जिलबी बिघडली ...
काही लोकं जन्मतःच हुषार असतात. जगात येतांनाच आपल्याबरोबर सगळं घेऊन येतात. काही जणांना मात्र काही गोष्टी जन्मभर कष्ट करूनही साध्य होत नाहीत, आणि मग तीच त्यांची ओळख होऊन बसते. हा अन्याय आहे, पण आहेच !
मी जन्माला आले, ती खाण्याची आवड आणि करण्याची नावड घेऊनच. ' बाईचा जन्म आणि स्वैपाक करायला आवडत नाही ? मग काय फक्त खायला ( - गिळायला - ) आवडतं ? ' असा उद्धार व्हायचा अनेकदा, पण ते असो.
माझ्या लहानपणी हादगा-भोंडल्याचं एक गाणं होतं -
हरीच्या प्रसादासाठी केली, जिलबी बिघडली । त्यातला उरला होता पाक, त्याचा केला साखरभात । नेऊनी वाढला पानांत , जिलबी बिघडली ।।
लग्न झाल्यावर हे गाणं नेहमी आठवायचं . वाटायचं, हिंमतवान आहे हं पोरगी ! स्पष्टपणे सांगत्येय बिघडलेलं, आणि त्यावरची दुरुस्तीही ! फार कौतुक वाटायचं !
... तर ...असं झालं की , पानकोबीचा आणि माझा ३६ चा आकडा . इतकी पांचट भाजी जगात दुसरी नसेल. आणि घरात दोन लहरी मुलगे असल्यामुळे अंदाजाचे नेहेमीच १२ वाजलेले ! एकदा आमरसाबरोबर पानशोभा म्हणून - पानशोभा कसली आलीय, पानभरू - म्हणून ही भाजी केली. तिला कोण हात लावणार ? ती कढईभर भाजी पाहूनच माझा जीव दडपला ! लगेच ते गाणं आठवलं . हात-पाय गाळायचे नाहीत, उरकून टाकायचं !
दुपारच्या खाण्याला त्या भाजीत हाताला येईल ते घालून त्याचे वडे करून टाकले. भरपूर सॉस, दही, जे मागतील ते दिलं मुलांना . तरी १ - २ घास खाल्ल्यावर त्या वड्याला चहूबाजूंनी निरखत धाकटा म्हणालाच, " आई, by any chance , हा वडा मागच्या जन्मी पानकोबीची भाजी होता का ? ...
असो. पण हे फक्त माझंच होत नाही, सगळ्यांचं होतं, आणि आजकाल WA च्या जमान्यात पटकन जगजाहीरही होतं ! मागच्या वर्षी lockdown लागला आणि पदार्थ करण्याची आणि त्याहीपेक्षा त्यांचे फोटो लावण्याची एक लाटच आली. अगदी कोविडला बुडवून टाकेल अशी ! जो - तो, जी - ती आपली पदार्थ करत्येय आणि फोटो टाकत्येय ! एकवेळ पोळ्या करणार नाहीत, पण तऱ्हतऱ्हेचे पाव, बन, ब्रेड, केक... फोटों वर फोटो ! पण ह्या थापा आहेत , हे लवकरच कळलं.
एका मैत्रिणीने ढोकळ्याचा फोटो लावला ग्रुपवर. बघते तर काय, माझ्या ढोकळ्याचा फोटो ! मी माझी बशी ओळखली. लगेच तिला फोन केला आणि चक्क जाब विचारला ! " अगं , अगं , रागवू नकोस," ती म्हणाली, " माझा ढोकळा बिघडला, पण मी challenge घेतला होता नां , मग काय करणार ! तेवढ्यात तुझ्या भिशीतला फोटो सापडला, तोच लावून टाकला !" " अगं , पण बशी ओळखतील नां ? " इति मी . " बशीचं काय घेऊन बसलीस, बश्यांसारख्या बश्या शेकडो असतात ! आणि तुझा ढोकळा तरी पूर्णपणे तुझा कुठे होता ? Instant पाकिटाचाच नां ?... " मी गप्प !
तर ... तात्पर्य काय ? ... गुलाबजाम फसले की त्याचे लाडू, चकल्या हसल्या की थालिपीठं ! असं हसत-हसवत साजरं करायचं ! हार मानायची नाही. आपल्या हातून पदार्थाचा murder झालाच, तर मागे पुरावा ठेवायचा नाही, आणि त्याच्या साक्षीदारांना कधी धाक दाखवून तर कधीमधी चिरीमिरी - पाणीपुरी खिलवून गप्प बसवायचं ! ...
कशी आहे idea ? ..... 🌝
अल्काताई खूप छान express केले आहे. Superb!Idea एकदम मस्त!
ReplyDeleteKhup chan likhan.Ha tumacha pailu mahit navara.Superb
ReplyDeleteअलका छान. सर्वच स्रिया थोड्याफार फरकाने एकदातरी या अनुभवातून जातात. पण नंतर ती एक मजेशीर घटना म्हणूनच रहाते.
ReplyDelete