एका मुलाची कैफियत

  

    आजी - आजोबा, आई - बाबा,  आत्या, मावशी ... सगळ्यांनाच हे पत्र . 

    आज मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं  आहे. माझी कैफियतच मांडायची आहे म्हणा नं.   काल रात्री तुमच्या सगळ्यांच्या - मोठ्या माणसांच्या गप्पा मी ऐकल्या.   चोरून.   तुम्ही तुमच्या लहानपणच्या आठवणी काढत होता, पण खरं म्हणजे मुलांना नावं ठेवायचा तुमचा कार्यक्रम असावा असं वाटलं ... 

    'आजकालची मुलं'  हा विषय असल्यावर दुसरं काय असणार ?   ती उध्दट आहेत, बेदरकार आहेत, स्वार्थी आहेत, त्यांना काहीही माहीत नसतं, कशाचीही आवड नाही, कसलाही ध्यास नाही , नकार पचवायची ताकद नाही ,    जे जे वाईट आहे ते सर्व ह्यांच्यात आहे - नव्हे तुमच्या भाषेत 'पाचवीलाच पुजलेलं' आहे ... अगदी खरं आहे ते.   पण ते तसं का आहे ह्याचा विचार तुम्ही केलाय का कधी ?

    मी जन्मलो तेव्हा नक्कीच इतका वाईट नव्हतो.   मग असा कसा झालो ?   तुम्हीच वळण लावलंत नं मला.   का लावलंच नाहीत ?  माझ्या आवडी निवडी तुम्हीच घडवल्या.   काय चांगलं, काय वाईट ह्या कल्पना तुम्हीच रुजवल्यात.  का तुम्हीच मला घडवायच्या ऐवजी बि-घडवलंत ? कोणाचं चुकलं ?

    तुम्ही काल बोलत  होतात. सगळे कसे दिवाळीला आजोळी जायचात, सुट्टीत आत्याकडे नाहीतर मामाकडे जायचांत.  सगळे भाऊ-बहिणी मिळून खूप खेळायचांत,  खूप खायचांत, रात्री गच्चीवर गप्पा - गाणी, भुतांच्या गोष्टी,  तर दिवसा शेतावर  हुंदडणं...  'मला हे सगळं कसं कळणार' म्हणालात,  खरंच मला कसं समजणार ?   तुम्ही कधी नेलं आहे का मला आपल्या गावाला ?   कधी पाठवलं आहे का मामा किंवा मावशी, आत्याकडे ?   'तांदुळाची झाडं' कशी असतात, असं मी म्हटल्यावर तुम्ही मला हसता, पण शेत कसं असतं ते मी फक्त TV अन सिनेमात पाहिलंय.  मी अंदमान - निकोबार पाहिलं आहे सुट्टीत, पण आपलं गाव नाही  पाहिलं. मला Alps, हिमालय सगळ्यांच्या 'उंच्या', समुद्रांच्या 'खोल्या' सगळं माहीत आहे, पण मी कधी डोंगरावर चढलो नाहीये, जंगलातली पायवाट, नदी हे मी फक्त चित्रात पाहिलंय.  हा कोणाचा दोष ?

    तुम्ही सगळे खेळायचात.  मला कुठे आहेत भाऊ - बहीण ?  कितीदा भेटतो मी माझ्या cousinsना ?   कशी होणार आमची ओळख आणि मैत्री ?  शाळेत moral science मधे शिकवतात, 'share' करा वगैरे पण so-called मित्रांशी काही share करणं म्हणजे आपल्या वस्तूंना कायमचं 'टाटा' करणंच असतं.  तुम्हीच विचार करा, माझ्या वस्तूंशी मी खूप attatched आहे.  हो आहे.  कारण त्यांच नेहमी माझ्याबरोबर  असतात. माझ्या मनातल्या भित्या, दुःखं, काळज्या मी त्यांनाच सांगतो.  आई - बाबा नसले की एकटं बसून काय करायचं म्हणून मी TV बघतो, टॅबवर मित्रांशी चॅट करतो, फोनवर तास न तास बोलतो.   पण ते नको करु तर काय करु ?   सतत अभ्यास ?   माझ्या एकटेपणाची तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का ?

    मला रामरक्षा येत नाही म्हणून तुम्ही मला हसता.  रामाच्या, महाभारतातल्या, शिवाजीमहाराजांच्या गोष्टी माहीत नाही म्हणून तुम्ही सगळे चुकचुकत होतात.  पण मला ह्या गोष्टी सांगायला,  श्लोक शिकवायला तुम्हाला वेळ होता का ?  आई - बाबा त्यांच्या कामातून आणि आजी - आजोबा त्यांच्या TV serials मधून वेळ काढत होते का ?   का मी हे सगळं आपला आपलाच शिकणार होतो ?   पण नकोच तो विषय, नाहीतर मला कुठल्यातरी संस्कार वर्गात पाठवतील - ते ही पहाटेच्या बॅचला !

    तुमची आजी कशी छान थालिपीठं करायची म्हणायचांत तुम्ही, पण आईने कधी केलेलं मला आठवत  नाही. तुम्हाला दिवाळीतसुध्दा चकल्या - करंज्या करायचा कंटाळा येतो, त्याचं काय ?   आई 'चायनीज' करायला शिकली,  पास्ता करायला शिकली, तर बाबांनी तिचं किती कौतुक  केलं!  रोज तेच-तेच खाऊन कंटाळा येतो म्हणून, नवीन आवडतं म्हणता.  वीक-एन्डला बदल म्हणून इडली - डोसा खाता.    मग मला कंटाळा आलाय म्हणून मी पिझ्झा मागितला, तर ते चूक ?

    मागच्या रविवारी आपण 'मॉल' मधे गेलो  होतो. तिथे छोटी छोटी मुलं वाट्टेल ते करत होती. सगळ्या तऱ्हेचा वेडेपणा.   पण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना काहीच म्हटलं नाही.   त्यांचं लक्षच नव्हतं.  खरं म्हणजे त्यांनी लक्ष द्यावं म्हणूनच मुलं तसं करत होती.   कसं वागलेलं चालतं, किती करायचं, कुठे थांबायचं, हे सांगितल्याशिवाय कसं कळणार मुलांना ?  मग त्यांच्या आई-वडिलांचं चुकलं का मुलांचं ?

    शेजारची 'ताई' कॉलेजमधे जाते.  तिचे कपडे कसेही असतात, हे सगळ्यांचंच मत आहे.  पण तिच्या आई-वडिलांना तसं वाटत नसावं.  ती बऱ्याच गोष्टी करते, त्या बरोबर नाहीत हे कळण्याइतका मीही मोठा होतोय.  तुम्हाला कल्पनाही नसेल अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत आहेत. फक्त मी बोलत नाही.  काय चांगलं, काय वाईट हे मला हळूहळू कळेलच. 

    मी - माझी पिढी स्वार्थी आहे असं तुम्ही म्हणता.  ते ही खरंच आहे.  पण आपण   'आपल्यापुरतं पाहावं, उगीच मधे पडू नाही.  आपण बरं की आपलं काम बरं '   अशीच अलिप्तपणाची भाषा मी ऐकत आलो. आणि आपलं काही मटेरियल कोणाशी share केलं , आणि तो माझ्याहून वरचढ ठरला तर ? तुम्ही रागवाल ! म्हणून मी कशातच पडत नाही.  कोणाशी बोलत नाही , तर तुम्ही मला माणुसघाणा म्हणता . मला अभ्यास, वेगवेगळे क्लासेस, खेळ सगळंच 'कंपलसरी' !  मी अभ्यासात पहिला आलो पाहिजे, सगळ्या कॉम्पिटिशन्स मधे पुढे पाहिजे, खेळात  मेडल मिळवलं पाहिजे.  सर्वच उत्तम केलं पाहिजे. मला इतक्या गोष्टींत तुम्हीच अडकवलं आहे की मला कशालाच वेळ नसतो.  कसा जगू मी, अन कोणाशी बोलू ?  वेळ कुठे आहे ?

    रोजच्या रोज जग बदलतंय.  नित्य नव्या घटना, नवी धोरणं, नवे नियम.  मला माझ्या भवितव्याची चिंता नसेल ?  इतकी टेन्शन्स ?  मी हसतमुख  कसा रहाणार ?  तुम्ही माझ्या भविष्याचे भरपूर प्लॅन्स आखले आहेत, पैसे ठेवले आहेत, सगळ्याचा विचार आधीच केला आहेत.  पण माझ्या आवडीचा विचार ?  तो ही तुम्हीच करणार ? का करणारच नाही ?

    हे आयुष्य ही एक लढाई आहे असं मला वाटतं.  तुमच्याशी, तुमच्या अपेक्षांशी, माझ्या मनाशी, सगळ्यांशी माझीच लढाई.  १ मिनिट उशीर झाला की क्लास बुडणार, १ दिवस उशीर झाला की डेड लाईन जाणार, १ मार्क कमी पडला की ऍडमिशन जाणार.  क्षणा -क्षणाला काहीतरी भयानक घडेल अशी भीती.  चार दिवसांपूर्वी माझ्या सिनियरने आत्महत्या केली.  का ?  कारणं बरीच होती.  त्याचं ऐकल्यावर आम्हा सगळ्यांचंच धाबं दणाणलं.  जगायचीच  भीती वाटायला लागली.  इतकं कठीण असतं का जगात राहणं ?  तो का नाही आपल्या आईवडिलांशी बोलला ?  का बोलला, पण त्यांनी नाही ऐकलं ?  का त्यांना ऐकायला वेळ नव्हता ? कदाचित त्यांना त्यांच्या मुलापेक्षा इतर गोष्टी जास्त महत्वाच्या वाटत होत्या ?  त्यांना त्यांच्या मुलाचं मन कळलंच नाही ?  परत तोच प्रश्न.  कुठे चुकलं ?  कोणाचं चुकलं ?  माझ्या बाबतीत असं झालं तर असेल का तुम्हाला वेळ ?  मी दमलो-भागलो, ठेचकाळलो, तर कराल का मला माफ ?  तुमचा आधार मिळेल का मला ?  का परत तेच ?

    कधीकधी तुमचा सगळ्यांचा खूप राग येतो मला.  मनावर घातलेली ही जोखडं झुगारून द्यावीशी वाटतात.  सगळ्यांशी भांडावंसं वाटतं, सगळ्यांच्या चुकांची मापं त्यांच्या-त्यांच्या पदरात घालावीशी वाटतात.  सगळं मोडून, तोडून, जाळून टाकून, नाहीसं करावंसं वाटतं ... 

    ... म्हणजे मग सगळं पुन्हा नव्याने छान सुरु करता येईल ... तिथे सगळं जग सुंदर असेल ... आणि मुख्य म्हणजे 'आजकालची मुलं'  असं म्हणत कोणी आमच्याकडे बोट दाखवणारं नसेल ..... 


*******

हा लेख मी बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळाच्या   " स न वि वि - गणेशोत्सव विशेषांक २०१० "   करता लिहिला होता.

Comments

  1. डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland