जेथे सागरा ...

 

    हो ... नाही ... हो ... नाही ..... फेब्रुवारीपासून आज जाऊ... उद्या जाऊ ...इथे जाऊया का  तिथे जाऊया... करत होतो.   शेवटी एकदम ट्रिप ठरली आणि मोजून आठव्या दिवशी आम्ही ट्रिपला निघालो. ट्रिपच्या   details पेक्षा त्यातले highlights पुन्हा अनुभवणं सोपं ... कारण सगळं वर्णन करायला पुन्हा ३ - ४ दिवस लागतील ... पण प्रत्येक क्षणन् क्षण मी enjoy  केला, पूर्णपणे जगले  !! त्यामुळे  सगळेच दिवस highlights  !!! जेथे सागरा धरणी मिळते ...मालवण !!!

    शुक्रवारी सकाळी ९ला निघालो. हळू हळू गाडी मालवण च्या रस्त्याला लागली . आणि पिशव्या , बॅगा उघडायला लागल्या . सतीशने बरोबर घेतलेला ब्रेकफास्ट - sandwitches खाऊन झाली, आणि मग चहा - कॉफी ... ? !!  त्यासाठी शोधाशोध ... कुठलं हॉटेल बरं दिसतंय ... तोपर्यंत हे चर ... ते खा ... !    कारण, प्रत्येकाने इतका खाऊ बरोबर आणला होता की जसं काही त्याच एका पदार्थावर पूर्ण ट्रिप काढायची आहे ... !!     तर वाटेत एक छान प्रशस्त हॉटेल दिसलं ... बाहेर गाड्या,  बसेस उभ्या होत्या ... गर्दी ... जाऊया - नको ... करता करता उतरलो ... पहातो तर हॉल full !   मंडळी लग्नाला चालली होती, का लग्न आटपून परत चालली होती, माहीत नाही !    

    मग बाजूच्या बाकावर बसून ऑर्डर देणे ... किती चहा ... किती कॉफ्या  ... साखर ... हवी - नको ... तो माणूस म्हणे, तुम्ही घ्या, मी मोजतो ... !!   मग हिशोब करू !  आजूबाजूची गम्मत पहाता पहाता , मग मुलींची चर्चा सुरु ... "ए, नवरी कुठे आहे गं ... अगं, ती काय, ती बघ ... दुसऱ्या टेबलवर ... ती ...बाळाला घेऊन बसली आहे ना "... "ए, काहीतरीच काय गं" ... "अगं, तिच्या बाजूला बसलीय , ती म्हणते मी" ... हो गं हो " ....      "तुला कसं कळलं ?" एका मित्राचा भाबडा प्रश्न ..."अरे, तिची साडी बघ, हातभर बांगड्या, आणि गळाभर लखलखीत दागिने बघ ... आणि फुलं .. किती ती डोक्यात ... गुलाब, अबोली गजरा, मोगऱ्याचा पण आणि कसली कसली पानं पण आहेत ... ते जाऊ दे, सगळ्याच तश्या नटल्यात ... पण तिची मेंदी बघ ...  ...अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं ... अजून तुझ्या डोळ्यातले मोठेपण कवळे गं ... !! ...

    गंमत म्हणजे, त्या सगळ्या बायका अशाच आमच्याकडे बघून कुजबुजत होत्या. संध्या म्हणे, "ए, आपण त्यांना आवडलोय बघ ... "  तोपर्यंत त्यांच्यातली एक धीट बाई आलीच !  "ज्येष्ठ नागरिक ?   ट्रिपला निघालात ?   फोटो काढू एक ..."     " काढ  गं बाई, काढ ... नाहीतर कोण बघतंय आमच्याकडे ...." .. पण एक मजा  ... नवऱ्या मुलाचा शोध कोणीच घेतला नाही ... "तो दिसत नाहीये ..."     "असेल कुठंतरी बसलेलं ते, सफारी सूट आणि गळ्यात मोठी chain  घालून ... आता काय ... अडकवला ... !" ...हे दुसरं कोण म्हणणार !   त्या गोतावळ्यात एक गृहस्थ ... उंच, धिप्पाड, ... आणि गळ्यात हे भली मोठी वाघनखं !     इतकं मोठं पदक ... ते त्यांनाच शोभणारं ... नक्कीच मुलाचा मामा असणार ... !!     नाहीतर इतकी हुकमत दुसरं कोण गाजवणार !!! ...

    तिथून निघालो, ते सरळ त्रिंबक येथे .   मिलिंद आणि सुखदा यांनी नुकतंच जीर्णोध्दार केलेलं शंकराचं देऊळ ... प्रसन्न, सुंदर, शांत, स्वच्छ, आणि सगळं नवं कोरं ... तिथे जाऊन दर्शन घेतलं !    तिथल्या लोकांचं आदरातिथ्य, आमच्या सर्वांसाठी देवाला घातलेलं गाऱ्हाणं ... केवळ अप्रतिम ... !     "ए, जरा पाणी मागुया का ..." असं म्हणतोय, तोवर त्यांनी कलिंगडं कापून आणली !    लाल चुटुक आणि गार ! चव तर इतकी गोड  ... एरवी fruit fork शिवाय न खाणारी मी ... एक मोठी  फोड उचलून, चक्क मांडी  घालून बसले आणि मग किती फोडी खाल्ल्या कुणास ठाऊक ... कसल्याही औषध - फवारे, injection चा वारा न लागलेली ती गोड कलिंगडं ... वर इतक्या उन्हात ... अंतरात्मा तृप्त झाला ... !!

    रिसॉर्ट वर पोहोचलो.   आधी फोटो पाहिले असले तरी काही surprises असतातंच!     तिथे अंगणात उतरुन जरा वावरात जावं म्हणून निघालो तर समोर एकदम समुद्र किनाराच ! Private beach  !  तो ही अगदी स्वच्छ, नुकताच झाडल्या सारखा !     त्यापुढे समुद्र,  सुंदर, अथांग असा  , डोळ्याच्या या कोपऱ्या पासून त्या कोपऱ्या पर्यंत समुद्रच ... निळा निळा  ! त्याची स्पर्धा वरच्या आकाशाशीच !     लाटांवर लाटा आणि त्यांत उभं रहायला धडपडणारे आम्ही लोक ... पडले पडले पडले ... नाही नाही नाही ...खूप फोटो काढले !  अंधार पडायला लागला, ओहोटी होती ... हॉटेलवाला आला सांगायला, आता पाण्यात नका जाऊ ... पाण्याची ओढ वाढतेय ... परत आलो, आणि तिथे खोल्यांच्या समोरच्या अंगणात गोल खुर्च्या मांडून, गप्पांना सुरुवात ! ... एकेकाचे अनुभव, प्रसादचं 1b मधल्या एका गोष्टीचं वाचन . मग अश्विनीचं तिच्या पुस्तकातल्या एका आवडीचच्या लिखाणाचं वाचन , माझी बडबड ! अनील-कुसुम,  ज्यो,  गजा -वासंती,  मिलिंद-सुखदा, आणि बाबू-अश्विनीचे अनुभव-आठवणी !  सतीशनी सांगितलेल्या गोष्टी ...अंगावर काटा आला ऐकतांना.... !  काही विषय serious, तर काही म्हणजे केवळ हसणं ...हसून तोंड दुखायला लागलं !! रात्री झोपायला १२ll  होऊन गेले होते ... !!!

    सकाळी सातला उठायलाच पाहिजे,  म्हटल्यावर विचारात पडलेले सर्वजण, दुसऱ्या दिवशी ५ वाजल्या पासून खोलीच्या बाहेर ... "चहा किती वाजता रे ?"    तेवढ्यात काहीजण किनाऱ्यावर जाऊन पण आले.   आदल्या दिवशी संध्याकाळी कुत्र्याने मिलिंदचे बूट पळवले होते ... त्यातला एक लगेच मिळाला, पण दुसरा शोधायचा होताच ! आणि मजा म्हणजे तो ही सापडला !! त्याचा कोण आनंद !  लवकर उठणाऱ्यांचं बाकीच्यांना ... खरं तर मलाच सांगणं ... "काय गं झोपून रहातेस, सूर्य डोक्यावर आला तरी ... पाच वाजता जरा डोकवायचं ना जगात ... मी तर बीचवर फिरून सुद्धाआलो  !!!"    पण,  एक गालबोट म्हणजे अनिल-कुसुम अगदी सकाळी सांगलीला परत गेले. पण त्याला नाईलाज - देवाची इच्छा ... ती रुखरुख मात्र राहिली....

    तिथे जवळच मालवणमध्ये एक छोटासा राजकोट - राजाचा किल्ला, असा एक छोटासा कोट बांधला आहे.  तिथे शिवाजीमहाराजांचा भव्य पुतळा !    खूपच सुंदर !    तिथेच महादेवाचं एक छोटंसं देऊळ, त्याच्या समोर घंटा आणि बाजूच्या वडाच्या झाडावर खूप  रंगीत झेंडे आणि घंटांसारखे decorations !    सगळा कोट गेरुवा, त्यावर ते झेंडे, फारच सुंदर !!! देवळात गारगार ओसरीवर पाय सोडून बसलो. तिथेही जेष्ठ नागरिकांची दंगा करणारी टोळी पाहून बाकीचे लोक चकीत !    हॉटेलमधे तर २ - ३ मुली,  १ - २ जोडपी, सगळे येऊन गप्पा !... आणि प्रत्येकानी सांगितलं, आम्ही आमच्या आईवडिलांना सांगितलं की इथे असा group आलाय ! खूप मजा करताहेत ...तुम्ही पण बघा, असं जात जा ! 

    उन्हाची पर्वा न करता राजकोटहून गेलो rock garden  पहायला !   चंडीगढ type नाही, तर एका मोठ्या कातळावर त्यांनी सुरेख बाग केलीय, आखीव रेखीव ... एक cute सा लाकडी पूल एका तळ्यात, आणि एका टोकाला  watch-tower  !    मी गेले चढून,    तिथे एक दोन जोडपी, ... "आजी, फोटो काढता का आमचा ?"    झालं, सतीशला तेवढं पुरलं ... "आजी' म्हणाले ते तुला" ... "असू दे ...मी आहेच आजी" ..." तरी पण ते तुला आजी म्हणाले ! "  मग थोडावेळ तेच, ... "अलका आजी, सरबत घेणार का" ... "कसलं रे.".. "..पी तर "..."काही झालं  म्हणजे ?" ... "xxx, मी आहे ना...मरू नाही देत तुला ...पी..."..... पिऊन तर टाकलं ... काय होतं कोण जाणे ... ते ओल्या काजूच्या बोंडाचं सरबत !  अगदी मस्त चव ... उगीचच, कल्पनेनीच झिंग येत होती ! ...  

          तिथेच जवळच कोकणी - मालवणी थाळी जेवलो.   मासे खाणाऱ्यांचं सुख विचारूच नका ... fish tank  - aquarium  मधे असतात, ते सोडून मिळतील ते मासे खात होते ... आणि जाता येता सोलकढी - काजूची उसळ ... पण कुणालाही काहीही झाले नाही ... !!!

    संध्याकाळचे ५ ... चहा आणि च्याऊ म्याऊ, - चिवडे - लाडू - वासंतीने आणलेला  खाजा पुऱ्या ,  प्रसाद-भारतीच्या मुलींनी पाठवलेला  chocolate walnut cake ...!   आणि तिकडे पाहिलं, तर संध्या तिची आयुधं घेऊन सज्ज ... आला कोणी की पकडला ... सगळ्यांच्या हातावर tattoo ... भारती आणि ज्यो ला नाजूक मोरपीस, अश्विनीला heart... अगदी ECG सहित ... दिल धडकने दो type !   मिलिंद आणि प्रसादला ओम, सतीशला विंचू ... फोटोत असा दिसतोय, जसा काही त्यालाच  चावलाय ... बिछुआ ...!     मग गाणी, गप्पा, खेळ ... वासंतीचे खेळ भारी !   तिच्या पोतडीत खाजा , तिखट पुऱ्यांबरोबर हे games !    ती game घेतेय म्हटल्यावर सगळे अगदी alert ... कधी आपला game होईल ... सांगता येत नाही !   एका खेळात इंग्रजी शब्द वापरायचे नाहीत, अशी सुरुवात, आणि खेळायचा  वेळ संपला, तोपर्यंत सगळे केवळ नेहमीचं मराठीच नाही तर अगदी सरकारी formal मराठी पासून ते जुन्या खलित्यातलं , लग्न पत्रिकांमधलं मराठी...इथपर्यंत पोहोचले होते !    हसून हसून पुरेवाटच !....

    तिसऱ्या दिवशी सकाळी अजून एका बीचवर !   तो ही असाच मोकळा, आमचीच वाट पहात बसलेला !  दुसरं कोणीच नाही ... लांब लांब चालत गेलो ... मग ... पंख होते तो उडी आती रे ... ओढणीचे पंख ... लाल ओढणी नव्हती म्हणून, नाहीतर ... हवामें उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमलका .. झालं असतं !    तिथे ही खूप मजा , शांत, आणि अथांग समुद्र बाजूला !   त्यालाही आम्ही परत फिरणार ... त्याचे वेध लागले असावेत ...     

    परत निघालो ठरल्याप्रमाणे ... २ - ३ दिवस नाही पुरत  ... खूप काही राहून गेलं बोलायचं, सांगायचं आणि खायचंही !       खेळही राहिलेत काही ... !     परत येतांना वाटेत जेवलो, पुन्हा सोलकढी आणि काजूची उसळ , बटाट्याचे काप ... ! ...आणि बरंच काही !  वाटेत मिलिंदच्या माहितीच्या एका स्पेशल गाडीवरचा  अप्रतिम चहा ... राधानगरी अभयारण्याच्या प्रवेशद्वारापाशी ... इतका मस्त चहा फार क्वचित मिळतो ...!!...

    कोल्हापुरात वासंतीच्या माहेराहून गाडी काढली, तेव्हा सगळेजण आम्हा दोघांना टाटा करायला टेम्पोतून खाली उतरून आले... कोणी काही बोलत नव्हतं, हसत नव्हतं ... "चला, येतो आम्ही ..." सगळ्यांना सांगत, त्यांना डोळे भरून पहात , परत निघालो ... पाठवणीच होती ती ... आणि मनात सगळ्यांना promise ... लवकर परत भेटण्याचं ... किनाऱ्यावरचा हाती आलेला शिंपला घेऊन ... !!!



- सौ अलका कुंटे, बंगलोर 

   +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. Missed all. but you picturised it for us.
    thnx. pramod

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you , Pramod ! Next time , we all will go !!😊

      Delete
    2. प्रत्यक्षात अनुभवायला मिळाल्याप्रमाणे वाटले मला या ट्रीप बद्दल कोणी ही कल्पना दिली नाही याची खंत वाटते.असो तुमच्या आनंदात सहभागी आहोत आम्ही सर्वजण

      Delete
  2. धन्यवाद, चंदू !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland