रंगात रंगुनी साऱ्या ...
आजपासून वसंतोत्सव ! इतके दिवस शांत शांत असलेली सृष्टी पानापानातून डोळे उघडतेय... आणि फुलाफुलातून जागी होतेय ....वसंत अवतरतोय आणि त्याच्या स्वागताला आलेली ही सणांची जोडगोळी ... ! होळी आणि रंगपंचमी ... एका पाठोपाठ येणारे हे आवळे-जावळे सण . सर्वांचे लाडके. पूजा-पाठाच्या फारसं आहारी न जाता, दंगा-मस्ती, मौज-मजेवर भर ! लहान-मोठे सगळेच सामील ! होळी म्हणजे थोडं फार अग्निपूजन , तर रंगपंचमीला पाणी हवंच. धुळवडीला राख-माती-चिखलात खेळायचं, तर रंगपंचमीला अक्षरशः रंगंची उधळण ... मग ते कोरडे असोत , नाहीतर पाण्यातले !
उत्तर भारतात होळीपासूनच रंग खेळायला सुरुवात. मुख्य म्हणजे गुलाल. पण त्याआधी ....होळी म्हणजे काय ... शेकोटी ? ह्या शेकोटीत होळीचं मूळ असेल का ? कारण तेव्हा जीवघेणी थंडी असतेच. का खरंच प्रह्लाद आणि होलिकेच्या गोष्टीनंतर होळीची प्रथा आली असेल ? वाईट दुष्ट प्रवृत्ती जाळून टाकून, चांगल्या सभ्य प्रवृत्ती तावून सुलाखून बाहेर पडोत, ही मुख्य धारणा ! किंवा हा नंतर शोधलेला अर्थ ... काहीही असो, छान आहे हे नक्की !
होळी म्हंटलं की , एक आठवण सांगलीची ! होळी आली , की बाजूच्या झोपडपट्टीतली छोटी छोटी मुलं एक गोणपाट घेऊन यायची ... " होळीला पाच शेणी , नायतर एक लाकूड , नायतर एक पैसा ..." असं गाणं म्हणत ...आणि काहीतरी दिल्याशिवाय हलायचीच नाहीत ...! पैसे घेऊन चिक्की किंवा तसलंच काहीतरी खाऊन मोकळी ! मला ते नाव आठवत नाहीये ..गुळाची ...खोबरं घातलेली चिक्की असावी ....
आजोळची होळी अगदी सात्विक-सोज्वळ ... संध्याकाळी छान सडा घालून, त्यावर रांगोळी काढून घरातली गडी-माणसं होळी रचायचे, लाकूड-फाटा, वाळक्या फांद्या, गवत वगैरे ! मग तिला पानाफुलांचे हार, आरती, नैवद्य ...प्रसाद ... पुरणपोळी - खीर ! सर्वांनी नमस्कार करून मग ती पेटवायची. गाणी, गप्पाटप्पा, खाऊ, थोडीफार मस्ती ... होळी नीट पेटली की मग थोड्या वेळाने सगळे घरात ... दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या-उठल्या जाऊन पाहायचं ... बहुतेक धग असायची ... मग ती दुधाने शांत करणं ... मोठी माणसं मग बेता-बेताने त्यात वाहिलेले नारळ शोधून काढायचे ... तो होळीचा प्रसाद ! वेगळीच छान चव ! त्या राखेचा अंगारा ही लावायचा ... आणि मग तो पसारा आवरायला घ्यायचा , म्हणजे धुळवड ! चिखल-राख-पाणी-माती ... खेळून घ्यायचं हवं तेवढं ... नंतर काळाच्या ओघात हे सगळं इतिहासजमा झालं ...
मला अजून एक आठवते ती लहानपणची दिल्लीतली होळी ! वडिलांच्या मित्राच्या घरी अंगणात पेटवलेली ... रेवड्या-मिठाईची रेलचेल ... पलीकडे लावलेला तंदूर ... आणि त्यात डोकावून पाहतांना चेहेऱ्याला जाणवलेली धग आणि मग रंग ... होळीचं आणि रंगांचं काय नातं असावं, कोण जाणे , कारण रंग खेळायला रंग पंचमी असतेच नंतर ...! तसं पाहिलं, तर वसंतपंचमी पासूनच हे रंगांचे वेध लागायचे. त्या दिवशी , माझी आई आणि तिच्या मैत्रिणी बसंती रंगात पांढऱ्या साड्या रंगवून वाळवून ठेवायच्या, आणि मग केशरी - सुंदर झाक असलेला तो रंग खेळणं ! .. विदर्भात वगैरे पळस - त्याला तिकडे 'टेसू' म्हणतात - त्याची फुलं आणून पाण्यात भिजवून, वाटून त्याचा सुंदर गुलबट लाल रंग तयार होतो. आजोळी हे झाड असल्यामुळे, मी ही त्या रंगात हात धुवून घेतले आहेत. एकदा हिरवा रंग करायला चुकून मेंदीची पानं वाटली आणि वाटता वाटता हातच रंगले, हिरवा रंग राहीला बाजूला ! घरी कामाला येणाऱ्या कामकरी काका-मामांच्या मागे कटकट - बाबा-पुता केलं की फार मिनतवारीनं ते गावाजवळच्या जंगलातून कुठली-कुठली रंगीत फळं आणायचे आणि छोट्या बादल्यांत त्यांचा रंग करायचे. पण किती अटी, "बाई, मुंहमें मत डालो ... बाई, आँखे संम्हलना ... ये रंग बहुत खराब चीज है !" खरं तर काहीच व्हायचं नाही, पण त्यांना भीती ... काही झालं तर ...! तेव्हा आजोबांच्या बुटांसाठी लाल पॉलिश असायचं, ते ही पळवायला काही वाटायचं नाही ... काळ्या रंगाचं ही वावडं नव्हतं ... कोळश्यांच्या खोलीतून, नाहीतर बंबाखालच्या राखेतले उरलेले कोळसेही चालायचे !
जशी मोठी होत गेले, तशी ह्या सगळ्यांवर बंधनं येत गेली. होळी ते रंगपंचमी घराबाहेर पडायचं नाही. मैत्रिणींना ही मज्जाव ! मग पाच सहा दिवस कॉलेजला नाही जायचं. पण मैत्रिणीही भारी ... त्या काय सोडताहेत ... ज्यांचे मोठे भाऊ-बहिणी medical वाले, घरात आई-वडील डॉक्टर, त्या कोऱ्या सिरींज घेऊन यायच्या पर्स मध्ये , आणि मग त्यात रंग भरून वर्गात , सरांची पाठ वळली , की पुढच्या २-३ बाकांपर्यंत त्यातून रंग उडवायच्या ! घरी जायच्या आधी कितीही धुऊन पुसून निघालं तरी कुठेतरी, केसांत, कानामागे, हातात, बोटांत रंग - गुलाल असायचाच ... कुणाच्या भांगात पडलेला गुलाल .... कोणी घातला...कसा गेला ....याला फार महत्व ... मग चिडवणं, हसणं ... मंतरलेले दिवस ... काहीही स्वप्न ... wishful thinking ... romantic ...असं बरंच काही ... थंडाई पर्यंत मात्र कधीच मजल गेली नाही !
रेडिओ, सिनेमे यांना ह्या उत्सवाचं कौतुक तर विचारूच नका ... मृच्छकटीक नाटकातही वसंतोत्सवाचा प्रसंग आहे. सिनेमात 'होली आई रे कन्हाई , ... होली खेलत नंदलाल...' पासून सुरु होणारी गाणी अजून चालूच आहेत. त्यात नवी भर पडतेय. दर एक आड सिनेमात होळी - रंग असलेच पाहिजेत ... 'रंग दे मोहे लाल, ... off-white घागरा , गोरी गोरी आणि तळहात गुलाबी लाल ... अहाहा ..! 'हमपे ये किसने, हरा रंग डाला ...व्वा !.. मार डाला ...'बलम पिचकारी ,जो तूने मुझे मारी' ... मज्जाच !
फक्त माणसंच रंग खेळतात असं नाही, तर ह्या सुमाराला निसर्गातही रंगांची किमया दिसतेच दिसते ... लाल चुटुक पळस बहरलेला ... पिवळा धमक बहावा बघतोय ... येऊ का नको ... इतक्यात ... त्याच्या जोडीला थोडा थोडा गुलमोहोर डोकावतोय ... आपलं फुलणं आटपून परत निघालेला नीलमोहोर ... सगळीकडे गुलाबी रंगाच्या छटा दाखवत बसंतरानी - Tabebuia - ची फुललेली झाडं, आणि ह्या सर्वांवर मात करत, हळूच फुलणारा पण फुलल्यावर आपलं फुलणं सुगंधानी जाहीर करणारा शुभ्र मोगरा ... किती रंग, कितीतरी रंग ... हिरव्या पिवळ्या, कोवळ्या पानांच्या पार्श्वभूमीवर हे रंग ... निसर्गाची रंगपंचमी !!!
ह्या सणाचं मूळ कोण जाणे, पण एक नक्की, की कृष्णाच्या वेळीही हा सण होता ! तरुणाई, दंगा-मस्ती, नोक-झोक, चिडवाचिडवी , गंमत, मजा आणि ह्या सगळ्याचा अधिष्ठाता - तो कृष्ण ! सगळ्या रंगांमध्ये तो रंगला, सगळ्या रसांत रमला, सगळेच रंग त्याच्या आवडीचे असावेत ... अगदी काळा सुद्धा ! त्याचं आयुष्य काही सोपं नव्हतं, नाना संकटं - दुःखं सगळं त्याने भोगलं , सोसलं ... पण मनातला आनंद विझू दिला नाही , की कशात गुंतला नाही . यमुनेच्या काळसर पाण्यात तो खेळला.. हिरव्या रानात हिंडला.. प्रेमाच्या अनेक गुलाबी छटांच्या मोहात पडला.. दूध-दही-लोणी आणि अमाप वात्सल्याच्या शुभ्र रंगात न्हायला ..आणि द्वारकेला समुद्राच्या निळ्या रंगात रंगला ...तरीही , त्याचा रंग वेगळा ... सावळा !.. त्याला कोणत्याही एका रंगात पकडता येत नाही.. कोणत्याही एका रूपात अडकवता येत नाही.. कोणत्याही एका सणात बांधता येत नाही .. तो आकाशाच्या निळाईत एकरूप होऊन जातो... आणि उरतं...फक्त एक देखणं मोरपीस ... इंद्रधनुष्याशी नातं सांगणारं ..... !!!
- सौ. अलका कुंटे, बेंगळुरू
+९१ ८७६२३ १६३८५
वाह क्या बात !
ReplyDeleteThanks a lot , Sanju !
Delete