Live - In ...

 

    नुकतीच एका कार्यक्रमाला जाऊन आले.   मैत्रिणीच्या मुलीच्या डोहाळजेवणाला असेल.   त्यामुळे सर्व बायकांचं राज्य होतं.  आम्ही मैत्रिणी एका बाजूला बसलो होतो आणि बाजूला तरुण मुलींचा मोठा ग्रुप होता.   मस्त दंगा चालला होता, अगदी मोकळेपणानी, आणि मुलींचा मोकळेपणाने दंगा म्हटलं की काय काय बोलणं चालू असतं, ते न विचारलेलं - न सांगितलेलं बरं  ... 

    तेव्हा , चिडवाचिडवीमधे आता पुढचं डोहाळजेवण, बारसं कुणाकडे ? ... असा 'passing the parcel' चा खेळ चालू होता - बोलून खेळायचा ... मधेच कुणाचं तरी नाव आलं. छान नटून थटून ,  गळ्यात मोठ्या काळ्या मण्यांची माळ घालून बसलेली मुलगी .  ती पटकन म्हणाली, "अगं, लग्न तर होऊ दे आमचं. मग बघू. " ...   " म्हणजे ?"...   "अगं मावशी, आम्ही सध्या live-In relationship मधे आहोत ... आमचं जमलं, तर लग्न, नाहीतर तata, bye-bye... nice to have met you  ... "

   'ऑ '?! ... माझा 'आ ' च  राहीला !    असं खरंच , actually  असतं ? फक्त गोष्टी  लिहिण्यापुरतं नसतं ? ...  हे आता बऱ्याच ठिकाणी common  होतंय, पेपरात matrimonial ads मधे ही लिहिलेलं असतं की live-in ला  पण तयार आहे ... थोडावेळ डोकं बधीर झालं ... अशा गोष्टी ऐकणं - वाचणं वेगळं आणि प्रत्यक्षात आपल्या समोर पहाणं वेगळं ... 

    अहो, जग पुढे गेले आहे ... कबूल, पण इतकं ?    ५०-६० वर्षांपूर्वी love marriage चा काळ होता.    love सगळेच करायचे, पण marriage करणं सगळ्यांनाच जमायचं असं नाही.   यातला मजेचा भाग जाऊ द्या, ... तेव्हा ह्याला पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण असं म्हटलं जायचं.   त्यातही बरेच points होते, काही चांगले, काही वाईट ... पण हे तर त्याच्याही पुढे जातंय सगळं ... खूप विचार मनात येत होते ... 

    Live-in चा  विचार करण्यामागे काय कारण असेल ?    लग्नात होणारे खर्च, अजून हुंडा वगैरे प्रथा पूर्णपणे संपत नाहीयेत,  या ना त्या प्रकारे 'मागण्या' चालूच असतात....    वारेमाप खर्च टाळण्यासाठी वगैरे विचार ह्या मागे असू शकतो,  पण ह्या गोष्टींना फाटा देऊन, सरळ साधेपणाने लग्न होऊ शकतात, रजिस्टर , किंवा कोर्ट marriage , किंवा , अगदी लहानसा समारंभ ? ... त्याला live- in हे उत्तर असू शकत नाही.   तर ही मनमानी आहे का ?    का जबाबदारीच नको आहे घ्यायला त्यांना.   आणि स्वतःची ही नकोय ?    लग्न म्हणजे फक्त नटणं मुरडणं , दागिने, honeymoon नाही, तर एक serious matter  आहे.    आपल्याकडे लग्न म्हणजे एका व्यक्तीशी होत नाही,  तर एका कुटुंबाशी होतं.    साहजिकच सगळ्यांसोबत रहायचं - not necessarily एकत्र   रहायचं ... तर sharing  आलं, compromise म्हणा किंवा adjustment म्हणा आलीच,  सुख-दुःख, आजार, सणवार सगळं आलं, त्याची जबाबदारी आली ... 'गणपती'ला मोदक खायचेअसतील , तर चार मोदक करायची, सजावट करायची, निदान सकाळी लवकर उठून, आंघोळ तरी उरकायची जबाबदारी आली ... ते सगळं बहुधा live-in  मधे टाळता येतं  ...  म्हणून तर नसेल ?    पण मुळात हा कंटाळा आला कुठून ?    का आपल्या पिढीने हे सर्व करतांना नाखुषी दाखवली ?    तसं  असेल ही , पण कदाचित त्या वेळेपुरतं, किंवा दुसरी काही कामं, कसली emergency वगैरे मुळे तेवढ्यापुरतं होतं, पण मुलांनी नेमकं तेच मनात धरून ठेवलं ?

    आजकाल ह्या live-in चा precursor म्हणजे   boyfriend -girlfriend हा concept !    आपल्या पिढीला तरी boyfriend या शब्दाचा अर्थ ... a  friend who happens to be a boy ... असा.    आता त्याचा अर्थ भलताच आहे.   त्याच्या पुढची पायरी म्हणजे live-in ... ?

    आजकाल आपल्या आवडीचा पार्टनर शोधण्याची मुभा आहे.   पण एकदा निवड केल्यावर मग चार लोकांसमक्ष  त्या नात्याला मान्यता मिळवणं, एक serious अर्थ  देणं, म्हणून लग्न.   जुन्या काळी हा सांधा अभेद्य, अतूट असा समजला जायचा, शाश्वत असा ... पण तसं आता नाही ... त्यात गैर आहे असं नाही, पण जरा ठण्ण झालं की तुटलं नातं... इतकं तकलादू ही नाही - नसावं !    जगात काहीच शाश्वत नाही हे मान्य करून ही ! 

    बरं, ह्यातल्या risks ची कल्पना नाही, असं ही आपण म्हणू शकत नाही.   चांगली शिकलेली-सवरलेली-सुजाण, self-aware, street-smart , अशी ही मुलं -मुली हा विचार करत नसतील हे खरं वाटत नाही.   मग का हे सगळं ?

एकदा घर म्हटलं की ते नीट वसवण आलं, खर्च आले, पैश्याचा प्रश्न आला, पैसा खर्च अर्धा-अर्धा करता येतो, पण मग मधूनच भावनीक गुंतागुंत ?   दोघांचे विचार जुळतही असतील, पण भावना ?   वादविवाद-भांडाभांडी झाली की  ?  भांड्याला भांडं लागलं की..? तडजोड करायचा प्रश्नच नाही - दोघेही independant  !   की , दोघे आपापल्या वाटेने जाणार, मग हे live-in तरी कशाला ?    हेच भांडण पुढे विकोपाला गेलं की आरोप-प्रत्यारोप, वचन देऊन फायदा घेतला , इथपासून ते rape charges लावायला पोलीस ठाण्यात जाणं !   ही  कसली relationship ... ? आणि , ज्यात भावना नाहीत , ते कसलं relation ?...

    आपण हळूहळू सभ्यता   -   आजच्या established code of conduct प्रमाणे ज्याला आपण आजपर्यंत सभ्यता म्हणतो  ती -  विसरलो आहोत की ती मुलांना शिकवायला विसरलो आहोत ?    का दर ५० वर्षांनी संस्कृती-विचारधारा, वागण्याचे नियम, समाज , बदलतो असं म्हणतात, तसा हा बदल आहे का ?    आणि आत्तातरी हा बदल चुकीच्या मार्गाने होतो आहे का ?    चाळीस एक वर्षांपूर्वीपर्यंत तरी मध्यप्रदेशातील बस्तर आणि आजूबाजूच्या जंगल भागात राहणाऱ्या आदिवासींच्यात एक प्रथा होती.    लग्नाच्या वयाची मुलंमुली  'घोटूल' मधे जात असत. ही एक युवक-युवतींची वस्ती असायची.  साधारण दोन महिन्यांकरता तिथे जायचं, रहायचं, आपला सहचर-सहचरी कोण असावी, आपलं कुणाशी पटतंय, आपल्याशी कोण पटवून घेतंय - सर्व तऱ्हेनी - हे पहायचं, आणि दुसऱ्या व्यक्तीची मान्यता असेल तर 'घोटूल' संपल्यावर लग्न !   पण ,मग तिथे मन बदलण्याचा, नंतर कधी सोडून जाण्याचा पर्याय नसायचा.   नुसतं पंचांसमोर जाऊन 'हा नवरा नको किंवा ही बायको नको' असं करता येत नव्हतं.    इथं अमेझॉन वगैरे सारखं  'return- no questions asked'   असं नव्हतं .   

    आपण जुन्या वन्य-अवस्थेकडे परत फिरतोय का ?    महाभारत-रामायण काळात एका पुरुषाला अनेक बायका, किंवा एका स्त्रीला अनेक नवरे हे होतं.   थोडीफार ही त्या काळाची गरज होती, survival साठी, मनुष्य जात जिवंत रहायला हवी, किंवा राज्य टिकावं म्हणून वगैरे.   तसंच, तेव्हा 'बीजक्षेत्रन्याय' असा एक शब्द आणि नियम होता, एक उदाहरण म्हणजे जमिनीत बीज कुठूनही पडो, कोणीही टाको, त्यामुळे उगवलेलं सगळं त्या जमिनीच्या मालकाचं ... त्यानुसार एखाद्या बाईची आधीची मुलं ही तिच्या लग्नानंतर तिच्या नवऱ्याचीच समजली जायची.   तसंच त्या वेळच्या साहित्यात 'कानीनपुत्र'  हा शब्द आहे - त्याचा अर्थ कन्येचा ( लग्नापूर्वीचा ) कन्या अवस्थेत झालेला पुत्र,  उदा. कर्ण  ... कुंतीने ह्या मुलाबाबत मौन पाळल्यामुळे महाभारत घडलं.   ती बोलली असती तर कदाचित ते टळलं ही असतं ! 

    ... point हा आहे की, अश्या live-in relation मधून अशी परिस्थिती उद्भवली तर ?  आजकाल सगळेच smart आहेत, पण कधी कधी भावना उफाळतात, एकमेकांविरुद्ध डावपेच-कुरघोडी असतेच, आणि असं काही झालं तर त्याची जबाबदारी कोणाची ?   आणि त्यामुळे होणारा शारीरिक, मानसिक त्रास ... त्याचं काय ? नंतर , केव्हा तरी , किंवा पुढच्या  काळात अशा तऱ्हेचा  भूतकाळ  असलेल्या व्यक्तीचा आपल्याशी काही संबंध आला , तर तो accept करण्याइतकी maturity आपल्या पिढीत , किंवा आजच्या पिढीत आहे का , असेल का ?... किंवा ह्या relations मधून उद्भवणारे legal प्रश्न ...?

      ... कदाचित हे विचार अगदी बाळबोध असतील,  माझी मजल तेवढीच आहे,  असं म्हणा हवं तर !   पण फार भीतीदायक वाटतं हे .    खरं प्रेम शोधणं, नंतर कटकटी नकोत, म्हणून trial basis वर रहाणं , असं म्हणत असतील, पण पुन्हा म्हणावसं वाटतं की लग्न हा पोरखेळ नाही, जबाबदारी आहे, हे agreement  किंवा contract नाही, गंमत म्हणून केलेली मौज मजा नाही, fancy dress मिरवणूक नाही, तर एक प्रकारची प्राणप्रतिष्ठा आहे, तेव्हा विचार करायला हवा  ... हा भातुकलीचा खेळ नाहीये ...

    ...coming back to ते डोहाळजेवण ... मी ह्या विचारांच्या वादळातच होते, डोक्यात क्षण-दोन क्षणांत एवढे विचार येऊन गेले ... तिकडे दुसरी एक मैत्रीण मला कोपराने ढोसत कानात कुजबुजत होती, "... अगं, ....ती काय म्हणतेय बघ ... live-in म्हणे ...  विचार करत होते .... शेजारच्याच बिल्डिंग मधेच रहातेय...  हिलाच बोलवावं  का .... शुक्रवारची सवाष्ण म्हणून ... .... आता गं ... ?"...       




- सौ अलका कुंटे, बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५


Comments

  1. काय आहे जमाना बदला तरी इतका बदल म्हणजे विचारापलीकडचेच आहे हो की नाही अलका बाकी मस्त लिहिले आहेस

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद ...

      Delete
  2. *अलकाचे चणे कुरमुरे*

    *Live in relationship ?*

    गेल्या काही दिवसात माझ्या कानावर सुद्धा सातत्यानं Live in relationship हे वाक्य पडत होतं. पुण्याला गेलो असताना त्या कार्यक्रमात *दोन जोडपी* बिन लग्नाची एकत्र राहतात असं कळलं. सांगलीला परत आल्यावर एकजण याच प्रकारे त्याच्या गर्ल फ्रेंड बरोबर एकत्र रहाणार आहे असं कळलं.

    काय चाललंय हे सगळं. हे म्हणजे हौस मौज हवी. छान छोकी हवी. स्वातंत्र्य हवं. अनिर्बंध राहता आलं पाहिजे. कोणी कोणावर कुरघोडी करू नये. कौटुंबिक जबाबदारी घ्यायला नको. सगळं दुष्टचक्र आहे असं वाटायला लागलं.

    कुणीही यावे टिकली मारून जावे म्हटल्या सारखा हा काय भातुकलीचा खेळ आहे.आज याच्याबरोबर मांडला आणि मोडून उद्या दुसऱ्याबरोबर मांडला. पुन्हा दुसऱ्या बरोबर रहाताना त्याच्या पेक्षा पहिला बरा वाटला तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणत परत जायचं का ? मला तर हा स्वैराचार वाटतो. हे म्हणजे रुचीपालटासाठी आज महाराष्ट्रीयन, उद्या गुजराथी तर पर्वा पंजाबी थाळी जेवायला गेल्यासारखं आहे. विवाह बंधनाच्या पवित्र सोहळ्यात गुरुजी *धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी* अशी शपथ घ्यायला लावतात ते काय उगीच आहे काय ?

    उद्या दोघांचं पटेनास झालं तर कोणी एकमेकांवर अनैतिक संबंध ठेवले म्हणून आरोप करतील काय ? या संबंधातून काळजी घेऊनही जर संतती निपजली तर जग कावळ्याच्या चोची सारखं त्यांना टोच्या मारून हैराण करेल. मग ती अनौरस संतती पुढच्या काळात त्यांच्या जन्मदात्यांना क्षमा करेल का ? पूर्वीच्या काळी अशा संततीला *लेकावळा* म्हणून हिणवलं जाई. ज्या समाजात आपण रहातो तो आपला समाज अजूनही याला मान्यता देत नाही.

    त्या बद्दल कायदेशीर बाबी काय म्हणतात याचा सुद्धा विचार व्हायला हवा. धर्म,समाज,जगरहाटी रसातळाला नेऊन ही पिढी काय मिळवणार आहे तेच कळत नाही.

    सारं आयुष्य एकाच जोडीदाराबरोबर रहाणाऱ्या जोडयांमध्ये हंसाला प्रेमाचं प्रतीक मानल गेलं आहे.
    जे पक्षांना कळलं ते शिकल्या सावरलेल्या तरुण पिढीला कळत नाही हा दैवदुर्विलास म्हणायचा आणखी काय .

    ख्रिश्चन धर्मात सुद्धा येशूने वधस्तंभावर जाताना, प्रभू ते काय करतात हे त्यांना समजत नाही, म्हणून त्यांना क्षमा कर. ही प्रार्थना केली होती.

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे अशी प्रार्थना सद्गुरु श्री वामनराव पै यांनी केली आहे ती बहुदा हा अनाचार करणाऱ्या पिढीसाठी असावी.

    या दोघांच्या प्रार्थना या *Live In* मध्ये रहाणाऱ्या जोडप्यांना सुद्धा तंतोतंत लागू होतात असे वाटते म्हणून आपणही या प्रार्थनेनंतर आमेन किंवा तथास्तु म्हणूया.

    या विषयावर मत मतांतर तर असतीलच आपापल्या मगदुराप्रमाणे लोक व्यक्त होतीलच.पण अलका एका गंभीर आणि ज्वलंत विषयाला वाचा फोडलीस.

    *Great Job*

    प्रसाद

    ReplyDelete
  3. आपल्या विचार शक्ती च्या पलीकडचे आहे ... नवीन पिढीच्या मनात काय काहूर आहे , कळत नाही ... असं का व्हावं ते ही कळत नाही ...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland