पुरुषोत्तम मास
आजकाल पुण्यात कुठेही जा, सगळीकडे flex लागले आहेत ... अधिक मासानिमित्त ... भजन - पूजन - कीर्तन ... विष्णू सहस्त्रनाम, गीता पठण, भागवत वाचन ... देवळांमधे विविध पूजा ... आणि मिठाईच्या दुकानांत अधिक मासाकरता अनारसे ! हे सर्व अधिक मासानिमित्त आहे म्हटल्यावर ठरवलं की ह्याबद्दल काहीतरी लिहायचं ... आणि मग शोधायला लागले ...
पहीलं पुस्तक ... संपूर्ण चातुर्मास ... तर त्यात अगदी जुजबी माहिती ... चला, पण सुरुवात तर झाली . आणि मग मिळेल तसं लिहीत गेले. मुळात प्रश्न की अधिक मास म्हणजे काय ... तो येतो कसा ... त्याचा हिशोब कसा करतात ... काहीच महिने अधिक येतात ... वगैरे ... आणि जितकं शोधू तितकं सापडत गेलं ...
सौर वर्षातले दिवस ३६५ पण तिथ्या पाहिल्या तर ३७१, आणि चांद्र वर्षात ३६० तिथ्या येतात. म्हणजे दर वर्षी ११ तिथ्यांचा फरक पडतो. दर ३ वर्षांनी ३३ तिथ्या होणार आणि नवीन चांद्र वर्ष थोडं थोडं आधी सुरु होणार ... मग सगळे सणवार आणि ऋतूंचा ताळमेळ कसा ठेवायचा ? अशानी तर दिवाळी केव्हातरी उन्हाळ्यात, किंवा गौरी गणपती हिवाळ्यात ... ?
आपले सणवार सगळे ऋतूंशी निगडीत आहेत, तसंच खरीप-रब्बी आणि येणाऱ्या पिकांवरच , आणि त्या वेळी असणाऱ्या हवामानाला योग्य असेच त्या त्या सणाचे पदार्थ - नैवेद्य , प्रसाद अवलंबून असतात. ... आपल्या पूर्वजांनी ते तसेच बेतलेले आहेत, आणि हा तिथींचा गोंधळ दुरुस्त करण्यासाठी ही अधिक महिन्याची सोय त्यांनी करून ठेवली आहे.
आपल्या पूर्वजांना सौरमान - चांद्रमान यांची उत्तम माहिती होती, नक्षत्रं - ग्रह - तारका आणि त्यांचे भासमान भ्रमण, त्यांच्यातला apparant किंवा visible संबंध ही त्यांना माहीत होता. त्याचं गणित ही माहीत होतं , astronomy चं ज्ञान, भूमिती, त्रिमिती सगळं त्यांनी संशोधन केलं ..... आपण करंटे की आपल्याला पाश्चिमात्य लोकांकडून त्याचं validation करून हवं असतं. त्यांनी सांगितलं की आपल्याला पटतं ... मग आपण म्हणतो ... "हो हो , आमच्या पूर्वजांना हे माहीत होतं "... हसं होणारच नं आपलं ...
असो, तर अधिक महिन्याबद्दल अजून एक महत्वाची माहिती , म्हणजे चांद्र महिन्यानुसार प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्या चांद्र महिन्यात सूर्य पुढच्या राशीत जात नाही, तो महिना 'अधिक' मास म्हटला जातो. आणि त्या नंतर येणाऱ्या महिन्याला 'निज' मास म्हणतात. ह्या वर्षी आता अधिक जेष्ठ चालू आहे आणि १५ जून नंतर निज जेष्ठ सुरु होईल. आणि ही २८-३० दिवसांची - ३३ तिथींची gap भरून निघेल.
... पूर्वीच्या काळी , तसं काहीच कारण नसतांना ह्या अधिक मासाला मलीन मास - मल मास असं नाव मिळालं. त्या महिन्यात लग्न-मुंज-वास्तुशांत ही मोठी तीन शुभ कार्य करत नाहीत... ह्याबद्दलची एक गोष्ट आजीमंडळी सांगत असत ... संध्याकाळी परवचा म्हणून झाल्यावर, रामायण-महाभारतातल्या गोष्टी किंवा अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी, माहित्या, दंतकथा, पुराणातल्या कथा , श्लोक ... कितीतरी informal गोष्टी !... त्यातलीच एक अधिक मासाची ! तर , एकदा ह्या अधिक मासाला खूप वाईट वाटलं आणि तो रडत श्रीविष्णूंकडे गेला, आणि म्हणाला की ,"देवा मला कोणी वाली नाही, नाव ही नाही. मी अपवित्र आहे ..." तेव्हा श्रीविष्णूंनी त्याला आपलंसं केलं, त्याला आपलं नाव दिलं आणि सांगितलं की शुभकार्य नसेल, पण ह्या महिन्यात भजन-पूजन-दान धर्म केल्यास विशेष पुण्य मिळेल ... आणि माझी भक्ती सगळ्यांना खूप शांती, सुख-समाधान देईल ...त्यांच्यावर माझी कृपा असेल !म्हणून हा 'पुरुषोत्तम मास' !
हा महिना असा ३३ तिथी मिळून झालेला म्हणून ३३ ला महत्व ... ३३ कोट देव ... असा ही काही जण संदर्भ लावतात - प्रत्येकाचं आपलं मत ! मग , इतपत माझी जिज्ञासा शांत झाल्यावर ( details मधे गेले तर माझंच अज्ञान उघडं पडायचं ... इथेही चुका असतील तर क्षमस्व ... मी मला समजलं, उमजलं तसं लिहिलं ... )
मग ३३ अनारसे आणि जावयाचा मान ... तो कसा आला ते बघूया म्हटलं ... ! लहानपणचं आठवत होतं. आजी अधिक महिना आला की अनारसे करायची, आणि माझ्या आईवडिलांना समारंभपूर्वक म्हणजे औक्षण वगैरे करून काहीतरी मोठी gift सोनं-चांदी वगैरे आणि अनारश्यांचा डबा द्यायची. मी तिला विचारलं एकदा, "दरवेळी अनारसे का ? करंज्या दे की ... किंवा चकल्या का नाही ... ?" तेव्हा सगळे मला हसले, पण आजी म्हणाली, "अगं, अनारसे हा स्पेशल पदार्थ आहे. तो खूप जुन्या काळचा आहे. महाभारतात ही त्याचा उल्लेख आहे. तेव्हा त्यांना 'अपूप' म्हणत. अपूप म्हणजे जो खराब होत नाही, नासत - कुजत नाही असा ... करंजीतलं खोबरं खवट होतं, चकलीला वास येतो, काही पदार्थांना जसे लाडू-मिठाईला बुरशी येते ... त्या सगळ्यांपेक्षा अनारसा खूप जास्त टिकतो ... आणि अधिक मासात ३३ तिथ्या म्हणून ३३ अनारसे ... हा देवी लक्ष्मीचा आवडता पदार्थ ... आणि तुझी आई तिच्या घरची लक्ष्मी, आणि जावई म्हणजे विष्णूचं प्रतीक मानतात, म्हणून अनारसे द्यायचे ... " धाकट्या बहिणीच्या लग्नात आईवडिलांनी जेष्ठ जावयाचा मान केला, आणि त्या वेळी आम्हाला नमस्कार केला, तेव्हा 'नको नको' म्हणत मागे सरकून पळून जावसं वाटलं होतं ... पण तेव्हा जावई-मुलगी हे लक्ष्मी-विष्णूचं प्रतीक - हा संस्कार- ही संस्कृती हे कळलं ...
अजून एक मजेदार माहिती ... काही लोक अनारश्यां ऐवजी धोंडे नावाचा पदार्थ करतात. तांदुळाच्या पिठीची उकड काढून , किंवा गव्हाच्या कणकेच्या पारीत पुरण भरून त्याचे मोदकाच्या एवढे चपटे गोळे करतात, आणि उकड असेल तर वाफवून अन कणकेचे असतील तर तळून घेतात. ह्यांना धोंडे म्हणतात! ते तुपाशी खायचे ! ह्या रेसिपीच्या शेवटी त्या सासूबाईंनी लिहिलं होतं, असे धोंडे करा आणि आपल्या 'धोंडोपंतांना' द्या ! मनात आलं, ह्यांना जावईबापूंनी चांगलंच खर्चात पाडलेलं दिसतंय ... !
ह्या महिन्यात लोक खूप वेगवेगळे संकल्प - नेम वगैरे करतात, हे मी पाहिलंय. इतकी वर्ष बंगलोरमधे राहिल्या मुळे काही गोष्टी फक्त ऐकलेल्या होत्या, पण पाहिल्या नव्हत्या. तिथे राहून तिकडच्या बऱ्याच नवीन गोष्टी कळत होत्या, पण इथल्या महाराष्ट्रातल्या miss होत होत्या ... तर नुकत्याच एका अधिक महिन्याच्या कार्यक्रमाला हजर असायचा योग आला. व्याही मंडळींकडे माधवीच्या आत्यांनी अधिक महिन्यानिमित्त ३३ मेहुणांना जेवणाचा घाट घातला ! वेळेवर कोणी येऊ शकत नाही, अडचण असते, म्हणून थोडी जास्तच म्हणजे ४० वर जोडपी बोलावली होती ... म्हणजे ८० लोक ... ! अधिक महिन्यातल्या प्रत्येक तिथीचं एक मेहूण ... लक्ष्मी-विष्णू म्हणून कल्पिलेलं ...! अशा समारंभाला आपल्याला बोलावणं असणं, म्हणजे केवढा मान, आणि आपलं भाग्य !
जेवणापूर्वी विष्णुसहस्रनाम, गीतेतला ' पुरुषोत्तम योग' हा पंधरावा अध्याय ! भागवतातील काही वाचन ! ऐकून कान तृप्त होत होते ! एरवी , फक्त फोटोत पाहिलेली मंजुळ वात आणि ती लावलेलं निरांजन -तबक ! ती वात बनवण्याचं कसब आणि तो सगळा कार्यक्रम पाहून डोळे निवले ! त्यानंतर सुग्रास जेवण, दक्षिणा, मोगऱ्याचा गजरा, सौभाग्य वाण, अत्तर इत्यादी उपचार, gift ...सगळं अगदी व्यवस्थित, साग्रसंगीत ! अशी पाचही ज्ञानेंद्रियं तृप्त झाली ! ..त्यांना खूप खूप शुभेच्छा !!
ह्याच संदर्भात एक खरी घडलेली गोष्ट ! ३५-३६ वर्षांपूर्वीची . माझे एक काका-काकू पुण्यातले. त्यांनी हे व्रत-नेम-समारंभ म्हणा- केला. त्यांनी एका देवळात ३०-३ मेहूणं जेवायला बोलावली होती. देऊळ बारा-साडेबाराला बंद झाल्यावर तिथेच सभागृहात पानं मांडली होती. तयारी चालू होती. तेव्हाच एक आजीबाई देवळात आल्या. रोज देवदर्शन करून जेवायचं हा त्यांच्या नेम. त्यांनी ही सर्व तयारी पाहिली आणि तिथल्या उपाध्यायांना विचारलं की," हे काय चालू आहे ? कोणतं व्रत आहे ? त्यानं काय होतं ? ..". अगदी कथा-कहाण्यासारखं ! उपाध्यायांनी त्यांना सर्व सांगितल्यावर "बरं, येते " म्हणून निघाल्या. मनात विचारचक्रं भिरभिरत असावीत. कर्म-धर्म संयोगाने त्यांना समोरून एक केळीवाला डोक्यावर टोपली घेऊन येतांना दिसला.त्याला थांबवून ,सगळी गोष्ट सांगितली आणि त्याच्याकडून ७० केळी जेवायच्या तयारीपाशी ठेवून दिली. माझी काकू म्हणाली की," आमच्याकडचं जेवण झालं की मग तुमची केळी देऊ." मान डोलावून त्या आजीबाई बाहेर आल्या आणि त्या केळेवाल्याला पैसे विचारायला लागल्या. तर तो म्हणाला, "आजी, खरं तर इतके रुपये झाले, पण तुम्ही त्यातले निम्मेच द्या ... उरलेले पैसे म्हणजे माझंही व्रत समजा ... मी काही ३०-३ मेहूणं जेवायला घालू शकत नाही, पण एवढं तर करू शकतो !" आजीबाई म्हणाल्या, "अरे, पण तुझं नुकसान नाही का ? आता तू दिवसभर काय विकणार ? " तर तो म्हणे, "आजीबाई, सकाळी ५ वाजता गुलटेकडीच्या पलीकडून केळी आणतो. आज चांगली मिळाली , म्हणून जास्त आणली, पण १२ वाजेपर्यंत एकही केळं विकलं गेलं नाही ... आणि अचानक तुम्ही थांबवलं ... अन सगळा माल एका दमात विकला गेला. नुकसान कसलं ? उलट देवाची कृपाच झाली ! एकदम पैसे मिळाले, आणि पुढची पायपीट पण वाचली ... आणि व्रताचं पुण्य मिळालं , त्याचा कसा हिशेब करायचा ... मी आज भरून पावलो !" ....
... एवढं समाधान मनात असणं ... देवाची कृपा याहून ती काय ... ?
- सौ अलका कुंटे, बंगलोर
+९१ ८७६२३ १६३८५
उत्तम लेख ! 👌👌
ReplyDelete