ऊन ऊन खिचडी ...
मद्रासचं महाराष्ट्र मंडळ. मी सासूबाईंबरोबर गेले होते. नवरा टूरवर. पहिल्यांदाच त्याला सोडून 'एकटी' राहिले होते. त्यामुळे मूड फार उत्तम नव्हता. वरवर सगळ्यांशी हसून - बोलून, पण मनातल्या मनांत वेगळंच चालू होतं, आणि कविता वाचनाचा कार्यक्रम सुरु झाला. एक छानशा बाई वाचत होत्या,
"ऊन ऊन खिचडी, साजूक तूप ...
वेगळं रहायचं भारीच सुख ...!"
खूप मस्त कविता ! ऐकतांना एकीकडे हसू येत होतं, तर दुसरीकडे त्यातलं पटतही होतं . शेवटही छान. पण काय बरोबर, काय चूक. दोन्ही बाजू बरोबर का दोन्हीही चूक ? ...एकूण गोंधळच ! जो अजूनही चालू आहे !...
अशीच वर्षामागून वर्ष गेली. प्रत्येकच पिढी ही sandwitch generation असते , आणि आपण फारच बिचारे , असं प्रत्येकालाच वाटत असतं .आमचं (-आणि प्रत्येकाचंच असतं -) एकच ध्येय असायचं .... आपल्या मुलांना गरम गरम खिचडी देता आली पाहिजे ! आपली गार झाली तरी चालेल ...
आणि मग वेळ आली मुलं मोठी होऊन उच्च शिक्षणासाठी घराबाहेर पडायची ! दोन्ही वेळा हा अनुभव मी घेतला. मुलं निघाली. हव्या त्या ठिकाणी, हवा तो विषय शिकायला मिळणार म्हणून ती आनंदात. आणि मी ही खूप समाधानात ! आपले कष्ट सार्थकी लागले, त्यांच्या परिश्रमाचं, अभ्यासाचं चीज झालं ! पण मग त्यांचा आनंद पहातांना आपलं मन खट्टू का होत होतं ? मुलंही जशी मुद्दाम बघत होती. "आलं का पाणी डोळ्यात ? शेवटी रडलीसच नां ?" मग मी ही हट्टाने डोळ्यातलं पाणी अडवून ठेवलं. नाहीच रडले. उलट म्हणत होते, " हुश्श, आता मी मला हवं ते करणार ! कशाची पिरपिर नाही मागे !" त्यावर मुलांनी एक गोष्ट रचली होती,
" एकदा एक चिमणी होती, तिला दोन पिल्लं होती. ती मोठी झाल्यावर एक दिवस चिमणीनं फर्रर्र... करून एक पंख हलवला, आणि एका पिल्लाला घरट्याबाहेर ढकलून दिलं. मग थोड्या वेळानी दुसरा पंख हलवला, फर्रर्र .... आणि दुसऱ्याला पण बाहेर ढकललं ! मग काय सगळी जागा तिलाच !...
ज्या दिवशी आम्ही फक्त दोघंच होतो तेंव्हा रात्री खिचडी खातांना डोळे भरून आले. नवऱ्यानी विचारलं, "काय झालं ग ?" "काही नाही रे, खिचडी खूप गरम आहे ना, तिची वाफ आली चष्म्याच्या काचेवर... " आणि हसत हसत चष्मा पुसला !
वर्षं जात होती. यथावकाश मुलांची लग्नं ठरली, आणि लग्नाची तयारी करतांनाच जाणवायला लागलं, "अरे, यांना वेगळं घर हवं बर का !" "कशाला ? आपलं घर पुरेसं मोठं आहे की !" "अरे, पण येणाऱ्या सुनेला नसेल का तिची हौस ? आपलं घर आपण सजवावं, असं प्रत्येकीलाच वाटत असणार ! ..." "ओहो , ऊन ऊन खिचडी का ?... "
तर अश्या तऱ्हेने दोन्ही सुनांनी आपापली घरं थाटली. त्यांचा उत्साह पहातांना खूप मजा वाटत होती. "अगदी राखुंडीच्या बाटलीपासून ते पांघरुणापर्यंत सगळं घर लावून देणं आपली जबाबदारी असते " हे आजीचं वाक्य मनात घुमत होतं, पण तसं करतांना सुनांच्या ideas पायदळी तुडवल्या तर जात नाही ना , असं ही मनात येत होतं - गेल्या ही असतील . कोण जाणे !... तर... त्या आपापल्या घरात ऊन ऊन खिचडी खाऊ लागल्या ! वर मुलं म्हणतात, " आम्ही नाहीच म्हणत होतो, पण तुम्हीच ढकललंत आम्हांला घराबाहेर ! तुम्हालाच वेगळं व्हायचं होतं ! "
मात्र आता मलाच कधी कधी खूप कंटाळा येतो. वय वाढतंय, तसं त्याच कामांना जास्त वेळ लागतोय. कधी कामं उरकेपर्यंत खिचडी गार होते, कधी मी तूप विसरते , कधी तब्येतीचे नखरे असतात, तर कधी मनात अनामिक काळज्यांचं तांडव ....
मग नवरा म्हणतो, "काय, जायचं का ?", त्यावर माझं उत्तर ठरलेलं, " नको रे बाबा, खिचडी गार झाली तर microwave करीन. नाहीतर swiggy वर मागवीन, पण , जमेल तितके दिवस मला आपली आपली खिचडी खाऊ दे .....
Comments
Post a Comment