बन्नी मेडम बन्नी सर ..
दोन वर्षे झाली !.... पहीला लॉकडाऊन ! लॉकडाऊनची बातमी आली ... आणि सर्व जगच माझ्या भोवती फिरलं. अचानक चक्री वादळ यावं, छप्पर उडावं, पायाखालची जमीन सरकावी, तसं झालं. असं कधी आत्तापर्यंत झालं नव्हतं .नव्वद - शंभर वर्षांपूर्वी प्लेग च्या साथी येत , तेव्हाचं वर्णन ऐकलेलं होतं ...
दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, तरी सगळीकडे कसलातरी बिनवासाचा काळा - करडा - राखाडी धूर असावा , असं, घुसमट करणारं सावट पडलं होतं ..... दिवस-रात्र उलटत होते, वास्तवाची जाणीव होत होती. बाटलीभर तेल, २ - ३ भाज्या किती दिवस पुरणार ? सगळी दुकानं अशीच बंद राहिली तर ? औषधं मिळतील का रोजची ...? असेच दिवस गेले, आठवडे गेले. दिवसा निस्तेज सूर्य आणि काळ्याकुट्ट रात्री ... आज काय? हा गेला. उद्या काय? ती ICU मधे. कोणालाही ताप आला तर जीवाचा थरकाप होत होता, काळजाचं पाणी पाणी होत होतं .....
देवा, हे काय आक्रीत आणलं आहेस ? इतकी पापं जास्त झाली का आमची ? आधी का नाही कल्पना दिलीस , का हीच ती warning bell आहे ? का हाच शेवट आहे ? ... खरंच, तुझ्यावर विश्वासच ठेवावासा वाटत नाही. का नाही ? देवा, तूच विचार कर. माझ्याबाबतीत सांगायचं म्हणजे, अपेक्षाभंगापासून ते भविष्यावरच प्रश्नचिन्ह उभं रहावं असे एकेक प्रसंग ! त्यातून तूच सावरून नेलंस ! पण खरंच का ? दरवेळी मी म्हणावं, " बचावलो, एवढ्यावरच निभलं." हे सावरणं का ? मुळात तुझ्यावर विश्वास आहे का माझा ? जर असेल, तर तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न का पडतो ? आणि नसेल, तर संकटात दरवेळी तूच का आठवतोस ? मी काही कुंतीसारखं तुला मागितलं नव्हतं की " बाबा रे, मला संकटंच दे, म्हणजे तुझी आठवण राहील !" का हा तुझा plan च आहे, म्हणजे तू मला आठवत राहाशील ? तुला माहीत आहे का, दर हसऱ्या चेहेऱ्या मागे त्याच्या दसपट रडू कोंडलेलं असतं ?...माझंच नाही , सगळ्या जगाचं ही असंच आहे ... मी माझ्याच मनाशी भांडत होते ....
..... तर असे सहा महिने गेले, वर्ष उलटलं . रोजची चिडचिड, राग, काळज्या, मनस्ताप, कटकटी. जगाचाच नाही, तर जगण्याचाच वीट आला होता. वातावरण सुधारतंय का आपण आपलं समाधान करून घेतोय ? आपण रेटतोय सगळं, तसंच लोकांचंही होत असेल? नेहेमीचे अनोळखी लोक पण ओळखीचे चेहेरे दिसत नाहीयेत. आपल्या माणसांची , मित्र- मंडळींची खुशाली कळतेय ,पण भाजीची हातगाडीवाला, फुलवाली, देवळासमोर उदबत्या - नारळ विकणारे आजोबा, छोट्या दुकानातले शिंपी, मोची ... कोणीच दिसत नाहीयेत आजकाल ...कधी संपणार हे सगळं ?
पण आज सकाळी मजाच झाली ! अचानक त्याचा आवाज आला ! गेलं वर्षभर तो दिसला नव्हता. कन्नड भाषेत " बन्नी मेडम, बन्नी सर ! ... या मेडम, या सर, झिप्स बदलून घ्या, बटणं - काजं करून घ्या, शिवणी घालून घ्या, सुऱ्यांना धार लावून घ्या ...!" असं ओरडत तो तरुण मुलगा TVS वर छोटं मशीन ठेवून फिरायचा, छोटी छोटी कामं करायचा ! तो लॉकडाऊन मध्ये कसा येणार ? त्याचा हसरा चेहरा डोळ्यासमोर यायचा. बहुतेक धंदा बसला असेल त्याचा ... काय खाईल ? कसा जगेल? त्याच्या घरी कोण कोण असतील ?... तो आणि त्याच्यासारखे आणखी कितीतरी ... बिन नावाचे, बिन चेहेऱ्याचे, त्यांच्या असण्याचा किंवा नसण्याचा, कोणालाच पत्ता नाही ... आणि आज त्याचा आवाज आला !
... इतका आनंद झाला म्हणून सांगू ! सावरतंय, जग नक्की सावरतंय ! बरं म्हणे...,तो वर बसलेला सगळं सावरतोय ! दुसरी लाट , तिसरी लाट ... अशा किती लाटा येणार आहेत , कोण जाणे ? पण हा कोणत्याही जीवाचा आशावाद की सगळं ठीक होणार आहे !! जसा बुडत्याला काडीचाही आधार पुरतो , तसा हा ' बन्नी मेडम ' वाला मला काहीतरी आश्वासन देतो , आणि मी उठून आळस , मरगळ झटकून कामाला लागते !!! ...
.... कोण कुठला हा मुलगा, त्याचा माझा काय संबंध ? आज माझ्या मनाला उभारी देऊन गेलाय ! मी त्याची काळजी करत होते, हे त्याला माहीत नाही, आणि त्याने मला आशेचा किरण दाखवलाय, हे ही नाही ! .....
Comments
Post a Comment