सिंड्रेला


    "  ठण,  ठण, ... बाराचे ठोके पडले आणि सिंड्रेला धावत घरी परत जायला निघाली.  घरी पोहोचताच तिच्या रथाचा भोपळा झाला, घोडे उंदीर होऊन गेले, नवीन सुंदर कपडे जाऊन पुन्हा परत जुने कपडे आले ..."  गोष्ट संपायच्या आत मुलांना झोप लागते अन पुढे काय झालं ते राहून जातं. 

    ... आणि  'सिंड्रेला' आपल्या कामाला लागते.        ... Idea बरी आहे, उद्या भोपळ्याचीच भाजी करून टाकते ... उंदरांवरून बरी आठवण झाली, उद्या ऑफिसातून येतांना ... गाऊनही उसवलाय हा, दोन टाके तरी घालायला हवेत ... रात्री कामं आटपता - आटपता सिंड्रेला विचार करत असते ... 

    काळ - वेळ - देश - भाषा  सर्व काही बदललं, तरी सिंड्रेलाची गोष्ट बदलत नाही.  ती घरची कामं करून रात्री राजपुत्राबरोबर मिरवून येते दिमाखात, ते झालं की, धावत - पळत घरी येऊन उद्याची तयारी करायला लागते. घड्याळाचे ठोके तर चुकतच नाहीत तिच्या मागचे ! 

    सिंड्रेलाची गोष्ट ही परीकथा नाहीये.   ही जगातल्या - मग ती कुठल्याही देशातली असो, कुठल्याही धर्माची असो, कोणत्याही परिस्थितली असो, कोणत्याही स्तरातली असो -  बाईची गोष्ट  आहे.   खरंच, प्रत्येक बाई ही सिंड्रेलाच आहे.  ती घरातल्या लोकांसाठी राबत असते - प्रेमानेच - पण राबतच असते.  आपल्या कपड्यांची, दिसण्याची, कशाचीही  चिंता न करता, ती भराभर कामं उरकते, आणि कधी पोटासाठी तर कधी आपल्या सुंदर स्वप्नांसाठी ऑफिसात कामाला पण जाते.  घड्याळात ठोके पडत असतात, आणि फाईली नाहीतर पर्स, किल्ल्या, घड्याळ घालत घालत ती घाईघाईने निघते. 

    दिवसभर कामं  करते, कोणतं का असेना.   ते करता करता मनाच्या कोपऱ्यात आजचा - उद्याचा - परवाचा विचार करत असते.  संध्याकाळी सातचे ठोके पडायच्या आत घरी पोहोचावं म्हणून पळत असते.  रात्री ह्यांच्या बरोबर त्या अमक्या - तमक्याच्या send - off  पार्टीला जायचंय ... गेलंच पाहिजे का ? ... खरं म्हणजे उद्यापर्यंत हे काम  संपवायलाच हवं ... मुलांच्या युनिफॉर्मचंही बघायला हवं ... आज ते करता आलं असतं तर ... पण ... सिंड्रेलाच्या राजपुत्राला ह्या गोष्टींची वार्ताही नसते.  बऱ्याचदा ऐकून, जाणून, समजून घ्यायची इच्छाही नसते.  "तू चल, आली नाहीस तर बरं दिसणार नाही ... अशी सारखी दमलेली, कंटाळलेली दिसू नकोस ... जरा हसरा चेहरा नाही का ठेवता येत तुला ? ... काय झालंय तुला आज काल ...इतर जणी बघ ..."

    "त्यांना काय कामं असतात ?  घरी स्वैपाकीण ... मुलांना पहायला नकोच त्यांना ... दिवसभर बसून भरतकाम केलं , मी दमणूक होणार त्यांची ... आमच्यासारखी फरफट नसते ... नोकऱ्या करा, बिलं भरा, पोरांचे अभ्यास घ्या ... वर जेवणात रोज काहीतरी स्पेशल करा ... "        सिंड्रेलाचा कधी कधी तोल जातोच.  शब्दानी शब्द वाढतो.  रात्रीच्या पार्टीत एकमेकांशी  सोडून, दोघेही इतर सर्वांशी गोड - गोड,  छान - छान बोलतात.   उद्या लवकर उठायला पाहिजे ह्या भीतीने सिंड्रेला घड्याळावर एक डोळा ठेवून असते, आणि संधी मिळाली की घरी पळून येते......

    ज्यानी कोणी ही गोष्ट लिहिली, तो लेखक किती बारकाईनी बघणारा असेल.   बहुतेक  लेखिकाच असली पाहिजे.  नाहीतर इतकं खरं खुरं कोण लिहितंय अनुभवाशिवाय ?

    कालातीत अशी गोष्ट. पण इतकी वर्षानुवर्ष लोटल्यावरही गोष्टच राहिलीय.  आणि ती ही मुलांची.  तिच्यावर विचार करावासा वाटला नाही कोणाला ?  गोष्ट ऐकता ऐकता मुलं मोठी झाली. पण आपली आई, बहीण, बायको, वहिनी, मुलगी ह्या   सिंड्रेलाच आहेत हे त्यांना कळलंच नाही ?  का कळलं, पण वळलं नाही ?  गोष्ट मुलींनीही ऐकली. पण आपणच सिंड्रेला आहोत हे जाणवलं नाही ?  आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलींच्या साठी कोणी काहीच  बदललं नाही ?  कडू औषध मधातून खाल्लं की चव न कळता, औषध पोटात जातं, आणि आपलं काम करतं.   तसंच ह्या गोष्टीचं.  त्यातला राजेशाही थाट, परी, जादू आणि नाजूक काचेचा बूट हा झाला मध.  पण औषध कुठल्याकुठेच राहून गेलं.  नेहेमीचं औषध पोटात गेलं की गुण येतोच - कळत नकळत - कसंही खा.  पण ह्या गोष्टीचं तसं होत नाही - झालं नाही.  सिंड्रेलाचे कष्ट कोणाला दिसलेच नाहीत !

    आजकाल कितीजण आपल्या बायकांना घरकामात मदत करतात ?  अगदी  modern - नवीन विचारांचे ही किती जण बायकोचा विचार करतात ?  "आम्ही कामाहून घरी दमून येतो, एक चहाचा कप कोणी हातात द्यावा, असं वाटलं तर बिघडलं कुठे ? ... जरा पेपर वाचला तर काय जातं तुमचं ? ... गरम भात आणि ताजी पोळी करून वाढायला काय होतं ? ..."      होत काहीच नाही.  बायका हे सगळं करतातच.  पण नवरे हे विसरतात की बायकोही तेंव्हाच घरी आलेली असते.  तिलाही गरम चहा, पेपर, ताजी पोळी सगळं आवडतं.     नवऱ्याने एखाद्या दिवशी हे सगळं  तिच्याकरता केलं तर  काय बिघडेल  त्याचं ?

    आजकाल बायका नोकरी करतात.  त्या सर्वच काही हौस म्हणून करत नसतात.  चांगलं रहाता यावं, घरात सगळ्या सुख-सोयी असाव्यात, चार पैसे वाचावेत आणि मुख्य म्हणजे 'आपल्याला' नाही तर नाही, मुलांना सगळं चांगलं मिळावं हा ध्यास असतो.  नवऱ्याच्या पैशात सगळ्या essential गोष्टी झाल्या की मग बायकोच्या पैशात थोडीफार luxury मिळते, चैन होते,हौस  होते. बायकोने नोकरी करायचा निर्णय दोघांचा असतो. तिचा पगार आवडतो, मग थोडी मदत करायला लागली,  तर हात का आखडतो ?

    ज्या नोकरी करत नाहीत, त्यांची परिस्थिती तर आणखीनच बिकट असते. तिने नोकरी करायची नाही,  हा ही  निर्णय दोघांचा असतो.  पण एकदा का तिचं नोकरी मिळायचं वय गेलं की मग, "दिवसभर झोपाच तर काढता घरी बसून ... कंटाळा यायला काय झालंय ?"... हे सुरु होतं.  बोलणारा विसरतो की कोणे एके काळी आपणच हिला म्हणालो होतो की  "मला नाही आवडत बायकांनी नोकऱ्या केलेल्या ... तुला माहित नाही ... जग फार वाईट असतं ... तुझ्यासारख्या भोळ्याभाबड्या मुलीचं  आयुष्य नकोसं करून टाकतात ... आपण आपल्या मुलांना छान मोठं करायचं ... नीट वळण लावायचं ... ".      तो हे विसरतो की दिवसभर झोपा काढणारी बाई घर-दार संभाळते, तासचे तास   लांब लाईनींमध्ये उभी असते, जाता जाता शाळेच्या प्रिन्सिपॉलशी चार हात करून येते, पाहुण्यांची वेळी-अवेळी सरबराई करते, पाठवणी करते,  आणि  आपण मिळवत्या नाही ह्या टोचणीने इतर बायकांपेक्षा काटकसरीने राहून त्यांच्यापेक्षा जास्त पैसे साठवते !  गोष्टीतल्या सिंड्रेलाच्या मागे ह्या कटकटी तरी नव्हत्या. 

  आजकाल मुली ही उत्तम शिकतात . त्यांनी आपल्या आवडीचं शिक्षण घेऊन आपल्या  आवडीचं काम का करू नाही ?  जुन्या पुराण्या साच्यात का स्वतःला कोंबायचं ? तिलाही पंख का नसावेत मनसोक्त भरारी घ्यायला ?...

...तर , एखाद्या मोठ्या कंपनीची CEO ही जितकी सिंड्रेला असते, तितकीच तिच्या घरातली स्वैपाकीण आणि मोलकरीणही.  ध्येय तेच, स्वप्नं तीच, तीच मानसिक ओढाताण, कष्ट.  फरक एवढाच की starting point वेगळा. त्याच चिंता, त्यात प्रेमाचा भाग असेल, थोडाफार आपणच कौतुक करून लाडावून ठेवण्याचा प्रकार असेल, पण मन तेच !

   गोष्टीतली सिंड्रेला घरातल्या सर्वांवर प्रेम करते.  खरी खरी सिंड्रेलाही करते.  नवरा, मुलं, नातेवाईक, मित्रमंडळी सर्वजण तिचे आपलेच असतात.  सगळ्यांसाठी ती सगळं करते.  तिच्यावरही सगळे प्रेम करतात हे तिला ही  माहित असतं, फक्त तिची अपेक्षा असते की कोणीतरी तसं म्हणावं.  ती करते त्याची दखल घ्यावी.  अगदी रोज नको, पण अधून - मधून  बोलून दाखवावं. रोजच्या कामाबद्दल ती आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची अपेक्षा करत नसते. पण सणासुदीला, काही मोठ्या समारंभानंतर किंवा आजारपणासारख्या कठीण प्रसंगातून सही-सलामत सर्वांना संभाळून आणल्यावर तरी कोणीतरी म्हणावं की  "केलं बरं आमच्या सिंड्रेलानी, नाहीतर काही शक्य नव्हतं ..." एवढं जरी कोणी म्हटलं की ती भरून पावते आणि दुप्पट उत्साहाने पदर खोचून कामाला लागते !

    गोष्टीतल्या सिंड्रेलासारखा आजच्या सिंड्रेलाचा छळ होत नाही  घरी. पण कधी कधी होतही असतो.  रोज वर्तमानपत्रात  'हुंड्यापायी जाळली',  'मुलीच झाल्या म्हणून हाकलून दिलं',  'मूल होत नव्हतं म्हणून सवत आणली',  'भाजीत मीठ कमी झालं म्हणून मारहाण केली' अश्या बातम्या असतात.  आर्थिक द्रुष्ट्या मागास वर्गात हे जास्त असतं आणि - कबूल करा किंवा नका करू - अती श्रीमंतांकडेही असतं.  मध्यमवर्गीय सिंड्रेलाला फारतर सासूकडून हार - तुरे - गुच्छ मिळत असतात - कधी कधी शालजोडीतले - पण तेही आता बदलतं आहे. 

  ह्याच परी कथेतल्या , सिंड्रेलाच्या बहिणींसारख्या काही जणी असतीलही . अशाना आपण काय सांगणार ? ते प्रत्येकीने स्वतःला तपासून पहावं , मनाच्या आरशात अधून मधून डोकवावं . आरसा खोटं बोलत नाही ! मनाचा आरसा तर कधीच नाही !!!!

     असो ,  पण जग बदलतंय . हळूहळू का होईना !!!घरच्या कामात बायकोला मदत करणारे नवरे आजकाल दिसतात.  आई दमून येईल म्हणून तिच्याकरता चहा करून ठेवणारी  मुलंमुलीही पुष्कळ असतात.  मनसोक्त छोले भटुरे खाऊन खूष झाल्यावर एका पिटुकल्या मुलाने 'Best Mother in the World' असं certificate आईच्या उशीखाली लपवून ठेवलेलं मी पाहिलं आहे.  बायको लांबचा प्रवास करून आल्यावर तिच्यासाठी इडली-सांबार करून ठेवणाऱ्या एका माणसाला मी चांगली(च) ओळखते.  पण सगळ्या सिंड्रेला काही एवढ्या नशीबवान नसतात. 

    आता हे बदललं पाहिजे. केंव्हातरी कुठेतरी हे केलं पाहिजे.  सिंड्रेलाच्या मागची कामं आणि multiple roles काही संपणार नाहीत.  जसा काळ बदलेल तसे तिला अनेक roles करावेच लागतील.  Super Woman व्हावं लागेल. पण ती कुठे तक्रार करत्येय त्याबद्दल ?  तिच्या माणसांसाठी कितीही कष्ट करायला ती तयारच असते.  कदाचित काही जणींना नसेल मदतीची - गोड शब्दांची अपेक्षा, पण म्हणून आपण काहीच करायचं नाही का ?

    गोष्टीतली सिंड्रेला राहू द्या गोष्टीत.  खऱ्या खुऱ्या सिंड्रेलाची कदर करा.  प्रेम आहेच, ते दाखवा की सुखाचा पाऊस पडेल, प्रेमाचं चांदणं पडेल, आयुष्य परीकथेसारखं होईल ...सर्वांचंच !

    मग एखाद्या दिवशी  सिंड्रेला कसाटा आईस्क्रीम घेऊन येईल ... पटपट आपल्या खजिन्यातून छान-छान रेसिपीज काढेल ... surprise party ..छान कपडे ... सुंदर हसरा चेहरा ... सर्व काही असेल ... घरातल्या आनंदी वातावरणात,  घड्याळाचे ठोके कधी पडून गेले , तेही कळणार नाही !!!... 




*******

हा लेख मी बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळाच्या   " स न वि वि - गणेशोत्सव विशेषांक १९९९ "   करता लिहिला होता.

Comments

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland