चैत्रगौर

 

    गेल्या वर्षी हादगा-भुलाबाईच्या मिषाने कोजागिरीपर्यंत रेंगाळलेली माहेरवाशीण ...., पाय निघता निघत नाही.... तिला सगळ्या मुलीबाळींनी विचारलं, " गौराई, तुझं ठाणं गं, आता कधी येणं गं ?"    त्यावर ती म्हणते, " आता येणं चैत्र मास ... "... तीच  चैत्रगौर !   कबूल केल्याप्रमाणे आली !  चैत्र पालवी, अंब्याचा मोहोर माळून , मोगरा - चाफा लेऊन , सजलेली ! ...

   तिच्या आधी चैत्र आला  ! गुढी पाडवा ! आणि नंतर गौरी तृतीया - गौरी तीज ! त्या दिवशी चैत्र गौरीचं आगमन  !  अक्षय तृतीयेपर्यंत आता सगळ्या बायका तिच्याच तैनातीत !   तिच्या स्वागताला रोज चैत्रांगण काढायचं, तिच्याकरता पन्हं , अंब्याची डाळ !     मग एखादा सगळ्यांच्या सोयीचा दिवस पाहून हळदीकुंकू .  तिचा उत्सवच !  स्वागत समारंभ !  गौर नटते - सजते, तिला झोपाळ्यावर बसवायची, आणि मग घरोघरी निमंत्रणं, हळदीकुंकवाची ! ' लेकी - सुना - इष्ट मैत्रिणींसह यावे,' असंच बोलावणं !   सगळ्या जणी दागिने घालून नटून-थटून येणार.   त्यांना हळदीकुंकू, अत्तर - गुलाब, मोगऱ्याचा गजरा, अंब्याची डाळ , पन्हं ,  कलिंगडाची फोड, आणि मग भिजवलेल्या हरभऱ्यांची ओटी !    अन् शेवटी पान-सुपारी !  खूप गप्पा-टप्पा, क्वचित कुठे खेळ, उखाणे, आणि मग सगळ्याजणी पुढच्या घरी रवाना ! प्रत्येक घरच्या डाळीची चव वेगळी ,  पन्हं वेगळं ! पण , इतकं सुंदर , की ते कधी पुरेसं किंवा नकोसं होतंच नाही ! प्रत्येक घरची आरास , सजावट वेगळी , काहीतरी खास ....!!! 

    माझ्या आठवणीतलं पहीलं चैत्रातलं हळदकुंकू , ते माझ्या मावशीकडलं.    चैत्रात परीक्षांचा मौसम, त्यामुळे आजीकडलं हळदकुंकू कधी पाहिलं नाही.  त्या दिवशी - नव्हे- दोन-चार दिवस आधीपासून घरात गडबड. माझे मावस बहीण - भाऊ आणि मी ...आमची लुडबुड .. कार्याचं वातावरण, मोठाल्या याद्या . घरातल्या हॉलमधला एक छानसा कोपरा निवडून तिथे मावशीने कुणा मदतनीसांकडून दोऱ्या बांधून घेतल्या.     मग एका टेबलवर दुसरं छोटं टेबल, वर अजून एक डबा, त्यावर चौरंग असं करत छान पायऱ्या-पायऱ्यांची उतरंड करवली, त्यावर गालीचा !     कपाट उघडून त्यातून छान छान साड्या - शालू काढून, ते दोऱ्यांवर घालून, त्याचे महालासारखे पडदे !     आणि त्या पडद्यांच्या पलीकडे चौरंगावर ठेवलेल्या झोपाळ्यावर अन्नपूर्णा विराजमान !  जरीची वस्त्रं, शेला, मोहनमाळ, आणि बाजूला मोगऱ्याचे हार ! पडद्यांना आणि वरती रेशमी झिरमिळ्या , गोंडे ,  फुला-पानांचे गजरे , मणी ,  टिकल्या, वर इलेक्ट्रिक दिव्यांची माळ !     उतरंडीच्या दर पायरीवर काहीतरी छान 'सीन' मांडलेला.  कुठे फुलबाग, कुठे आरशाच्या 'तळ्यात' चिनी मातीचे पक्षी, बाहुल्या ! तेव्हा plastic नव्हतं, त्यामुळे कागद, कापडाची किंवा खरी फुलं !     मधे मधे समया, मण्यांची आसनं, तोरणं, महीरपी !    पेरू, खरबूज आणि कलिंगडाची कापून केलेली कमळं दोन्हीकडे ! अंब्याच्या पाच पाच पानांचे शिवून केलेले  पानोडे ! त्यावर ती कमळं मांडलेली ! आणि मग छोट्या छोट्या कुंड्यांमधे फुलझाडं !    सगळं decoration अजून मनात ताजंच आहे ! ...

    दुसरी आठवण...?... सांगलीची !   आमचं घर म्हणजे एका चौकोनी बागेच्या भोवतीच्या १४ - १५ बंगल्यातील एक !    आणि सगळे सगळ्यांना ओळखत - जिव्हाळ्याचे संबंध !     चैत्र लागला की हळूहळू बोलावणी यायला लागायची.     दर घरातून एक मोठी यादी बाहेर पडायची. त्यावर चैत्रगौरीच्या हळदकुंकवाचं रीतसर बोलावणं आणि खाली सर्वांची नावं लिहिलेली !   निमंत्रण वाचायचं आणि आपल्या नावापुढे सही करायची ,  बोलावणं मिळालं म्हणून ! आणि आई लगेच कॅलेंडरवर लिहून ठेवायची !

    काही ठिकाणं तर आमचीच , हक्काची ! त्यांच्याकडे हळदकुंकू, अत्तरगुलाब  द्यायला आम्हा दोघी बहिणींना स्पेशल बोलावणं !   मग त्या दिवशी संध्याकाळी रेशमी , नाहीतर खणाचं परकर-पोलकं , matching बांगड्या , मोत्याचे डूलआणि गळ्यात हिरवी दूड घालून आम्ही तिथे !      सगळ्या आजी मंडळी आणि त्यांच्या घरच्या लेकी-सुना म्हणजे आमच्या काकू नाहीतर आत्याबाईच !   तिथेच आम्ही दोघी धान्याची रांगोळी शिकलो !     ठिपक्यांची रांगोळी काढून , रंगाऐवजी त्यात धान्य भरायचं. तांदूळ,गहू, मसुराची डाळ , हिरवे मूग, मुगाची डाळ, हुलगे, उडीद, अगदी राजमा , जवस , मोहोरी सुद्धा ... आणि त्याची रंगसंगती !      "आत्या, रंगाऐवजी धान्य भरून अंगणात कशी हो काढणार रांगोळी ? पायदळी येईल ना ..."  ... "अगं, म्हणून तर आपण गौरीपुढे ही रांगोळी काढतो , तिथे पाय पडायचा प्रश्नच नाही ... ! "    किती सुंदर कल्पना !

    त्यानंतर ४० वर्षे गेली असतील ... मुलाचं लग्न झाल्यावर, नव्या सुनबाईचं  चैत्रगौरीचं हळदकुंकू करायचं ठरवलं आणि इतक्या वर्षांच्या आठवणी जाग्या झाल्या !     तिच्या आणि माझ्याही , गौरीहरातली जपून ठेवलेली भांडी, महीरपी  मांडून आरास केली . लाकडी पाटाचा झोपाळा केला , त्यावर गौर बसवली .धान्याची  रांगोळीही काढली !  मैत्रिणींना हळद कुंकू , मोगऱ्याचे गजरे, डाळ- पन्हं ... सगळं साग्रसंगीत केलं .... ओल्या हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरतांना, सगळी चैत्रगौरीची हळदीकुंकवं एकदम पुन्हा जगून घेतली मी ! ..... 


- सौ. अलका कुंटे , बंगलोर 

  +९१ ८७६२३ १६३८५ 

Comments

  1. खूप छान

    ReplyDelete
  2. Replies
    1. Thank you very much !! 😊

      Delete
  3. NOSTALGIC AND FANTASTIC. TRADITION MUST GO ON AND MUST PASS TO NEXT GENERATION. VERY NICE.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot , Yashodhar !Our generation has done it's best to preserve our traditions ! Now , it is upto next generation ... ..!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland