बकेट लिस्ट

  

    प्रसादचा आजचा लेख वाचला.   राहून गेलेल्या गोष्टी - अर्थात बकेट लिस्ट - wish list .    आणि मग आपल्या काय काय गोष्टी करायच्या राहिल्या ते पाहूया म्हटलं, म्हणजे अजून काय करायचं  ते ओघानेच येईल ... 

    तशा आपल्या wish lists सतत वाढत जाणाऱ्या असतात .     तरुणपणी सगळ्या fancy गोष्टी, आपल्याला हव्या तशा घ्यायच्या वगैरे .    पण मला वाटतं त्या फक्त तात्पुरत्या किंवा क्षणिक आकर्षण अशाच !    ती वस्तू फक्त possession म्हणून - त्याचं विशेष अप्रूप किंवा किंमत अशी नसते.    हळूहळू मोठं होता होता, मग जास्त विचार सुरु होतात, आणि मग आपली स्वप्नं, आपली ध्येयं, अशा गोष्टी wish list मधे यायला लागतात.   त्या तिथे किती दिवस रहाणार, आपल्या बिन बुडाच्या बकेट मधून त्या कधी गळून जाणार ... आपले प्रयत्न आणि योग - नशीब अशी भोकं पडणार ... ते वेगळं ...  त्यांचा आणि बकेट लिस्टचा विशेष संबंध ही नसतो.   त्याही पुढे अजून maturity आल्यावर, जगाचा जास्त अनुभव घेतल्यावर, खरी wish list तयार होऊ लागते ... शक्य - अशक्यता वगैरे पाहून माणूस लिस्ट करायला शिकतो.   उरते मग फक्त ध्येय-स्वप्नांची लिस्ट ... ती खरी wish list ... 

    लहानपणी आणि नंतरही मी कधीच कशावरही विशेष focussed अशी नव्हते ... हे करावं का ? ... बरं, ते बघू ..... ते नको का ? ... बरं ... तसं ... असंच माझं होतं !    कारण ?    खूप कारणं ... आपल्याला हवं ते नेहमीच शक्य नसतं किंवा खरं म्हणजे अशक्यच असतं,  हाच माझा अनुभव होत गेला ... wish list कधीकधी बनायच्या आधीच गहाळ झाली  ... !    मग जे हाती आलं , तेच आपलं , अशी मनाची समजूत करून घेतली, आणि त्यातच आनंद मानला, सुख मानलं ... गहूभर पुढे आणि तिळभर मागे,  अशीच माझी गाडी चालू राहिली ... आता , राहून गेलेल्या गोष्टी परत कधीच करायला मिळणार नाहीयेत ही पक्की खात्री झालीय ! 

    नाही म्हणायला माझी एक सुप्त wish list होती, आणि त्यात दोनच गोष्टी होत्या ... २००१ पासून आम्ही आपल्या कारने पुण्याच्या trips करू लागलो.    २-४ ट्रिपा झाल्या नंतर एक wish हळूहळू मूळ धरायला लागली होती ... पुण्याहून बंगलोरला परततांना पेठ वडगाव किंवा इस्लामपूर पाशी आलो कि वळून सांगलीला जावं असं वाटायचं ... पण कशाला ?    कुणाला भेटायला, काय पहायला, तिथे जाऊन काय करायचं ... हे काहीच दिसायचं नाही ... जाता येता कोल्हापूरला किंवा बेळगावला overnight थांबलो की, ... so near ... yet so far ... अशी काहीतरी हुरहूर लागायची !    मी इतकी गावं फिरले, पण ही ओढ विलक्षण होती ... पेठ नाक्याशी आलो की इतकं रडू यायचं की मी म्हणायचे, "नको वळू, आपण सरळच पुढे जाऊ ... "     दर वेळचं ठरलेलं !    आपलं GT ठरलं, आणि आधी 'नाही-नाही' करणारी मी ... कधी तिथे पोचले  ते कळलंच नाही !   ... एक wish पूर्ण झाली !

    दुसरी wish होती की कोकणांत जायचं आणि तिथला समुद्र पहायचा ... मद्रास मधे राहूनही फक्त दोनदा गेले समुद्रावर ... पण ते म्हणजे फक्त एक tick mark होता ... इतकी गर्दी की त्यापेक्षा रेल्वेचा प्लॅटफॉर्म बरा ... आणि तितकीच घाण ... ते नकोच वाटलं !    पण मजा म्हणजे GT नंतर तीही wish पूरी झाली !   मालगुंडचा समुद्र किनारा ... काय मस्त अनुभव !   मला वाटतं,  एखाद्या ठिकाणचा अनुभव ही एक all-inclusive गोष्ट आहे ... सोने पे सुहागा, दुधात साखरकेशर ... सर्व काही ... प्रत्येक गोष्ट सुंदर होती ... आणि त्या आनंदात मी आकंठ बुडून गेले ... आत्तापर्यंतच्या आयुष्यात इतका सुंदर अनुभव फार थोड्या वेळा मिळाला ... असे फार थोडे क्षण असतात ... आणि मनातल्या मनात कितीदाही पाहिले तरी ते जुने होत नाहीत, त्यांचा सुवास दरवळतच रहातो !!!  रोज ती clip माझ्या मनात चालू असते !!!...

    एका वयापर्यंत निरनिराळी गावं, देश विदेश पहावं अशी इच्छा असतेच, पण त्या इच्छेला 'चालतं' करायला पैसे-वेळ ह्याचं पाठबळ लागतं, ते दात आणि चणे  category  तले  असल्यामुळे, त्यांच्या भेटीचा योग कमीच !    त्यातच आपल्या पायात जबाबदाऱ्यांचे भंवर लपेटलेले ... !    काशीस जावे - नित्य वदावे प्रमाणे मी काही वर्षं  'Ooty Ooty' करत होते.   मग गेले actually मैत्रिणीबरोबर Ooty ला !   उत्तम रिसॉर्ट, सुंदर सीझन, छान कंपनी !   पण माझं आणि उंचीचं - altitude चं  काही जमेना,  साध्या ८-१० पायऱ्या चढतांना जी दमछाक व्हायची, धाप लागायची, की मी अमरनाथ, बद्री - केदार, गंगोत्री-यमुनोत्री ही ठिकाणं पुढच्या जन्मीच्या wish list ला शिफ्ट करून टाकली ... Helicopter वगैरे नलगे मजला !   साधं विमानात बसलं, तर पुण्याच्या flight मधे एकदा इतके धक्के आणि air-pockets  की एका क्षणी मला सगळं लाल-लाल दिसत होतं, पण कोणीही अजून ते मानायला तयार नाही ! ...

    आता ह्या दुसऱ्या बालपणात मात्र कळलंय की tourist spots चे फोटो  जमवण्यापेक्षा experiences जमवणं जास्त चांगलं !    आता  ते माझ्या wish list वर  आहेत ... मग ते नातीशी Fox and Geese  खेळणं असो, नाहीतर नातवाशी Rock-Paper-Scissors खेळतांना आपण सतत हरणं असो !     मी experience जमवले आहे !... त्यांच्या नेहमीच लक्षांत राहील की आजी आपल्याशी खेळायची आणि आपण तिला हरवायचो !    मला आठवेल की जिंकण्यातला आनंद काय असतो ,  ते मी त्यांना दाखवलं, आणि आता ते त्यासाठी प्रयत्न करत राहतील ... नेहमीच...  अधून मधून हरलं , तरी चालतं ...!  मी त्यांना craft शिकवते, त्यांच्या project साठी हरकाम्या म्हणून मदत करतअसते  ... हे आणून दे, ... हे धरून ठेव ... आणि पूर्ण झालं की, " thank you, आजी " म्हणत Fevicol च्या हातांनी माझा गालगुच्चा ... आणि confetti म्हणत सगळे कागदाचे कपटे घेऊन माझ्या डोक्यावर shower  ... !    सुंदर experiences ची माझी wish list पूर्ण  !!!    


  

- सौ. अलका कुंटे,  बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. अलका तू खरच छान वर्णन करतेस.तुझे विचार पटण्या सारखेच असतात.खूप छान!

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you , शांता !☺️

      Delete
  2. धदभभददद

    ReplyDelete
  3. विश लिस्ट अधुरे सपने म्हणू हवं तर.लकी, खूप छान तूझी छोटी छोटी स्वप्न पूर्ण झाली आहेत.विशेषत: सांगली ला भेट देण्याचं तुझ्या मनातील कप्यात सांगली चे विशेष भावनात्मक स्थान आणि त्यास भेटण्याची पूर्तता होणे ते ही जी टी च्या निमित्ताने या सारखा दुग्ध शर्करा योग जुळून आला याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.एक मित्रत्वाचा सल्ला तुझ्या मनाच्या कप्प्यात सतत डोकावणारी व अस्वस्थ करणारी जर एखादी इच्छा असेल तर तिच्या पुर्तते साठी स्ट्राॅंग विलपाॅवर असेल तर ती नक्कीच पूर्ण होते.स्वानुभव आहे शैक्षणिक करिअर मध्ये रिसर्च व रिसोअर्स पर्सन म्हणून नॅशनल इंटरनॅशनल स्तरावर स्वतः च नांव रेखांकित करायचं.२५-३० वर्षांनी खूप मेहनतीने इच्छा पूर्ती झाली.सो एक वन तुझ्या विश लिस्ट चा प्रवास

    ReplyDelete
  4. Thank you , चंदू !☺️

    ReplyDelete
  5. *अलकाचे चणे कुरमुरे*

    *बकेट लिस्ट*

    आजच्या लिखाणाची सुरवात करताना *असा मी असामी* च्या कथनाच्या सुरवातीला पुलं म्हणतात, कुणीसं म्हटलंय,अशी सुरवात केली की लोक कान टवकारतात.तस या राहून गेलेल्या गोष्टी पुलंच्या आहेत म्हणून लोक वाचतील,नाही का ? असं म्हटलं होत.

    *पण अलकाच्या राहून गेलेल्या गोष्टी किती जण वाचतील कुणास ठाऊक.*

    असो.

    अलकाच्या मनातल्या दोन गोष्टी पुऱ्या झाल्या.त्यातली एक सांगलीची विलक्षण ओढ तिला आपल्या GT मुळे अक्षरशः लोहचुंबकासारखी खेचून घेऊन आली. दुसरी समुद्राची गाज. ती तिला सांगलीला आल्यामुळेच  एकदा मालगुंडला आणि दुसऱ्यांदा तोंडोवलीला अनुभवायला मिळाली आणि सगळ्यात मोठ्ठ म्हणजे जिवलगांचा टवटवीत आणि भरगच्च बुके मिळाला.

    आता तर  विवेकची गाडी हायवे वरून डायरेक्ट पुण्याला कधीच जाणार नाही.कोल्हापूरपाशी आल्यावर स्टीयरिंग सांगलीकडे आपसूक वळेल. कारण आता तिथे जीवलगांपैकी काहीजण आहेत ना? मग त्यांना बायपास करून कस बरं पुढे जाणार.

    अजून काही गोष्टी  राहिल्या आहेत त्या आता पुढच्या जन्मात असं म्हणून तू री सायकल बिन मध्ये टाकल्या असं लिहिलं आहेस, तर त्या पुन्हा री स्टोअर कर. आपल्या जिवलगांमुळे त्याही याच जन्मी  *याची देही याची डोळा* नक्की पुऱ्या होतील.

    कारण

    *सांगली असे बहुत चांगली*

    प्रसाद 

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

Alice in Wonderland