळी आपण तिथे होतो, आणि नुकतंच तर झालं ते सर्व ... !
यक्षप्रश्न हा शब्द ! मी तर सतत वापरते ... खरं म्हणजे माझ्यापुढे प्रश्न - मग तो कोणताही असो - की मला तो यक्षप्रश्नच वाटतो. युधिष्ठिराला यक्षाने प्रश्न विचारले, आणि वर खरी-बरोबर उत्तरं दे असाही दम भरला. आजूबाजूला आपले चारी भाऊ निपचित पडलेले , कोणीही काहीही सांगितलं असतं. पण तो पडला युधिष्ठीर ... सारासार विचार आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने बरोबर उत्तरं दिली ... किंवा असं म्हणा की यक्षाला हवी ती उत्तरं दिली, आणि ह्या कठीण प्रसंगातून सहीसलामत सुखरूप बाहेर पडला. पण असं वाटतं की ते प्रश्न कठीण नव्हते ... त्यांची उत्तरं ही तीच .. नेहमीची घिसीपिटी ... ज्ञानामृत type होती ! पण मग आपण कठीण प्रश्नांना यक्षप्रश्न का म्हणतो ? 'यक्षाने विचारलेले प्रश्न' असाच हा समास सोडवायचा तर ....!
त्या उलट, आपण विक्रम-वेताळ ह्यांच्या संभाषणातले प्रश्न पाहीले , तर ते खरंच अवघड असतात ... खऱ्याखुऱ्या माणसांच्या जीवनात कधीतरी येणारे , पण येऊ शकतील असे ... त्यातही सर्वांच्या भावना, कर्तव्य, इच्छा, लालसा, स्वप्नं वगैरे गोष्टींची न सुटणारी गुंतागुंत ... एक वेळ सल्ला देणं सोपं आहे ... न्याय-निवाडा करणं, actual तिढे सोडवणं ... महाकर्मकठीण ! असं असेल तर , नं सोडवता येणाऱ्या प्रश्नांना कसले प्रश्न म्हणायचं ?..
जगाच्या उत्पत्ती पासून प्रश्नांची सुरुवात ... मी कोण, तू कोण, हे काय, ते काय ... मला ह्यात पडायचंच नाही ... प्रत्येकाच्या मकदुराप्रमाणे बुद्धी आणि इतर सर्व parameters प्रमाणे प्रत्येकाचे प्रश्न ... !
माझ्याही समोर अनेक प्रश्न होते ... त्यांच्या उत्तराचा जितका मोठा impact, तितका तो प्रश्न सोडवायला सोपा ... !! तसे प्रश्न मी अगदी लीलया सोडवले , पण रोजरोज, पदोपदी येणाऱ्या साध्या साध्या प्रश्नांचं काय ? एखादं प्रश्नोपनिषद असायला हवं होतं , आणि त्यावर उत्तरं असणारं एखादं गाईड... असेल ही ... आपल्याला काय माहीत ? .. उत्तरं सापडली की पुरे !
लहानपणी बरं होतं, विशेष काहीच प्रश्न नसायचे ... शाळेत, परीक्षेत कधी मधी बाईंनी प्रश्न विचारले तर काहीतरी ठोकायचं ... viva मधे उत्तरं चुकणारच ह्याची १०० % खात्री, त्यामुळे त्याची भीती नसेच ! जबाबदाऱ्या अंगावर पडल्यावर मात्र विचार करायला लागले, तरी काही प्रश्न नेहमीच अनुत्तरित. नं ते यक्षप्रश्न ... नं ते वेताळाचे प्रश्न ... पण डोक्याला मात्र भलताच त्रास ... !....
Cut to संसार ....!!!.... आज भाजी काय बरं करू ? अर्थात त्याला 'घरात असेल ती, मला हवी ती, कोणतीही, आणि यातली कोणतीच नको' असे options असायचे-असतात, पण option एक आणि दोन चं कधीच ऐक्य होत नाही. तिसरा option म्हणजे खरा option नसतोच, त्यामुळे उरता उरला चौथा, तो चालणारच नसतो ... युधिष्ठिराला हे असले प्रश्न नव्हते ... द्रौपदीला असतील, पण तिच्याकडे तिची थाळी होती ! हवं ते मागा, ... मिळेल ... ! आत्ताही आहेत म्हणा, आपल्याला तशा सोयी-थाळ्या ... निरनिराळ्या नावांच्या, पण त्या फ्री नाहीत !
अजून एक अधून मधून उद्भवणारा प्रश्न असतो ... लग्न-कार्याचं, समारंभाचं बोलावणं आलं की ... 'काय देऊ ? '... हा तो प्रश्न नाही . कारण , आजकाल कुणालाच काही नको असतं . ...तर, तो प्रश्न.... काय घालू ? .. कपाट उघडल्यावर एकही कपडा , साडी आवडत नाही ... कुणी जास्तच भारी, कुणी खूपच साधी, कोणी एक फारच bling bling , तर कोणी अगदीच background मधे नेऊन बसवणारा ड्रेस ... नवऱ्याला विचारलं तर तो म्हणतो,' नेस काहीही ... वगैरे वगैरे वगैरे .'.. आपण हुरळून जाऊन हवी ती साडी नेसावी ... की तो म्हणणार, " ही ? असं जायचं आपण ? ... मग बदलू का ? ... नको, असू दे ... मग आधीच सांगायचं नं ... तू कशाला विचारलंस ? ... हे संभाषण होऊ नये म्हणूनच विचारते नं ... ? असो ... लहानपणी बरं होतं ... आम्ही बहिणी एकमेकींना विचारायचो ... काय घालू कॉलेजात आज ... ( आईला विचारायचा प्रश्नच नव्हता ... तिची मतं आमच्या मतांहून १८० अंश अंतरावर ). पण सरळ उत्तर दिलं तर ती बहीण कसली ? काय घालू , ह्याला उत्तर ... ते बोगन चं झाड किंवा वल्कलं नाहीत आपल्याकडे ... नाहीतर.... तुला सापडेल ते ... कशालाही इस्त्री नाहीये ....माझा ड्रेस सोडून काहीही ... आणि हो, तुझा orange टॉप मी आज घालणार आहे ... त्याचा विचारही करू नकोस ... ! आणि त्यावरच आपला डोळा ... काय करावं ? आत्ताच भांडण उकरायचं का संध्याकाळी घरी आल्यावर ? त्या टॉप वर लॅब मधे काहीतरी सांडवेलच ती ... ! मग बघून घेता येईल ...!
मुलं लहान असतांना ती शाळेत जाऊ लागल्यावर तर प्रश्नच प्रश्न ... मी कोण ? एक अष्टभुजा, की अर्जुनासारखी सव्यसाची, का एक zombie का एक यंत्रमानव ... त्याचं उत्तर सकाळच्या पारी दर दहा मिनिटांनी बदलणार, एकापाठोपाठ एक वेगवेगळे अवतार ... ! स्वैपाक करू, का त्यांना तयार करू, का त्यांच्या होमवर्कची शेवटची ओळ त्यांच्यासारखं अक्षर काढून मीच पटपट लिहून टाकू, का त्यांचे डबे भरू, का नवरा गावात नसेल तर स्वतः तयार होऊन त्यांची जड दप्तरं आणि डबे-बाटल्या घेऊन, धाकट्याला उचलून, मोठ्याचा हात धरून , धावत धावत शाळा गाठू आणि घंटा वाजायच्या सुमुहूर्तावर त्यांना शाळेच्या फाटकाच्या आत ढकलून देऊ ? काय करू ? आणि नंतर मग शाळा सुटल्यावर मुलं दिसेपर्यंत चुटपुटत बसायचं ... मी त्यांना फार रागावते का , असा धाक आणि किती घाई करते मी ... कशाला इतका रोज आरडाओरडा ... थोडं पांच मिनिटं लवकर आटपणं इतकं कठीण आहे का मला ? वगैरे ... आणि एकदा का मुलं दिसली की पहिले पाढे पंचावन्न ... माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळतं ... मी यंत्रमानव नक्कीच नाही ... तो गुपचूप कामं करतो, त्याला भावभावना नसतात ... आणि 'आई' पेक्षा 'घाई' असली की असंच होतं. त्याला नवीन अवतार घ्यायला लागत नाही ! ...
अजून एक प्रश्न आठवला ! लहान असतांना आम्ही मोठ्या सुट्ट्यांची खूप वाट पहायचो. सुट्टी लागली की काय करायचे ह्याचे खूप plans असायचे. कोणती सुट्टी ह्यावरही बरंच अवलंबून असायचं. हे करू, ते करू, उन्हाळ्यात जुन्या वह्यांची कोरी पानं काढून त्याच्या वह्या करू, इथपासून ते दिवाळीत किल्ला, शिवाय मैत्रिणी, खेळणं गप्पा, जुने projects, पुस्तकं वाचणं, सुट्टीत काहीतरी नवीन शिकायचं, सुट्टी सत्कारणी लावायची वगैरे 'ध्येयवादी' स्वप्नं ही ! ती सगळी पहिल्या तीनचार दिवसांत उरकली, की मग आईच्या मागे ... 'काय करू ?' की तिचं उत्तर ठरलेलं ... करतेच आहेस की, डोकं खाते आहेस इतकं सकाळपासून ... ते सोडून काहीही कर ... की उरलासुरला उत्साह पाण्यात ! मुलं शाळेत असतांना, हा प्रश्न किती भयावह आहे, हे मला पुरतं समजलं ... पण आता मी शहाणी झाले आहे ... नातवंडांना सुट्टी लागली की ती येतील ... त्यांना craft वगैरे शिकवायला मी रोज मोबाईल वर शोधून ठेवते आहे ... मला खात्री आहे ... ते मला नाही विचारणार... 'काय करू ?' म्हणून, ते मोबाईल घेऊन पसार होतील ... मग.... मी काय करू ? ......
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
अलका नेहमीप्रमाणे झकास. प्रत्येक स्त्री रोजच अष्ट्भुजा देवीच्याच भूमिकेत असते मिहणून तर सारे प्रश्न चुटकीसरशी सोडवते !!
ReplyDeleteThank you , विनू !
ReplyDeleteKHOOP AWADALA. ATYANT PRAGALBHA LEKH. TU LIHIT RAHA MI WACHAT RAHATO.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद , यशोधर !! कोणी वाचत असेल , तर लिहायला मजा येते ! नक्की लिहीन !! 😊
ReplyDelete