उन्हाळा
बंगलोरमधलं तापमान ३८.५ ... अरे बापरे ... काय उन्हाळा हा ... कसं होणार आहे आपलं, अजून तर एप्रिल संपायचा आहे ... मे महिना कसा काढणार आहोत आपण ... AC आणायचा का ? ... का आपला cooler ... मी नवऱ्याशी चर्चा करत होते ... अगदी युद्ध पातळीवर ... आणि फोन वाजला....
"अगं, काय गं, तुमच्याकडे म्हणे खूपच उन्हाळा आहे आणि पाणी नाहीये ? इथे tv news मधे सांगितलं ... काय पाण्यावरून नळावर भांडणं ... तुम्ही कसं गं करताय ? " पुण्याहून माझ्या मैत्रीणीचा भडीमार. "अगं, आमच्या भागात नाही पाण्याचा प्रश्न ... पुरेसं आहे ... खरं म्हणजे मुबलक आहे, पण असं मोठ्यांदा म्हणून मी दृष्ट नाही लावणार आमच्या पाण्याला ... हां, काही भागात मात्र अगदी serious टंचाई आहे "... आणि मग असे फोन येत आहेत. न्यूज मधे काय सांगितलं, दाखवलं कोण जाणे ... अर्थात काही ठिकाणी परिस्थिती फार बिकट आहेच, पण पाऊसच नसेल तर काय करणार ...
उन्हाळ्यावर बोलायचं तर विदर्भातल्या लोकांना उन्हाळ्याचं काय ? ४०+ चे veteran आम्ही ...वयाचं नाही , मी तापमानाचं म्हणतेय ... दरवर्षी मरे त्याला कोण रडे ? असा कडक उन्हाळा, पण तो सगळ्यांनी accept केलेला, हा असा असणारच ... आणि उन्हाळा म्हटलं की पाणी टंचाई ओघानेच आली ... खरं तर , असं नसलं पाहिजे ... पण आपल्याकडे काही गोष्टी जोडी जोडीनेच येतात ... जसा उन्हाळा आणि पाणी टंचाई, पाऊस आणि वीज जाणं ... आणि उन्हाळ्यात वीज जाणं ... ?? म्हणजे हालच हाल !!! ... तर अशी मी अमरावतीत राहिलेली ! ऐन उन्हाळ्यात कॉलेजच्या परीक्षा ! एक-दोन पेपर तरी मे महिन्यात ! आणि त्याची वेळ दुपारी ३ ते ६ ! तरी सगळे जण व्यवस्थित परीक्षेला येत असत, पेपर लिहून जात असत, रोज कुणीतरी पडायचं धाडकन ... मग पाणी मारा, पाणी पाजा.. वगैरे करून पुन्हा पेपर लिहायला सुरुवात ... विशेष काही झालंय, असं काहीच नाही ! निदान आम्हाला तरी ! सर-मॅडम लोकांच्या तोंडचं पाणी पळायचं बहुतेक ! पण आमची शान असायची हां ! कोणी पाणी मागितलं की लगेच गार गार पाणी मिळायचं ! एखादा attendant corridor मधे उभा, दर वर्गाच्या बाहेर ! आणि एक-दोन रांजण भरून ठेवलेले ! आणि आम्हाला तो पाणी आणून द्यायचा ! अगदी 'रॉयल'पणा वाटायचा !! कॉलेजच्या बाहेर सरबतवाला, उसाचा रस वाला, बर्फाचे गोळेवाला ... सगळ्यांची हजेरी ... केवळ आपल्यासाठी ! नुसत्या कल्पनेनीच 'दिल खुष' होत असे ! अर्थात हे सगळं enjoy करण्याइतपत पैसे नसायचे, आणि पुढचा पेपर ?? ! ! ... 'गेलेल्याचं दुःख' ... आणि 'येणाऱ्याचं' पण दुःख ! कारण, "पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून नक्की नीट अभ्यास करीन" या वचनाला न बधणारा तो ' उपर वाला ' ! तिकडच्या भागात घराबाहेर पाऊल टाकलं की हिंदी जास्त चालतं त्यामुळे त्याचं नाव 'उपर वाला' ! परीक्षा संपली की सगळ्या मैत्रिणी मिळून प्रत्येक गोष्ट एक-एक घेऊन ती share करायची वगैरे ठरायचं ! पण हॉस्टेलवाल्या मुली शेवटचा पेपर झाला की तासाभरात अक्षरशः गुप्त व्हायच्या, आणि गावात राहणाऱ्या आम्ही काहीजणी मग उदासपणे घरी जायला निघायचो ... !!! मग जाता जाता , सगळ्या थंड गोष्टींना फाटा देऊन तिखट-जाळ गोलगप्पे खाऊन घरी ! उन्हाळ्याचा काटा तिखटानीच काढायचा !! त्या काळी , तिकडे हापूस - पायरीचं विशेष कौतुक नसायचं . माठातलं थंडगार पाणी , टरबूज- खरबूज आणि लिंबाहून जरासे मोठे , गोड गावरान आंबे- त्यांना बिट्ट्या म्हणतात - ते ही शेकड्याने घ्यायचे - शेकडा १२०चा !!! उन्हाळा मस्त जात असायचा ... !!! आणि , मग यायचा मे महिन्यातला 'नौतपा' ! नऊ दिवसांचा अती कडक - तापलेला उन्हाळा ... तो पर्यंत तापमान ४४ °C असेल तर ह्या 'नौतपा ' त ते ४७-४८ झालंच पाहिजे ! मग अकोला सर्वात गरम, का अमरावती, का नागपूरमधे जास्त ... ह्यावर आम्ही लक्ष ठेवून ! काहीही झालं , तरी आपलं गाव इतरांपेक्षा वरचढ असलंच पाहिजे .....!! एकदा का ४७ गेलं की मग उतरायला लागायचं आणि एक दिवस सडकून पाऊस ! २-३ तास झोडपून काढायचा ... ! पण काय मस्त कडक उन्हाळा !! तेव्हा असं एवढं काही जाणवायचं नाही ... कारण ... youth !! आणि , सगळ्यातच मजा ही वृत्ती .... !!!
कॉलेज संपलं, आजोळ-माहेर सुटलं ... नवऱ्याच्या घरी मद्रासला ! तिथे काय ... रोजच गरम , उकाडा आणि घाम ... "आमच्या गावाला नसतो बाई असा चिकचिकाट" ...असं दर तासाला मी म्हणत असे... पाणीपुरी-गोलगप्पा आणि बाकी सर्व केव्हाच मागे पडलं ... नाही म्हणायला, नवऱ्याबरोबर स्कूटरवरून मरीना बीच वरून चक्कर मारून यायचं ... केव्हातरी softy खायचं ! तो टूरवर गेला की सासूबाईंबरोबर भाजी आणायला गेले की येता-येता आम्ही दोघी ताडगोळे खाऊन यायचो ! त्याचं इंग्रजी नाव ही किती मस्त ... ice apple ! ताडगोळे नसले , तर शहाळं !! एकूणच मला उन्हाळा जास्त आवडतो हं !!!...
नंतर वेळ आली , मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूरला माहेरी जायची ! उन्हाळ्यात नागपूर ? सगळ्यांना तो वेडेपणा वाटत असेल, पण माझ्यासाठी ते 'काश्मीर'च ! गारेगार ! २६-२८ तास आगगाडीचा प्रवास ! केवढी ती तयारी ! पाण्याचा प्रचंड मोठा cool keg ... १० लिटरचा ! एका बाटलीत पन्ह करायला कैरीचा गर, त्यात साखर-मीठ-वेलदोडा घातलेला ! चमचाभर घातलं की ग्लासभर पन्ह तयार ! व्हायचं इतकंच की गाडीत बसल्या-बसल्या मुलांना तहान लागायची ! आणि नागपूरला पोहोचेपर्यंत सगळं संपलेलं असायचं ! एकदा घरी पोचलो की मी मुलांना अक्षरशः cooler च्या खोलीत बंद करून टाकायची ! फक्त सकाळी ९ पर्यंत आणि संध्याकाळी ६ नंतर अंगणात खेळायला मोकळीक ! अर्थात त्यांना त्या उन्हाळ्याचं विशेष काही वाटायचं नाही, पण मला मात्र उन्हाळ्यापेक्षा त्यांना ऊन लागेल ह्या भीतीने खंगायला व्हायचं ! त्यांना cooler चं केवढं कौतुक ! तोपर्यंत AC ची एवढी लागण झाली नव्हती जगात ! त्यामुळे cooler मधे पाणी भरणं, बागेत झाडांना पाणी घालणं, अंगणात संध्याकाळी पाणी मारणं आणि मग झोपाळ्यावरच्या झोक्यात झुळुका enjoy करणं ह्याचं कौतुक असायचं ! आणि एक दिवस पॉट मधल्या ice-cream चा प्रोग्रॅम ! बर्फ आणण्यापासून ते पोटात जाईपर्यंत , एक सोहळाच असायचा ...!!! उन्हाळा असावा तर असा !
... आणि आता तीच मी ... मला बंगलोरचं ३८ °C फार गरम वाटतंय ... कधी येणार तो पाऊस असं झालंय ... रोज गाणी म्हणतेय .. 'रामा , मेघ दे, पानी दे, छाया दे रे' ... नाहीतर 'उष्णतेची तब्येत माझी नाजुक पाहून घ्या ... गुलाबाचं सरबत मला प्यायला आणून द्या' .... पण .... ,नवरा ऐकेल तर शप्पथ !
"बंगलोरचं ऊन मला (अजिबात ) झेपेना ... नावाला सुद्धा , पक्षी कुठं दिसेना , दिसेना .... !!!
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
उन्हाळा..तुझा लेख वाचून छान वाटलं..थोडावेळ तरी मनाला गारवा. या वर्षी पुण्यातही 42॰..तू लिहिलंस तसं सोसवेना आता...
ReplyDeleteहो , या वर्षी उन्हाळा खूपच जाणवतोय ... लवकर पाऊस पडेल अशी आशा करूया . Thank you , संजू !
Deletefor five years I had enjoyed all this in Jalgaon from 1978 to 83. Mawa Kulfi was favorite
ReplyDeleteJalgoan ...Very hot and dry ..Severe summer !! Must be very difficult !!!!
Delete