... ही वाट दूर जाते ... ३


    ट्रिपचा शेवटचा दिवस . सकाळी उठल्यापासून ढग आणि रिमझिम पाऊस.   खोलीतून ब्रेकफास्टला आलो आणि भल्या मोठ्या टेबलावर आधीचे दोन दिवस पुरून उरलेले पदार्थच  पदार्थ.   अगदी चकल्या, कडबोळी, चार - पाच प्रकारचे चिवडे - साबुदाण्याचे दोन आणि उरलेले पोह्याचे अन cornflakes चे  अशी पाकिटे,  शिवाय गुलकंद घातलेले लाडू,  केक, भडंग, सांबार वड्या, बाखर वड्या, चिरोटे, cheese,  खरे दाणे आणि कळस म्हणजे अनारसे ... !!   "अरे काय दिवाळीचा फराळ का काय रे ? "...  "छे रे, अधिक महिन्याचे अनारसे आहेत !..".  "इथे कोणाचे जावई रे आपण ?..". "अहो , आपण काल आणि परवा हे नव्हतो का खात ? "..."हो ,पण एकदम सगळं पाहून ....!!" ऐकण्यासारख्या गप्पा !!...शिवाय चहाची ready-mix पाकिटं  !   आणि ह्या सगळ्याची वाटावाटी !   Return gift नको का सगळ्यांना आपल्या जम्बो पार्टीची !   "ऐका रे सगळे, पुढच्या वेळी एवढं आणायचं नाही खायचं ... गाडीला ओझं ..." "मागच्या वेळी आपण असंच म्हटलं होतं ना ... !"

    मग पोहे - उपमा आणि काय हवं ते खात ब्रेकफास्ट झाला आणि मग ट्रिपचे कर्ते-करविते हिशोबाला बसले !   तासभर बराच खटाटोप करून एकदाचा हिशोब जमला !   तोपर्यंत बाकीची मंडळी गप्पा टाकत निवांत !   हिशोब झाल्यावर अजितने जाऊन बागेतून गुलाबाची नि जास्वंदीची फुलं आणली !   बिनधास्त !   आणि मग हिशोब करणाऱ्यांचा फुलं देऊन सत्कार !   त्यांनी ती फुलं लगेच आपापल्या सहचरींना देऊन तो ही सत्कार उरकून घेतला.   आणि मग बऱ्याच फोटोंनंतर टेम्पो निघाली,  धबधबे पहायला !... रिमझिम पाऊस पडे सारखा ... म्हणतोय, तोवर नभ मेघांनी आक्रमिले होतेच !...

    एक 'ऐकीव' गावातला 'एकीव' धबधबा ... आहे,  इथे जवळच आहे ... करत निघालो ... जाईन विचारीत रानफुला ... दिसेल त्यांना विचारत जात होतो ... इकडे - तिकडे करता करता,  एकीव धबधबा सापडला !   मग तो रस्त्यावरूनच पाहिला, रस्त्यावरूनच फोटो काढले, कारण तिथला पोलीस वर जाऊ देईना ... म्हणे काही दिवसांपूर्वी एकाचा मर्डर करून वरून बॉडी टाकून दिली होती ... तिथे रस्त्यावरच मिनी चौपाटी होती ... चहा, भाजलेली कणसं ..." खाऊया का ... नको बाई ... फारच महाग .".. असं म्हणत पोलिसदादांनी सांगितलेल्या आशियातल्या सर्वात मोठ्या धबधब्याकडे गाडी वळवली ! 

    .. आणि ... धमाल सुरु झाली !   नभ उतरू आलं ... ह्या गाण्यातल्या ताना आलापांसारखा वळणा वळणाचा रस्ता आणि ढगांमधून निघालेला टेम्पो ... .. रस्ता पुढे जातोय आणि आम्हीही पुढे जातोय ... वज्राई धबधबा !   आशियातील सर्वात सुंदर, मोठ्ठा, टप्प्या टप्प्यांचा धबधबा ..." ऑ ... आणि कोणी कधी ह्याबद्दल ऐकलं वाचलं कसं नाही ?   असू दे ... जाऊन तर पाहू" ... करत सर्व तयार !   तिथे पोहोचेपर्यंत दोन  वाजतील ., त्यापुढे धबधबा पाहून यायला एक दीड तास सहज लागेल आणि जेवायला उशीर होईल ...म्हणून डबे उघडू लागले अन दिवाळीच्या फराळाला वाट मिळाली !   "बरं झालं बाई ... आपल्याकडे आहे हे सगळं ... आता जेवायला उशीर झाला तरी हरकत नाही !  वाटेत लाडू संपले, चिवडे संपले, चकल्या, कडबोळी, केक, अनारसे, चिरोटे ... एकेक पिशव्या रिकाम्या होत होत्या.  सगळ्या खाऊचा चट्टामट्टा  !

    पाऊस जोरदार सुरु झाला होता ... नको नको रे पावसा असा धिंगाणा ... असं म्हणत पोहोचलो.   काही उत्साही मंडळी निघाली छत्र्या वगैरे घेऊन धबधबा पहायला.   तिथल्या तिकीट गेटपासून एक दीड किलोमीटर चालत, मग दीड दोनशे पायऱ्या उतरायच्या ... आणि मग तो ३ टप्प्यांचा धबधबा दिसणार !   नको रे बाबा !  पाऊस होताच.  पंढरपूरला जाऊन कळसाचं दर्शन घेतलं की देवाला पाहिल्याचं पुण्य मिळतं.   आम्ही काही जणांनी तेच श्रेयस्कर मानलं.  बाजूच्या एका छोट्या पठारावरून धबधब्याचा वरचा भाग दिसला, तोच पावला म्हणून गाडीत बसलो.   ड्रायव्हरने विचार केला की टेम्पो वळवून ठेवावा, म्हणजे बाकी मंडळी परत आल्यावर लगेच निघता येईल.   म्हणून त्या छोट्या पठारावर घातली गाडी.  तिथे दोन चार गाड्या होत्या, त्यांच्या बाजूनी वळवून घेऊ म्हणून पुढे घातली अन ... गाडीची मागची दोन्ही चाकं hubcap पर्यंत चिखलात रुतली ... !

    मग ड्रायव्हरची झटापट सुरु.   फांद्या आण, दगड आण, गाडी काही हलेना.   भारती, विवेक आणि मी ही दगड आणायला लागलो.   खूप प्रयत्न करतोय, पण गाडी तिथल्यातिथे आणखीनच  रुतत चालली होती.   मग जवळपासची ४ - ५ मुलं आली, ढकलताहेत ... गाडी तिथेच.   थोडा वेळ प्रयत्न करून ते निघून गेले.   थोड्या वेळानी २० - २५ जण आले !   "सगळे उतरा खाली, हलकी झाली की ढकलायला सोपी होईल अन निघेल" ... आम्ही खाली ... आणि पाऊस जोरात ... गाडी तिथेच ... मग ती मुलं म्हणे आता सगळे गाडीत मागे बसा,  मागे जड झाली की चाकाला ग्रिप मिळेल अन गाडी निघेल, पुन्हा ढकलली ... मग अजून एक प्रयत्न ...आम्ही पुन्हा बाहेर... तरी गाडी जिथल्या तिथेच . ... आणि धबधब्याला गेलेली मंडळी तिकडेच ... ती मुलंही हळूहळू पांगली .   सगळी मुलं अनोळखी, अन हसतमुख, चिखलात पडत, मस्ती करत त्यांचं गाडी ढकलणं चालू होतं !  खरंच, अडचणीच्या वेळी अनोळखी माणसंही किती मदत करतात ... ह्या का मागच्या जन्मीचं पुण्यच हे !

    चार वाजून गेले ... ड्रायव्हर घामाघूम ... पाऊस सुरूच ... सगळ्या मंडळींचा एक एक खांदा ओला चिंब ... सतीशनी पाठवलेल्या जोक सारखा !   पाऊस मी म्हणतोय ... meghmeet जोरदार चालली होती.   पुण्यामुंबईची मंडळी आधीच वेगळ्या रस्त्याने घराकडे निघाली होती ... 

    हळूहळू तिथल्या बाकीच्या गाड्या निघून गेल्या.   आमची गाडी solid बसलेली.  इंजिन raise केले तर आधी टायर मधून वाफ आणि नंतर धूर नि रबर जळल्याचा वास ... त्यातच मदतनिसांपैकी एकजण म्हणाला फर्स्ट अन रिव्हर्स मधे गाडी इतकी raise करून clutch प्लेट खराब झाल्यात ... हरे राम !    हळूहळू अंधार पडायला लागला, आणि जरा काळजी वाटायला लागली ... काहीतरी करायला पाहिजे, पण काय ... कुठे  दिवा नव्हता अन 'गगनी एक ही न तारा' ... कारण अमावस्या आणि ढग-पाऊस !   धबधबेवाले ही परत आले !   

    फोनला range नाही, बॅटरीचा charge पण खाली जाऊ लागलेला ... मधूनच एक दोन फोनना एखाद मिनिट range यायची ... पण तोपर्यंत सतीश,अजित,गजा आणि मिलिंद कधीच कामाला लागले होते ... सातारच्या मित्रांना फोन करून दुसरा टेम्पो पाठवायला सांगितला.   श्रीकांतला पुण्याला  कळवल्याबरोबर त्याने सातारच्या पोलिसांना फोन करून आमचा टेम्पो ओढून काढायला मोठ्या क्रेनची व्यवस्था केली.   काय contacts आहेत ह्यांचे ! 

तिकडे विनू - प्रमोद काळजीत असणार  ... हे लोक कुठे गडप झाले म्हणून, कारण कोणाचाच फोन लागत नव्हता. 

    नाहीच काही जमलं तर तिथल्या देवळात सगळ्यांची रात्री जेवायची आणि झोपायची व्यवस्था करायला दोघे तिकडे गेले ... काय काय करत होते !   कमाल आहे ह्यांची !   जीवाला जीव देणारे मित्र जोडले आहेत ... जसं अन्नदान हे सर्व दानांत श्रेष्ठ, तशी ही मित्रसंपदा सगळ्या संपदांमधे श्रेष्ठ ... देवा, मी खरंच श्रीमंत आहे, कारण मला हे सगळे मित्र आहेत ... !!!

    तर हे चालू असतांना, आम्ही टेम्पोतल्या मंडळींनी  'शुभं करोति'  पासून सगळा 'परवचा'  म्हंटला आणि खूप धीर आला.   'कुणा मुळी बाधा नव्हती, अशा साहसाची ...'   आता चांगलाच काळोख पडला होता.   आठ वाजून गेले होते ... ........ तेवढ्यातहे चौघे जण आले !   त्यांच्याबरोबर त्या खेड्यातला माणूस, कानटोप वगैरे घालून !  हसतमुख,  हातात मोठी किटली आणि पेपरकप्स !  जसा काही देवदूतच ! त्यांनी सगळ्यांना गरम गरम चहा दिला  आणि चहाचं 'अमृततुल्य' हे नाव सिध्द झालं !   त्या गृहस्थाला शतशः धन्यवाद !   आणि हे arrange करण्याचं ज्या मित्रांना सुचलं त्यांना पण !   हवं ते , योग्य वेळेला मिळणं, हे भाग्य नाहीतर काय ?

    आणि त्यानंतर दहा मिनिटातच रस्त्यावर उजेड दिसला !   आम्हाला घरी न्यायला दुसरा टेम्पो आला !   सगळे सहीसलामत आपापल्या सामानासकट नवीन टेम्पोत बसले !    पहिल्या टेम्पोच्या ड्रायव्हर जवळ क्रेनचे पैसे देऊन गाववाल्याला क्रेन वेळेत आली नाही तर ड्रायव्हरच्या जेवण झोपण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगून,  आमचा परतीचा प्रवास सुरु झाला !  थोडे पुढे येतो तर समोरून क्रेनचे दिवे दिसले, मग त्याला थांबवून टेम्पो कुठे अडकला असे सांगून आम्ही पुढे निघालो !   सगळे जण हसत ... मजेत !   एकजूट असली की कसं असतं ह्याचं हे उदाहरण !   कुणीही घाबरलेलं, बावचळलेलं, मलूल असं काहीही नव्हतं ... ! 

     साताऱ्याला हायवे वरच्या एका हॉटेलात जेवून, अकरा साडेअकरा वाजता सांगलीकडे निघालो आणि सगळी  मंडळी टेन्शनफ्री होऊन झोपली, ती आष्टा पार केल्यावरच जागी झाली !    रात्री दोन वाजता , आपापल्या घरी जाऊन पुढची झोप !   

    अशी झाली आपली  मेघmeet ! ... thrilling ...पाऊस, पाणी, चिखल, ढग, धुकं ... सगळं अनुभवत, enjoy करत !!!   घरी जाता जाता सगळे एकमेकांना सांगत होते ... चला, मजा आली रे ... बघा मग ... पुढच्या ट्रीपचं ... गुहागर, का गोवा, का आणखीन कुठे ... हो हो ... उद्याच शोधायला लागतो ... एक पायलट ट्रिप करूच या ... !!! धन्य आहे उत्साहाची !! 

    मी ?...   मी तर.. 'कोई ना रोको दिलकी उडान को ... दिल वो चला ... आज फार जीनेकी  तमन्ना है ... !!!.....





Comments

  1. ये दिल मांगे मोअर ! ......

    ReplyDelete
  2. Mast 👌 Alka Tai

    ReplyDelete
  3. अलका मस्त जमलंय लिखाण. चणे कुरमुरे अतिशय खमंग !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland