पत्र लेखन
गेले कित्येक दिवस मी लिहित्येय. रोजच्या घडामोडींबद्दल जे मनात यायचं ते लिहिते. दरवेळी लिहायला बसले की वाटतं, आपण पत्रच लिहितोय ! चांगलं पत्र लिहिणं ही एक कला आहे. सगळ्यांना जमतेच असं ही नाही, आणि आवडतेच असंही नाही. खूप मोठे लोक , साहित्यिक , नेते , पत्रलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. शाळेत ११वी पर्यंत मराठीच्या पुस्तकात दरवर्षी एक पत्ररूपी धडा असायचाच. तो वाचला की, ' दुसऱ्यांची पत्रं वाचू नयेत ' हे एकदम पटायचं ! किती तो उपदेश ! ... सारखं हे करू नका , ते करू नका .... कॉलेजमधेही इंग्लिशच्या पुस्तकात पत्र ठेवलेलंच. त्याही पुढे जाऊन , इतिहास - भूगोल ही पत्रांतून वाचायचा म्हणजे काय ? छळ - पीळ काहीही म्हणा. खरंतर कॉलेजचे दिवस म्हणजे ' लिखे जो खत तुझे ' असे रम्य दिवस !!! एखादं रटाळ लेक्चर असलं की अर्धा वर्ग पेंगत असायचा आणि बाकीची मंडळी आपापले खास निरोप - आरोप वगैरे कामं उरकून घ्यायचे. वर्गाच्या ह्या टोका पासून ते पार त्या टोकापर्यंत चिठ्ठ्यांची जा - ये चालू असायची. त्यांचे ' सेफ ...