कवच कुंडलं

    

    " अरे, स्वेटर नको का निदान windcheater तरी खूप गार आहे, ढगही आहेत ... "    दोन्ही मुलं शाळेत जायला निघाली होती ,  आणि माझी आई त्यांना म्हणत होती.    " काही सांगू नकोस  त्यांना.  काही नको असतं त्यांना.  कवच कुंडलं घेऊन आलेत बहुतेक !"   माझा वैताग लपला नाहीच.    वैताग मुलांच्या न ऐकण्याचा.  " बाहेर जाणाऱ्याला असं रागावू नाही.  तुम्हीही असंच करायच्यांत !..."    आई म्हणाली.     "पण तेंव्हा एवढी थंडी नसायची, आणि किती गोष्टी न्यायला लागायच्या आम्हाला ... पर्स, रेकॉर्ड, वह्या, dissection box .... आणि त्यात स्वेटर ?  जे तासाभरात अंगावरुन उतरवून गळ्यात नाहीतर मांडीवर घेऊन बसायचं, नाहीतर बॅगेत कोंबायचं ?" ...  आणि मग मला जाणवलं की मी मुलांचीच बाजू घेतेय  आणि आईचीही !     म्हणजे मी नेहेमीच चूक?     का नेहेमीच बरोबर? ...     आपण कोणत्या भूमिकेत आहोत त्यावर आपलं बोलणं, विचार अवलंबून असावेत.  पण इतके विरुध्द विचार ?    लंबकाच्या ह्या टोकापासून ते थेट दुसऱ्या टोकापर्यंत गेले,  पण सुवर्णमध्य किंवा असं म्हणा, perfect neutral  विचार, ही phase आली, नाही आली ?   कोण जाणे .... 

    नाही  हे वयावर किंवा स्वभावावर अवलंबून नाही .   लहानपणी किंवा तरुण वयात हट्टीपणा असतो, परिणामांची कल्पना नसते,  त्याची पोच नसते का कशाचीच चिंता नसते  चिंता नसते हेच खरं.  आणि कशाची जबाबदारी पण नसते .     नाही  घातलं स्वेटर,  तर काय होईल   ताप येईल, आई बाबा आहेत औषध द्यायला.  आपल्यासाठी कोणीतरी नक्की आहे ह्या विश्वासावर सगळं चालू असतं.     आपल्यावर आपलीही जबाबदारी नाहीये म्हटल्यावर  आनंद, उत्साह ओसंडून वहात असतो.   कोणत्याही कठीणातील कठीण प्रसंगातून सुखरूप बाहेर पडायला आई - वडीलरुपी  कवच कुंडलं असतात, मग थंडी - पावसाचं काय एवढं ?

    मग वय मोठं होत जातं.  आई वडीलांचं बोट सोडायला लागतं.  आपल्या पायांवर उभं रहायला लागतं, जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात.   बसमधून एकट्याने प्रवास करणं,  इथपासून तो sense of freedom येतो.    हळूहळू आपली power  - मग ती शक्तीची असो की पैशाची - वाढते. Spiderman म्हणतो तसं , " With great power,  come great responsibilities",  आणि मग चिंता    हळूहळू आई वडीलांच्या प्रेमाचं कवच जरा पातळ होतंय का,  अशी ही मनात धास्ती वाटू लागते.  कधी दूर असण्यामुळे, कधी वैचारिक - मानसिक आणि पिढीच्या अंतरामुळे.      आणि मग हळूहळू आपल्यालाही कोणालातरी सांभाळायचं आहे, कोणाची तरी काळजी घ्यायची आहे, कोणाची तरी कवच कुंडलं बनायचं आहे,  हे जाणवायला लागतं.  आपण कात टाकत असतो, आणि आपल्याला वाटतं की आपली कवच कुंडलं  जात आहेत ... ! 

    ह्या transition मधे काही जण ह्या बदलाला घाबरुन बसतात, आत्मविश्वास घालवून बसतात, तर कोणी पैसे, प्रतिष्ठा, कीर्ती, मानसन्मान ह्यांनाच  कवच कुंडलं समजतात  ह्यात चूक काहीच नाही  आणि  after all is said, and done,  बऱ्याच बाबतीत पैसा  कवच कुंडलं बनतोच

    चांगले, दिलदार मित्र - मैत्रिणी, भावंडं , नातेवाईक,  त्यांचं प्रेम आणि एकजूट; कोणीतरी आपल्यासाठी आहे, ही खात्री , हीच खरी कवच कुंडलं आपल्यावर माया करणारं ,   मनापासून आपलं भलं  चिंतणारं, आपलं माणूस आहे, तोपर्यंत कशाचीही भीती वाटत नाही,  थंडी - वारा - पाऊस लागत नाही ... 

    आईचं प्रेम होतं ,म्हणून पांडव कवच कुंडलांशिवाय ही जिंकले, आणि तेच केवळ आईने दूर सारल्यामुळे जन्मजात कवच कुंडलं असूनही कर्ण हरला...

  ...  म्हणूनच बहुतेक आई गेली हे जेंव्हा मला कळलं, तेंव्हा  खूप भीती वाटली.... आणि एकदम खूप थंडी भरून आली .... 

       तिला जाऊन आज २४ वर्षं झाली .....


Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland