महिला दिनाच्या निमित्ताने
आंतरराष्ट्रीय महिला दिवस ... नेमेचि येतो मग पावसाळा ... शब्दशः ...' नेमेचि' ह्या शब्दात त्याचं दरवर्षी येणं, आणि 'पावसाळा' ह्या शब्दात, सगळ्यांना येणारं अश्रूंचं भरतं ... पावसाळा ... तात्पुरता ... मग शेफाली शहा म्हणते तसं, सगळं नेहमीचं ... गुलाबी, अश्रूमय, थापेबाजी, ... एक दिवस मखरात बसवायचं, अन् दुसऱ्या दिवशी ... ये रे माझ्या मागल्या ...
पण आज आठवण होतेय ती माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व जणींची, ज्यांनी माझं आयुष्य घडवलं ... आणि बिघडवलं ही ... कुणाला वंदू अन् कुणाला निंदू ... पण गोष्ट आहे , ती माझ्या सर्वात जुन्या पूर्वजाची ... जिला मी खरं खरं पाहीलं ... ती माझी पणजी ... तसं पाहीलं , तर ती सामान्य स्त्री होती, पण ती कधी 'असामान्य' झाली, ते नंतर केव्हातरी कळलं ...
इस्लामपूर मधे १८८३ च्या आसपास जन्मलेली आणि वयाच्या दहाव्या वर्षी लग्न होऊन पटवर्धनांच्या घरात आलेली मुलगी... लिहिता वाचता येत होतं ... यजमान त्यावेळी डॉक्टर होते. काही वर्षांनी , दोन-चार कुटुंबांबरोबर हे दोघे दोन मुलांना, म्हणजे , माझ्या आजीला आणि तिच्या मोठ्या भावाला घेऊन गावाबाहेर पडले ... नशीब काढायला मुंबईला आले. तिथे दोन वर्षं राहून मग नागपूरला त्यांनी आपलं बस्तान बसवलं ... ते ही किती सुंदर ... ! तोपर्यंत अजून दोन मुली झाल्या . गावात नाव मोठं झालं. भरपूर संपत्ती, जमीनजुमला, शेतं ... सगळं घेतलं स्वबळावर ... आणि... टायफॉईड ने घाला घातला.... माझे पणजोबा गेले. सगळ्यात लहान मुलगी जेमतेम तीन वर्षांची. काय झालं असेल पणजीच्या मनाचं ..?. पण , तिचं खंबीर रूप पहिल्यांदा समोर आलं ते तेव्हा . त्या काळाच्या रितीप्रमाणे केशवपन, सोवळं होणं ... ते तिनं नाकारलं ... तिच्या दिरांनी - जावांनी तिची पाठराखण केली. एकजूट म्हणजे काय हे दाखवून दिलं, आणि ती नेहेमीसारखी राहिली ! हा त्या काळातला केवढा मोठा निर्णय ! कसा घेतला असेल ... पण घेतला, आणि ती सहजपणे - वरवर दिसायला सहजपणे - मुलांना मोठं करायला लागली. घर, शेती सगळं संभाळलं, मोठ्या मुलाला डॉक्टर केलं, मुलींची उत्तम घरांत लग्न केली ... आणि सगळ्यांचं करत राहिली. व्यवस्थित, नीटनेटकी, बांगड्या-गोफ सगळं घालत. आततायीपणा, self-pity, स्वतःची टिमकी - मी - मी - काहीही न करत, ती आयुष्य जगली. मी तिला कधीही रडतांना पाहिलं नाही ...
तिच्या आयुष्यात संकटं आली नाहीत , असं अजिबात नाही ... तिचा मोठा मुलगा ६० पूर्ण व्हायच्या आधीच गेला, नातवंडंच नव्हे तर पतवंडंही गेलेली तिने पाहिली ... हे काय लहानसं दुःख असेल ? पण तिनं ते सोसलं ... पण कधी कुणाला शिव्या-शाप नाहीत, देवावर नाराजी नाही ... रोज सकाळी चांदीच्या कपबशीत देवाला चहाचा नैवेद्य दाखवून मग ती तो प्यायची ! आमच्या साखरपुड्यानंतर आम्ही दोघे लगेच तिला नमस्कार करायला गेलो, तेव्हा म्हणाली ... अहो , माझं भाग्य ... मी पणतूजावई पाहिला ! त्या नंतरच्या वर्षी काही महिन्यांनी खापर-पतवंड येणार हे कळल्यावर आधी आजीला सूचना, मग आईला, आणि मलाही ... ! पण तिची अन् बाळाची दोन महिन्यांनी चुकामुक झाली ... वयाच्या ९६व्या वर्षी ती गेली... त्या पणजीला आज प्रणाम ...
आणि दुसरी अशी व्यक्ती ... जी खंबीरपणाचं प्रतीक ... सुस्वभावी, ठाम, खऱ्याला खरं म्हणणारी, आणि उगीच खोटं खोटं, गोड गोड न बोलता सगळं प्रेमानं करणारी ... माझी सगळ्यात मोठी वहिनी ... दहा दिवसांपूर्वी पर्यंत माझ्या ग्रुप मधली active member, मी काही लिहिलं, काही नवीन केलं, की स्वतः फोन करून कौतुक करणारी, माझ्या घरी येऊन राहून गेलेली माझी वहिनी ... नशीब म्हणा, देव म्हणा, त्याने तिच्यावर खूप अन्याय केला, माझा भाऊ खूप लवकर गेला. उण्या पुऱ्या १२ वर्षांचं दोघांचं सहजीवन ... पण त्याच्या मागे तिने कसं निभावून नेलं, तिचं तीच जाणे ... आता मी तिला एकवचनात लिहितेय, पण आधी कधीही मी 'एकेरी' उल्लेख केला नाही. त्यांचा मान आणि कर्तृत्व एवढं, सोशिकता इतकी, तपश्चर्या इतकी, आपोआप 'अहो वहिनी' च निघावं तोंडातून ... दोन्ही मुली उत्तम शिकल्या. स्वतः वहिनी एवढ्या शिकलेल्या, की मुलींनी शिकणं हे आलंच ... आयुष्यात काय कमी चिंता, कष्ट नसतात ... पण दोघांच्या वाटच्या एकटीनं झेलल्या , एक खांबी तंबू सांभाळला ... हॅवअनेक जण करत असतील, पण म्हणून त्या अनेक जणांचं आयुष्य सोपं होतं असं नाही ... रोजचे, भविष्याचे challenges, काळज्या, कसं तोंड दिलं असेल ... एवढं होऊनही कुणाबद्दल आकस नाही, राग-त्रागा, बोटं मोडणं नाही ... जशी 'अस्मानशाही' वाट्याला आली, तशी 'सुलतानशाही' ही भोगली ... नशीब, आजूबाजूची माणसं, परिस्थिती, सगळ्यांशी झुंजली ... एकटी ... आणि दोन्ही मुलींना असं घडवलं की कुणालाही वाटावं ... अशा मुली असायला हव्या आपल्यालाही ... सामान्यातली असामान्य ... आज तिचा दहावा ...अशा माझ्या वहिनीला माझा सलाम ...
या महिला दिनाच्या निमित्ताने अजून खूप जणींना आठवणीने सांगायचे आहे , की तुम्ही माझ्या मनात नक्कीच आहात ... रोजच्या रोज सगळ्या देव्या, पंचकन्या, सगळ्यांना आपण पूजतोच ... स्तोत्रं म्हणतो, श्लोक म्हणतो ... पण ज्यांचा उल्लेखही करत नाही, taken for granted अशा बायका-मुली ... त्यांचं काय ? ...
माझ्या सारख्या ... ज्या सावित्रीबाई फुले , रमाबाई रानडे नाहीत, डॉ. मंगला नारळीकर नाहीत, हिराबाई बडोदेकर नाहीत, कमलाबाई सोहोनी नाहीत, हेलन केलेर , मेरी क्युरी नाहीत , शांता शेळके , बहिणाबाई चौधरी , जनाबाई नाहीत, दुर्गाबाई खोटे नाहीत, नीरजा भानोत, बचेंद्री पाल, सुधा मूर्ती, P. V. Sindhu , दीपा मलिक, किंवा पहिली वैमानिक, astronaut, पहिली fire fighter किंवा engine driver नाहीत ... अशा सामान्यातल्या सामान्यांचं काय ... ? सगळ्या मोठ्या नावांना तर मानाचा मुजरा आहेच ... तो कमीच पडेल ..!.
तर , ह्या सगळ्या सामान्य बायकामुलींना एक एक फूल ... प्रेमानं दिलेलं ... मनापासून ... त्या त्यातही खूष असतात बिचाऱ्या ... !
आणि, हो एक विसरले ... जे काही दुर्दैवी जीव ... ज्यांना त्यांच्या ' वेगळे'पणामुळे जगाने नाकारलं, झिडकारलं ...ज्यांना , स्त्रियांनी नव्हे , तर स्त्री वेषाने आसरा दिला, सांभाळलं, त्यांचं निदान एकवेळचं तरी पोट भरलं ... त्या सगळ्यांसाठी ... एक अश्रू ......
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
खूप सुंदर लिहीले आहेस....... आपल्या पणजी बाई आणि वहिनी या दोघांना मनापासून नमस्कार 🙏🙏
ReplyDeleteआणि ज्यांचं जगणं पराकोटीचं कठीण असतं त्या ट्रान्सजेंडर व्यक्ती ज्यांचा स्वतःचा काहीच दोष नसतो केवळ नशीब आणि नशीब.... त्यांच्यासाठी अश्रू हे मनाला स्पर्श करून गेलं ! 🙏🙏
Thank you , विनया !
DeleteMastach!
ReplyDeleteThank you , ताई !
Deleteस्त्री शक्ती ची परंपरा खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहेस.आजच्या पिढी ला फक्त आपणच जे त्या घटनांचे साक्षीदार आहोत हे दाखवून देतो आणि त्यातून त्यांना प्रेरणादायी ठरेल.खूपच छान मांडणी.लिखते रहो लकी
ReplyDeleteThank you , चंदू !
DeleteThanks once again ...
ReplyDeleteBY READING LAST 3 PARAS ,TEARS CAME DOWN. IT MAY BE DUE TO SIMILAR EXPERIENCES
ReplyDeleteIN OUR FAMILY ALSO. I AM NOT HAVING WRITING SKILLS. YOU HAVE THAT. BUCK UP. YOUR WRITING BECOMING MORE MATURED. TRY TO BE CELEBRITY IN THIS FIELD.
MY PC NOT ACCEPTING MARATHI. I HAVE TO LEARN.
Thank you , Yashodhar !! Language is not important ... Feelings are !!
Deleteअलकाचे चणे कुरमुरे
ReplyDeleteसामान्यांचं असामान्यत्व
गावाला गेलो असल्यानं तुझी महिला दिनाची पोस्ट वाचायला थोडा उशीर झाला. पणजी आजी आणि थोरल्या वाहिनी यांच्या बद्दल खूप छान लिहिलं आहेस. अचानक अंगावर पडलेली कौटुंबिक जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली आणि उत्तम संस्कार करून मुलाबाळांना मोठं केलं मुलींची लग्न सुस्थळी करून देऊन कर्तव्यपूर्ती देखील केली आणि ती ही कुठलाही *अहं* न बाळगता. यालाच सामान्यांचं असामान्यत्व म्हणायला पाहिजे.
कुटुंब सावरणाऱ्या सामान्य स्त्रिया देखील मला डोक्यावर पृथ्वी तोलून धरून भर पेलणाऱ्या शेषनागाइतक्याच महत्वाच्या वाटतात.
तुझी पणजी आजी आणि *आहो वाहिनी* अगदी तशाच होत्या. त्यांना सादर वंदन.
प्रसाद
Thank you , Prasad ! ☺️
Delete