आठवणी
.... आठवणी कशा बनतात ?... आठवणी कशानी बनतात ?... आठवणी कधी - केंव्हा बनतात ?... मला खूप प्रश्न असतात. स्वप्नं पडावी तसे. त्यातले काही मी स्वप्नांसारखे विसरूनही जाते. काही मात्र 'पिच्छा' सोडत . आठवणींबद्दल 'मृत्युंजय' मधे म्हटलंय की ' त्या मोरपिसांसारख्या वगैरे अजिबात नसतात. त्या हत्तींच्या पावलांच्या ठशांसारख्या असतात, ... खोल आणि ठसठशीत ! ' निदान स्पेशल आठवणी तरी तशाच असतात !
लहानपणी माझा एक बाहुला होता. मातीचा . आणि रंगीत होता. मला एखाद्या वाढदिवसाला मिळाला असावा. तो माझा फारच आवडता होता. निळी पॅन्ट , पिवळा शर्ट आणि लाल टोपी. साच्यातून काढलेल्या खेळण्यांपैकी एक. गुडघ्यांवर कोपरं टेकून हातावर हनुवटी ठेवून बसलेला. त्याचं नाव लुच्चू ! हे नाव मी का ठेवलं असावं कोण जाणे. पण माझा फार लाडका ! मी त्याला कडेवर घेऊनच सगळीकडे हिंडायची. एकदाही तो हातातून पाडला नाही मी ! बाकी सगळ्या बाहुल्या एकीकडे आणि हा एकीकडे ! आम्ही खूप गावं बदलली, पण त्याला मी आजोळीच ठेवलं होतं, तो हरवू नाही म्हणून, त्याला हलवा - हलवीत काही होऊ नये म्हणून. आणि अगदी खरं म्हणजे आईवडिलांनी टाकून देऊ नये म्हणून ! ( केवढा अगाध विश्वास ! ! ! )
अर्थातच तो तिथेच राहिला. Safe . शाळा कॉलेजांत असतांना मी त्याला रोज बघायची, कपाटावर बसलेला. काहीतरी खूप आश्वासन देणारा, कधीही पाहिलं तरी नेहेमी माझ्याकडे बघून हसणारा ! आजीच्या नंतर तो आईबरोबर माहेरी आला. मी तिथे गेले की मी त्याला हळूच पहायची, "लुच्चू , कसा रे तू अजून हसरा ! ..."
बराच काळ उलटला, तो होताच ! आई वडील गेल्यावर, त्यांचं घर आवरायचं काम ... नकोसं काम. प्रत्येक वस्तू उचलतांना डोळे पाझरत होते. व्यवहारी मन ठामपणे वर्गवारी करत होतं. हे नको, ते नको, हे ठेवूया, हे असू दे ... पण लुच्चू कुठे सापडलाच नाही. कुठे गेला कुणास ठाऊक ? आईवडिलांबरोबर तो पण गेला कुठेतरी, माझं लहानपण घेऊन !...मग मी त्याला उचलून ठेवून दिलं माझ्या मनाच्या कप्प्यात, एका स्पेशल कप्प्यात. तो आता तिथेच आहे ... safe ...!
स्वतःचं घर बांधल्यावर तिथे रहायला जाणं म्हणजे जरा सामान edit करणं, जुनं काढून टाकणं, वर्षानुवर्ष माळ्यावर पडून असलेल्या बॅगा काढणं आलंच. अशीच एक बॅग उघडली आणि आठवणींचा गठ्ठाच हाती आला. बोचकंच म्हणा, जुनं शाळेत विणलेलं स्वेटर, एक शाईचं पेन, पहीलं घड्याळ ... त्याचे काटे हलत नाहीत , तरीही जपलेलं ... आणि एक शाळेतली छोटी डायरी. बाईंनी करायला सांगितलेली ! त्यात छान छान वाक्यं लिहून ठेवायची ... उद्देश फक्त मराठीच्या निबंधात घालायला उपयोगी ! त्या डायरीतून काय काय गोष्टी बाहेर पडल्या, उड्या मारत ! एक लक्ष्मीचा फोटो, एक मण्यांच्या डिझाइनचं चित्र, एक वर्तमान पात्रातलं cutting, एक जुनं press करून ठेवलेलं पान, त्याच्यावर सोनेरी रंग, कोणी दिलं आठवत नाही ,पण खूप आवडलं म्हणून ठेऊन दिलेलं! ते पान उचललं हळूच, पण इतकं जीर्ण झालं की उचलतांना त्याचे तुकडे पडले - भुगाच झाला ... जास्त वाईट वाटून न घेता , सरळ उचलून मनाच्या कप्प्यात ठेऊन दिलं , आणि कचरा झाडून टाकला ... !
आणि नुकतीच घडलेली गोष्ट ... पाहुणे येणार म्हणून जरा स्वच्छता करूया असा विचार केला. एकदा का ते आवरायचं भूत मनात शिरलं की मग अजिबात सोडतच नाही. सुरुवात केली मुलांच्या खोलीपासून. कपाटातला सगळ्यात वरचा कप्पा ... तिथे एक मोठा जड डबा . काय आहे म्हणून खाली काढला तर त्यात रंगीबेरंगी दगड, लहान मोठे, वेगवेगळ्या रंगांचे ! मला मुलांची सक्त ताकीद आहे, की त्यांच्या खोलीतलं काहीही टाकायचं नाही. आणि ते दोघे आळीपाळीने लक्ष ठेवून असतात. वस्तूंची जरा जागा जरी बदलली तरी विचारतात 'का ?' म्हणून. मी त्यांचं काही फेकलं नाहीच, फेकणारही नाही, पण मला माझ्या लहानपणची एक गोष्ट आठवली....
११ वीत शाळा सोडतांना माझ्या एका मैत्रिणीने मला एक खूप सुंदर , चमचमणारा दगड दिला होता त्याला सुंदर जांभळी झांक होती. कुठे असेल बरं ? खूप आठवायचा प्रयत्न केला ... मी मुलांना दिला होता तो. ह्याच पसाऱ्यात असेल तो, कारण ती माझीच मुलं ! काही फेकणार नाहीतच. पण आत्ता मला तो सापडत नाहीये ... आणि इतक्यात त्याला मनाच्या कप्प्यात कायमचं ठेऊन द्यायला , मन तयार होत नाहीये !
...त्रिखंड हिंडुनी धुंडीतसे, न परी हरवले ते गवसे...
Comments
Post a Comment