लग्न पहावं करून - २


       मुलीचं लग्न म्हणजे फारच कठीण. मुलाचं लग्न करायला काय लागतं ? '  असं आपलं एक लोकमत असतं.     मुलीच्या आई - वडिलांच्या बाजूने सगळं जग असतं, आणि मुलाच्या आईवडिलांवर - खरं म्हणजे आईवरच -  सगळे टपून बसलेले असतात - आता ही कुठे चुकते आणि हिला कसं पकडायचं .... 

        आणि खरंच, आपलं अज्ञान उघडं पडणं, ह्याच्याइतका दुसरा पचका नाही.   माझा अनेकदा झाला - माझ्याच पक्षाकडून. झालं असं की, लग्नाचा मुहूर्त करणे, सामान भरणे, अशा निमित्ताने नणंदा - भावजया - बहिणी - जावा असा बायकांचा 'अड्डा' असायचा आणि एकीकडे कामं करत, गप्पा - प्लॅन्स चालू असायचे. अशीच व्याहीभोजनाची चर्चा चालू होती.     'मेन्यू काय ? कितीजणं ? काय द्यायचं ? काहीतरी वेगळं करायचं - तेच तेच नको बाई ' वगैरे .         "त्यांच्याकडच्या प्रत्येक बाईला एक गिफ्ट-हॅम्पर दे गं      "आणि आपण पण खूप नटायचं गं ."  एक मत आणि एकमतही "       आयडिया, आपण बकुळ-हार करूया का ?"    असंही एक मत.  

        मला एका वेळेला एकाच गोष्टीचा विचार करता येतो. इथे तर ३-४ प्रश्नांवर, ३-४ ग्रुप्स,  ३-४ मतं मांडत होते.   मी विचारात पडले.   ५०-६० माणसं म्हटली व्याही-भोजनाला,  म्हणजे त्यातल्या अर्ध्यातरी बायका असणार,  म्हणजे २५-३० जणींना  बकुळीचे गजरे करायचे ... म्हणून मी म्हटलं, "आता बकुळीची झाडं कुठे शोधू मी इथे? आणि फुलं वेचणार कोण ?   ती ओवणार केंव्हा ...?"     त्यावर सगळ्या सुन्न.     बहीण म्हणाली, " वेडी का खुळी खरे बकुळीचे गजरे           मी सोन्याचा बकुळ-हार म्हणत्येय,  तो आपल्याला घालायला, खरी फुलं झाली असतील आता   'endangered' , ...  एवढी बंगलोरमध्ये राहून तू अशी गं कशी ... ? "

        माझा पडलेला चेहरा पाहून भावजय मदतीला धावून आली .  " अगं , तू चंद्रहार कर नं गं व्याहीभोजनाला..."    मी पुन्हा विचारात पडले.  मुलाचं लग्न म्हणून नवऱ्याला कितीही पिळता आलं तरी त्याला लिमिट आहेच नं .         चालू खर्च पहाता, अजून दागिने करायला कुठेतरी खटकत होतं . तो नवरा असला म्हणून काय झालं, त्याच्या जिवाचा नको का विचार करायला कधीतरी      म्हणून मी म्हटलं, " नको बाई, आता कसलाही दागिना करणार नाहीये मी स्वतःकरता ..."  तर सगळ्याजणी एकदम तुटून पडल्या, " अय्या, काय गं हे, चंद्रहार हा तुमच्याच तिकडचा पदार्थ असतो. तो कर म्हणतेय ती व्याही-भोजनाला .... एवढी बंगलोरमध्ये राहून तू ...."  .वगैरे वगैरे . 

        हे संपतंच आहे, तोपर्यंत सगळ्यात धाकटी बहीण पोहोचली. स्वैपाकपाणी, घरदार, स्वतःचं करीयर सांभाळून, पुष्परचना , स्टॉक-एक्सचेंज, पर्यावरण, संस्कृतीजपणूक वगैरे सतरा पिंपळांवर तिचा वावर असतो. जरा  'उनाड' पंथातली आहे .     आली  तीच मुळी जग जिंकल्याच्या आवेशात. " जय हो ... मी पिचोड्या घेऊन आलेय ... आजचा दिवस सार्थकी लागला !... "    सगळ्या जणींच्या चेहेऱ्यावर आदर-कम -कौतुक -कम-असूया असे 'थ्री-इन-वन ' भाव आणि मी पुन्हा विचारात !

        हे 'पिचोड्या' काय असावं ? भूसवड्या , चिकोड्या , मुगोड्या असा काही तळायचा पदार्थ, का खास इंदौरच्या 'कचौडी' सारखी काहीतरी भरलेली पुरी - बिरी किंवा मग जुन्या काळी 'चिरड्या ' का 'चुनड्या ' नामक छोट्या साड्या का ओढण्या मिळायच्या, तसं काही ... - आठवा ... ' तुज पगडी, मज चिरडी, आणखी शेला कोणाला ? ...' किंवा नको रे कृष्णा, रंग फेकू, चुनडी भीsजते ...' -         कोणीतरी ह्या शांततेचा भंग करायला हवाच होता, म्हणून मी जरा भीत-भीतच म्हटलं, " वा , छान, पण पिचोड्या म्हणजे काय असतं ?"  आणि पुन्हा एकच गिल्ला झाला,      " पिचोड्या म्हणजे काय माहीत नाही ?  अगं , एक तऱ्हेच्या बांगड्या     ...   कमालच आहे ...  एवढी बंगलोर मध्ये ..."  वगैरे  वगैरे  वगैरे .... 


Comments

  1. कित्ती गम्मत मला दागिन्यांची नावं माहीत करून घ्यायला खूप आवडते कित्ती वैविध्य आहे आप्लाय दागिन्या त

    ReplyDelete
  2. Wonderful!! Many thanks. - nvj

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland