पाटीपूजन
माझ्या - आपल्या लहानपणी एक खूप छान प्रथा होती. खंडेनवमी - आयुधपूजेच्या दिवशी आपल्या शाळेत पाटीपूजन असायचं ! दोन तीन दिवस आधी वर्गात 'सूचना' यायची ! की लगेच त्याचे वारे वाहायला लागायचे . हे सर्व चौथीपर्यंत लहानशा शाळेत ! एकदा दसऱ्याच्या आधी आणि मग गुढीपाडव्याला ! दोन पर्वण्या असायच्या ! आदल्या दिवशी शाळेतून घरी जाता जाता सगळं ठरायचं ... सांघिक पाटी धुणं ! कोणी कोणी कुणाच्या घरी जायचं, काय काय बरोबर घेऊन यायचं वगैरे ...
"आज पाटी धुणार आहे" , म्हटलं की आईचं सुरु व्हायचं ... "मागच्या दारी ... पायरीवर ... घरात नाही ... सगळ्यांना मिळून एकच बादली पाणी मिळेल ... फडकं ही एकच मिळेल ... कोळसा ही प्रत्येकाला एकच ... सगळे कोळसे ओले करून ठेवायचे नाहीत ... आणि मुख्य म्हणजे फ्रॉक बदला, जुना घाला ... हा काळा करायचा नाही ... " माझ्या आईचं माझ्यापेक्षा माझ्या फ्रॉकवरच जास्त प्रेम असावं ...तिला त्याचीच भारी चिंता असायची ! "आंबा खाताय ?... गॅलरीत बसा, फ्रॉकवर सांडवायचं नाही ... किल्ला करताय ? ... जुना फ्रॉक घाल, मातीचे डाग निघत नाहीत ... रंग खेळायला जाताय ? .... त्या बोहारणीला द्यायच्या गाठोड्यातला फ्रॉक घाल ... हा नाही ... "
असो ... मग मागच्या दारी मेळावा - मित्र मैत्रिणींचा ... आपापला कोळसा वगैरे घेऊन, त्यानी पाटी घासणं सुरु ! कोळसा अर्धा झाला तरी एका बाजूचा अर्धाच भाग झालेला ! मग दुसरा कोळसा आणायचा ... पाटीपेक्षा बाजूची लाकडी पट्टीच जास्त काळी ! मग ती धुवायला साबण ... तोपर्यंत तोंड, हातपाय, नखं काळी ! नखांचं फार वाईट वाटायचं ... जेवायला बसल्यावर वडिलांना explain करायला लागायचं ! काही जणांच्या जोड पाट्या असायच्या ! केवढं 'अप्रूप' त्यांचं ! "ए, एक बाजू मला दे हं करायला ... ए, दुसरी मी करणार ... " Tom Sawyer च्या कुंपण रंगवायच्या गोष्टीसारखं व्हायचं ! ज्याची जोड पाटी, तो आरामात पायरीवर बसून, ... ए, तिकडे घास, अजून पांढरं दिसतंय ... पट्टीवर काळं आणू नको ... चांगला कोळसा घे ... खररर करू नको , चरा पडेल....." शिवाय अशी दादागिरीपण ! किती भाव खायचा ...!
ते झालं की पाट्या वाळेपर्यंत शिवाशिवी खेळणं ... आणि पाट्या वाळल्या की मग त्यावर सरस्वती काढणं ... 'पांच'ची की 'सात'ची की 'नऊ' ची ?... वरच्या बाजूला ।। श्रीगणेशायनमः ।।...आणि ।। श्री सरस्वती प्रसन्न ।। ... मग सरस्वती काढणं ... त्यात चारपाच वेळा पुसणं, की ती सरस्वती मनासारखी येईपर्यंत पाटी पुन्हा नेहेमीसारखी पांढरट ! पण , मग नाईलाज ... पुन्हा धुते म्हटलं तर सगळंच जाणार ! सरस्वती झाली की मग तिला नटवणं ... तिच्या खाली कमळ, आजूबाजूला वेलबुट्टी, फुलझाडं , आणि वर डाव्या उजव्या कोपऱ्यात चंद्र - सूर्य ! सूर्य ... पिवळा खडू ... चंद्र - ओल्या खडूने काढून मग त्यावर चकमक ! आणि मग जागा मिळेल तिथे चांदण्या काढण्याची हौस ! त्या निळ्या खडूनी ! मग आठवायचं ... मागची पाटी कोरीच ! मग एकमेकांना मदत करत ... मागच्या बाजूला 'चार ठिपके चार ओळी ' वाली रांगोळी ! की पाटी सजली !... असं फक्त वाटायचं! ... कारण दुसऱ्या दिवशी, काहींना त्यांच्या वडील /काका /मामांकडून - मोठ्या भावंडांकडून खरी खरी - चित्रातल्यासारखी सरस्वती आणि मागच्या बाजूला गणपती काढून मिळालेला असायचा !
सकाळी शाळेत सगळेजण छान छान तयार होऊन यायचे. गोजिरवाणे हाच शब्द ... मुलं ही केसांना तेल लावून , छान भांग पाडून ! मुली तर छान नटून थटून , पावडर, कुंकू, काजळ, बांगड्या, कानांत लोंबते डूल !... आणि परकर पोलकं !! बरोबरच्या सामानात फुलं, हळदकुंकवाच्या पुड्या ! काही जण अक्षता आणि उदबत्ती - आगपेटी सुद्धा घेऊन यायचे ! त्यांचे आईवडील खूपच प्रेमळ असणार ! आणि काही तर गुळखोबरं, खडीसाखर सुद्धा ! ...
मग पूजा सुरु व्हायची. वक्रतुंड ... या कुंदेन्दु .झालं की , साग्रसंगीत पूजा ... मग अक्षता आणि फुलांची देवाणघेवाण होऊन, पूजा विधीवत पार पडायची. पाच मिनिटांच्या पूजेला तासभर लागायचा, प्रत्येक step ला १० मिनिटं, त्यात एकमेकांच्या गोष्टी घेणं, पाडणं, सगळं असायचं. मग पूजा झाली की ... प्रसाद ! चुरमुरे, फुटाणे, खडीसाखरेचा प्रसाद घेऊन घरी यायचं. " रस्त्यातून खात खात जायचं नाही " अशी शाळेत बाईंकडून तंबी मिळालेली असायची. वाटेत एकमेकींना हादग्याचे निरोप - आज कुणाकडे जमायचंय ... मग तो डबल पाटीवाला यायचा, " आज कुणाकडे जायचंय ... ?" "ए, तू नको येऊ ... आमचं मुलीमुलींचं आहे ... " "कळलं ... सासरच्या वाटे कुचूकुचू काटे ... जा ... " " तूच जा ... आमचं आम्ही बघू ... " तोपर्यंत घर यायचं ! ... आणि घरी आल्यावर ... खरं म्हणजे आल्याआल्याच उरलेला खाऊ संपवायचा. तोपर्यंत कपाळावर टेकवलेल्या कुंकवाचा मळवट झालेला असायचा ! एकतर कुंकू, आणि त्याची allergy, त्यातच फुलांचे पराग नाकात जाऊन शिंकांची भर ... ! ह्या सगळ्याची तमा न बाळगता, पाटी पुन्हा धुऊन पुसून दप्तरात ! आणि मनात विचार ... पुढच्या वेळी काय करायचं आणि काय करायचं नाही ... पुढच्या वेळी सरस्वती रंगीत खडूनीच काढायची, म्हणजे गिरवायला नको. सूर्याला डोळे, तोंड काढायला विसरायचं नाही ... चंद्राची कोर फार बारीक नको. चांदण्यांची जरा practice करायला हवी हं ...
तोपर्यंत आईचा आवाज यायचा ..." उदबत्ती आणली होती वाटतं कोणीतरी ? आणि आगपेटी बाईंनी जप्त नाही केली ? " ... ऑ, हिला कसं कळलं ? ... हे मनात ... अर्थातच आईला विचारायची टाप नव्हती ... मग मुद्दाम दुर्लक्ष करत, " ... अं, माहीत नाही ... " "नव्या परकरावर चार पाच भोकं दिसताहेत ... उदबत्ती लागल्याची ... चांगलं नवं कोरं रेशमी परकरपोलकं भोकं पाडून आणलं ... आत्ता घालू नको म्हटलं , पण ऐकेल कोण ?... आता हाच घाला दिवाळीला ... नवीन मिळणार नाहीये ..."
..... "असू दे, चालतं मला ... नाहीतरी भोकं मागच्या बाजूलाच आहेत ... मला कुठे दिसणारहेत ... मी घालीन हाच ... "
इति पाटीपूजन !
Mastach aahe! Reminded of our child hood.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद !
DeletePharach mast? Reminded of our childhood.
ReplyDeleteकिती सुंदर वर्णन ! डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला ! 👌👌🙏
ReplyDeleteThanks a lot ! 😊
Deleteपाटी धुण्याचा ऐकूनच कार्यक्रम छान रंगवलाय.
ReplyDeleteऐकूनच पाटी धुण्याचा कार्यक्रम आवडला. पाटीवर सरस्वती उमटविनेही छान. चुरमुरे, बत्ताशे प्रसादहि योग्य पण प्रसादानेच पोट भरायचं बर का. मुलींची नटण्या मुरडन्याची हौस कायमचीच. अंगवरील पोशाख कोण विचार करायच. सुटसुटीत अणि छान लिखाण
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद !!! लहानपणच्या आठवणी काढतांना पुन्हा लहान होतो आपण !!
ReplyDeleteमी विनु अलका झकास जमलाय लेख. झाले का शतक पूर्ण !
ReplyDeleteधन्यवाद विनू !! नाही , अजून 2-3 कमी आहेत ..
Delete👌🙂
ReplyDeleteThanks a lot !! ☺️
DeleteThanks a lot !!
Delete